शुक्रवार, ३० जून, २०१७

● श्री संत गाडगे बाबा

● श्री संत गाडगे बाबा

लेखक -
केशव सीताराम ठाकरे

प्रकरण : १ -
ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

सखू माहा कारभार अटपला! मराले शेवटी मी लोकाच्या उंबरठ्यात ईऊन पळलो! मेल्यावर मळ जायाले पैसा लोकाचाच; कायनं आली असिल हे अवदसा? देवकाऱ्याच्या दारुनं! काहाचे हे देव अन् काहाचे ते दगळा गोटवाईचे देवकारे? दारूच्या पाई घरदार, वावर जमिन मान मयराद्याले सोळल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले. आता माहा आईक. आताच्या आता तो खंडोबा ती आसरा अन् सर्वच्या सर्व देव पाटातले दगळ गोटे दे फेकुन भुलेसरीत. आखीन एक काम आपल्या लाळाच्या डेबुले वारा नोको लागु दिऊ त्या देव देवीचा. निर्मय राहुदे त्याला या देवदेवी अन् देवकाऱ्याच्या पापापासुन. अरेरे काहाचे हे धरम अन् कुयधरम? या खोट्या देवाईले कोंबळे बकऱ्याईचे इनाकारन कापन्याच्या पापी फंदात मी पळलो नसतो त दारुच्या नांदात कायले गोयलो असतो? लोकाईले काम्हुन बदलामी देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरो होता तथुरोक मले त्याहीनं दारुसाठी कोरलं. लोक असेच असतात सखू. पन आता माह्या डेबुजीले संभाळवो बरं? तो पिसाट, देवाले न माननारा झाला तरी बरं होईन.पन त्याले या बकरे खाऊ अन् दारु पिऊ देवाचा नांद लागु देऊ नोको बरं?’’

• देव कार्याची फलश्रुति :

सखू, माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देव कार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मान मरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हाऱ्यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देव देवींचा. निर्मळ ठेव त्याला ये देव देवी नि देव कार्याच्या पापापासून. अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म! या खोट्या देवांना कोंबडी बकऱ्याचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्या जवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकड खावू दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस. इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला. सखूबाईने हंबरडा फोडला.

वऱ्हाडातील अमरावती तालुक्यातील कोते गावची ही सन १८८४ सालची गोष्ट. झिंगराजी हा शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचा नातू. घराणे सुखवस्तू. जातीने परिट, तरी मुख्य व्यवसाय शेतीचा. गोठा गाई - म्हशी - बैलानी डवरलेला. परीट जमात मागासलेली. तशात नाक्षर. अनेक अडाणी रूढी, भलभलती कुल दैवते, त्यांना नेहमी द्याव्या लागणा-या कोंबडे - बकरे - दारूचे नवस, यांचा कहर माजलेला. कोणी किती ही शहाणा असला, विचारी असला, तरी जमातीच्या मुर्वतीसाठी वर्षातून एकदा तरी देव कार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे, असा त्यांचा सामाजिक दण्डक. घरातल्या हव्या त्या बऱ्या वाईट भानगडीसाठी खंडोबाला आसरायीला किंवा गाव देवाला संतुष्ट करायचे म्हटले का आलीच कंदुरी नि दारू. मूल जन्माला आले, करा कंदुरी. तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला आला, बोलवा भगताला देव खेळवायला, कापा गावदेवापुढे कोंबडे, दाखवा दारूचा नैवेद्य, लावा त्याचा आंगारा का म्हणे होणारच ते खडखडीत. देव कार्य केले म्हणजे पाहुण्यांच्या बरोबरीने यजमानाने ही दारूचा एक घोट तरी घेतलाच पाहिजे. घेतला नाही, तर देव कोपणार, अंगावर नायटे - गजकर्ण उठणार, घरादाराचे वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्म समजुती पुढे मोठ मोठ्या मानी माणसांनाही - इच्छा असो वा नसो - मान वाकवून दारू प्यावीच लागते. देव कार्यच कशाला? पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी (मटणाचा बेत नसला तरी) दारूची बाटली आणलीच पाहिजे. दारू देणार नाही तो यजमान कसला नि घरंदाज तरी कसला? सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली, तर बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा? बरीच वर्षे त्याने दारूचा मोह टाळून, संसार - व्यवहार कदरीने केला. अखेर आजू बाजूच्यांच्या नादाने तो देव कार्यांच्या निमित्ताने अट्टल दारूड्या बनला. दारूचे व्यसन लागायचाच काय तो अवकाश असतो. ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू भोके पडून, ती केव्हा सफाचाट रसातळाला जाईल, हे ज्याचे त्याला ही समजत उमजत नाही. सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुप्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार, शेतवाडी, गुरेढोरे, आधीच वाटेला लागलेली. विष खायला ही फद्या जवळ उरला नाही. जवळ बायको सखूबाई आणि सन १८७६ साली जन्माला आलेला एकुलता एक मुलगा डेबूजी. दोन वेळा साजऱ्या व्हायची पंचाईत, तेथे कसले आले औषध पाणी? भरभराटीच्या ऐन दिवसांत झिंगराजी शेट झिंगराजी शेट म्हणून तोंडभर वाहवा करून त्याच्या पैशाने दारूबाजीच्या मैफली उडवणारे आता थोडेच त्याच्या वाऱ्याला उभे राहणार? शेणगावच्या भुलेश्वरी (भुलवरी) नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्याचे मावसभाऊ यादवजी आणि जयरामजी रहात होते. त्यांनी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले. त्याच ठिकाणी मरणाला मिठी मारण्या पूर्वी झिंगराजीने सखूबाईला प्रारंभाचा उपदेश केला.

• मुलगी परत घरी आली :

मुलगी परत घरी आली. मूर्तिजापूर तालुक्यात दापुरे गावी तिचे माहेर होते. वृद्ध आई बाप हयात असून कर्तबगार भाऊ चंद्रभानजी घरदार, शेतवाडी पहात होता. ६० - ६५ एकर जमीन, नांदते मोठे घर, १० - १२ गुरेढोरे, घराणे चांगले सुखवस्तु होते. म्हाताऱ्या हंबीररावाला झिंगराजीच्या मृत्यूची बातमी समजताच, त्याने चंद्रभानजीला पाठवून संखूबाई नि डेबूजीला घरी आणवले. छोटा डेबूजी काही दिवस इतर मुलांच्या बरोबरीने खूप खेळला बागडला, गावाबाहेर हुंदाडला, नदीत डुंबला, आईच्या हाताखाली राबला. एक दिवस तो चंद्रभानजी मामाला म्हणाला - "मामा, गुरे चारणीसाठी नोकर कशाला हवा आपल्याला? मी जात जाईन रोज आपली गुरे घेऊन चरणीला. मला फार आवडते हे काम." अरेच्चा, वाटला तसा हा पोरगा ऐतखावू दिसत नाही. याला कामाची हौस आहे. हे चटकन ओळखून चंद्रभानजीने डेबूजीची गुरे चरणीच्या कामावर नेमणूक केली. डेबूजीच्या क्रांतिगर्भ जीवनाचा श्री गणेशा गुरे चरणीने झाला. खरेच, लोकोत्तर युगपुरुषांच्या चरित्राचा ओनामा गुरे चरणीनेच होत असतोसे दिसते. यादव श्री कृष्णाने बालपणी गुरे चरणीचीच दीक्षा घेतली होती.

• डेबूजीचे गोवारी जीवन :

डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवण्यासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेच मारावी आणि गाई - म्हशी - बैल चरणीला घेऊन जावे. माध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकाद वेळी राखणदाराची चपराक ही तो मुकाट्यने सहन करायचा. पण उलट शब्द कधी बोलायचा नाही. गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतः पेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणा वैरण वेळच्या वेळी द्यायला एकदा ही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठे सफायी पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. ४ - ५ दिवसांआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.

• डेबुजीची गोवारी भजन पार्टी :

मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुण गुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातली मंडळी कधी काळी भजने गायची ती ऐकून वेडी वाकडी म्हणायची त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू केली. राकेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ, या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकर पोटात गेली रे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करीत बसायचे. मध्यरात्री पर्यंत असे होत राहिल्यामुळे, इतर मुले उशीरा उठायची नि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कानावर गेल्यामुळे, डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिच्छा सोडणार थोडेच?

• सार्वजनिक भंडाऱ्याचा श्री गणेशा :

डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ति प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती! कित्येकांनी आई बापांजवळ मागून, कित्येकांनी गावात भिक्षा मागून, धान्य जमा केले. गुराख्यांच्या वन भोजनासाठी गोड धोड करून द्यायचा खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच. झाले. हां हां म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्नकोट उभा केला.

डेबूजी म्हणाला - "गळे हो आपुन त साराईच जेवतो खावतो. पन जरा भवताल पाहा ना? किती तरी अंधले, लंगले, रगतपिते, भिकारी मानसं आहेत. त्याहीले बिच्याऱ्याहीले चुकुन तरी कधी नव्हीची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायाले भेटत नाही. आज आपुन त्याहीले सगळ्याईले बलाऊन आनुन पोटभर जेव्याले घालू. अन्नदानासारखं महापुन्य नाही. ते आपले गरीब भाऊ अन् बहयनी जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा नीवद होईन." डेबूजीच्या भजन मंडळात एक वाबन नावाचा महार गुराखी होता. त्याने महारावाड्यातले सारे बाप्ये बाया नि मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलावले. डेबूजीने सगळ्यांना एक पंगतीत शिस्तवार बसवून पुंडलीक वरदा हारि विठ्ठलच्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत असताना डेबूजीने निवडक भजने तल्लीनतेने गायली. जेवणाऱ्या मंडळींचा आणि गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पहायला जमलेल्या दापुरीच्या गावकऱ्यांना एक नवलच आज तेथे दिसले. नंतर गुराखी मंडळी पंगतीने बसली. डेबूजीने बाबाजी गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केरकचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाकाराची कुरबूर डेबूजीच्या आजोळी नि गावभर काही दिवस चालूच होती. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणात ही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेक वेळा केले.

• मुलाचे पाय पाळण्यात दिसले म्हणे! :

गाडगे महाराज या टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध डेबूजी गेली ४५ वर वर्षे हीच भेदातीत अन्न दानाची लोकसेवा बृहन्महाराष्ट्राच्या कोना कोपऱ्यात साजरी करताना पाहून, दापुरीच्या त्याच्या त्या बाल वयातल्या वर्तनाचा मुलाचे पाय पाळण्यात दिसले अशा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रीयुती किंवा संताळी मोह पुष्कळांना होत असतो. इतकेच काय, पण भविष्य काळी हा कोणी तरी मोठा साधू सत्पुरुष होईल, अशी पुष्कळांनी अटकळ बांधली होती, असे धडधडीत खोटे विधान ही करायला कित्येक चुकत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? कुणाला दिसतात? कोण ते पहातात? बरे, ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायांच्या लक्षणांप्रमाणे पुढे कोण कोण काय काय कस कसले उत्तेजन देतात? प्रत्यक्ष जन्मदात्या आई बापांना ही त्या पायांच्या लक्षणांची कसली काही कल्पना नसते, अटकळ नसते, जाणीव नसते. ती लक्षणे कुणाला दिसत नाहीत आणि कुणी ती पाहत ही नाहीत. आत्म विश्वासाने नि आत्म क्लेशाने एकादा माणूस मोठा कर्तबगार झाला, नामवंत झाला, म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या खऱ्या खोट्या आठवणी उकरून काढून, भविष्याचे सिद्धांत लढवण्याची कसरत लोक करतात, एवढाच त्या पाळण्यातल्या पायांचा अर्थ आहे. स्पृश्यां स्पृश्यांच्या सह भोजनाबद्दल आणि नदी काठच्या भजनाच्या व्यसना बद्दल बिचाऱ्या बाल डेबूजीला चंद्रभानजी मामाचा खावा लागलेला कणक्या चोप आज या कल्पना - पंडितांच्या हिशेबी कशाला जमा धरलेला असेल? शिवाय महार, मराठे, परीट, सुतार, लोहार, सवंगडी आपण एकत्र का बसवतो खेळतो नि दुपारच्या न्याहारीला एकत्र जेवतो, या कृत्याच्या दूरगामी परिणामांची तरी बाल डेबूजीला काही निश्चत जाणीव असणार थोडीच? आम्ही सगळे एक, यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला असणार? शक्यच नाही. हा एक सद्गुणांचा अंकुर आहे नि तो आपण वाढवला पाहिजे, अशी पुसट सुद्धा कल्पना त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल. मनाला ज्यात गोडी वाटते तेवढे करावे, अशी बाल मनाची ठेवणच असते. तिची बैठक सद्गुणांवर स्थिरावणे नि पुढे ती वाढीला लागणे, हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच समजला पाहिजे. एकादा मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबागारीचे श्रेय आई बापाला नि आजू बाजूच्या अलबत्या गलबत्यांना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते. रामदासाने म्हणजे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू शकला. या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणाच स्पष्ट उघड होत नाही काय? अनाथ गुराखीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या कर्मयोगी पदवी पर्यंत सिद्ध केलेल्या डेबूजीच्या जीवनाच्या यशवंत शर्यतीचे श्रेय एकट्या गाडगे बाबांचे आहे. त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा मोह मूर्खपणाचा आहे.

• पोहता येत नाही म्हणजे काय? :

दापुरी गावच्या पूर्णा नदीच्या हिवाळ्या - उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा. गावातली बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळी माणसे धडाड पाण्यात उड्या मारताहेत, सरासर पोहताहेत, पाणतळी खोल बुडी मारून भरारा वर येताहेत, मजा आहे मोठी. आले डेबूजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते का नाही, याचा कसला सुद्धा विचार न करता, स्वारीने घेतली धडाड उडी डोहात. आणि मग - आणि मग - आणि मग? कसचे काय अन् कसचे काय! लागला गटांगळ्या खायला. घाबरला. ओरडू लागला. आजू बाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेसा दिसताच एका दोघांनी पकडून काठावर आणला. उपचार केले तेव्हा सावध झाला. "पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला?" जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई, मामा, आजोबा धावत आले. "कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा" म्हणून आईने डेबूजीला पोटाशी धरले आणि "भलभलत्या फंदात पडायची गाढवाला फार खोड" म्हणून मामाने दिली भडकावून एक डेबूजीच्या. "खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकसील तर, तंगडी मोडून टाकीन." असा सज्जर दम भरला.

• माणसाला अशक्य काय आहे? :

नेपोलियन प्रमाणेच डेबूजी गाडगे बाबांच्या कर्तव्य कोशात अशक्य हा शब्दच नाही. बरोबरीचे सवंगडी धडाधड उड्या मारतात, सपासप सरळ्या मारीत या काठचे त्या काठाला जाता, मनमुराद डुंबतात आणि मी का वेड्या अनाडी बावळटा सारखा त्यांच्याकडे पहात नि त्यांचे कपडे संभाळीत काठावर बसू? छट्! हे नाही चालायचे. पोहायला मला आलेच पाहिजे. दोन प्रहरी आजू बाजूला कोणी नाहीसे पाहून, पाण्यात उतरून डेबूजी दररोज पोहण्याचा प्रयत्न करू लागला. एक दोन महिन्यांच्या आतच त्याचा आत्म विश्वास बळावला आणि पोहण्याचा, तरंगण्याचा, बुडी सराळ्या मारण्याच्या नाना प्रकारात त्याने एवढे प्रावीण्य मिळविले की त्या बाबतीत गावचा नि आसपासचा एक ही आसामी त्याच्या बरोबर टिकाव धरीनासा झाला. पावसाळ्यात नदीला महामूर पूर आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना नि जनावरांना वाचवण्याचे कर्म महाकठीण, मोठ मोठ्या पटाईत पोहणारांची अक्कल थरथरू लागायची. पण डेबूजी तडाड उडी घेऊन कमाल शहामतीने त्यांना सफाईत तडीपार खेचून काढायचा. असाच एकदा पूर्णेला पूर आला असता, पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी नावाच्या मित्राने डेबूजीशी पैज मारली. लोक नको नको म्हणत असता ही दोघांनी टाकल्या धडाड उड्या. नदी तर काय, एकाद्या खवळलेल्या महासागरासारखी रों रों करीत, गरार भोवरे भिरकावीत तुफान सोसाट्याने चाललेली. सहज भिरकावलेला लाकडाचा ओंढा धड शंभर पावले सुद्धा सरळ जाई ना. भोवऱ्यात गचकून झालाच तो बेपत्ता! आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात मारीत पाणी तोडीत! काठावरच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय होतय नि काय नाही. डेबूजी तर रंडक्या मुंडक्या अनाथ आईचा एकुलता एक मुलगा. कुणी भरीला घातला नि कुणी चिथावले? नसता आपरमात अंगी लागायचा. बरे, घरच्या मंडळींना कळवायचे, तर ती वेळही निघून गेलेली. आता कोणी घरून आलेच तर काठावरच्या लोकांनाच शिव्या श्राप खावे लागणार. सखुबाई तर काठावरच माथे फोडून घेणार. लोक थिजल्या डोळ्यांनी नुसते पहाताहेत तोच हां हां म्हणता पार दूर वरच्या पैलथडी वरून डेबूजीची भीम गर्जना ऐकू आली. "आलो रे आलो, सफाईत येऊन पोहोचलो." पण त्याचा तो पैजदार दोस्त? अरेरे, तो कुठेच दिसे ना. कशाचा दिसतो तो? काठा जवळ जाता जाताच एका भोवऱ्याच्या गचक्यात तो सापडला नि बुडाला. त्याचे प्रेत पुढे सहा मैलांवर कोतेगावी काठाला लागलेले आढळले. पोहण्या प्रमाणेच आट्या पाट्या, हुतुतु, लगोऱ्या, गोट्या आणि कुस्त्या या कलांत ही डेबूजी दापुरीच्या पंचक्रोशीत कुणाला हार जाईनासा झाला. घरचे खाणे पिणे तसे म्हटले तर यथातथाच. पण अखंड कष्टांची नि श्रम साहसाची आवड उपजतच त्यांच्या अंगी बाणल्यामुळे, डेबूजीची देहयष्टी पोलादी कांबी सारखी टणक कणखर बनत गेली. ना कधी थेटे ना पडसे. आज ७५ वर्षांचे वय झाले आहे तरी हव्या त्या प्रचंड डोहात बेधडक उडी घेऊन सहज लीलेने तडीपार होताना बाबांना पाहून त्यांचे जवान अनुयायी सुद्धा एकमेकांच्या तोंडाकडे पहात उभे रहातात.

• गुराख्याचा नांगऱ्या बनला :

डेबूजी चांगला १४ - १५ वर्षांचा पुऱ्या उफाड्याचा जवान झाल्यामुळे, चंद्रभानजीने त्याची गुरे राखणी बंद करून, "डेबूजी, तू आता शेतावर औताला जात जा." असे सांगितले. शेतकऱ्याच्या पोराच्या हातात औत येणे आणि पांढर पेशाचा पोर मॅट्रिक होणे, जवळ जवळ सारखेच म्हटले तरी चालेल. फरक एवढाच की पांढर पेशा पोरगा मॅट्रिक होऊन कमावता होतोच असे नाही, पण शेतकऱ्याचा पोर औताला लागला का त्यांची कमावणी तेव्हाच चालू होते. पडेल ते काम चोख कुसलतेने करायचे ही डेबूजीची कर्मयोगी वृत्ती लहानपणापासून दिसून येते. शेतीचा नांगर हातात येताच, शेतीच्या सगळ्याच लहान मोठ्या तपशिलांच्या कामाला त्याने पक्का आवर घातला. औताच्या बैलांची निगा राखण्यात त्याची पहिल्यापासूनच मोठी कदर. स्वत: ला वेळेवर भाकर मिळो न मिळो, पण बैलांची वैरण, त्यांची गोठे सफाई, रोजची नदीतली अंगधुणी, गोणपाटाच्या रकट्याने त्यांचे अंग पुसणे इत्यादि कामे डेबूजी अगदी तन्मयतेने करायचा. खांद्यावर आसूड नि नांगर टाकून जवान डेबूजी भजने गुणगुणत आपले बैल घेऊन शेताकडे जाऊ लागला का दापुरी गावच्या बाया बाप्ये नजर लावून कौतुकाने त्या बैलांकडे पाहायचे. शेतकाम डेबूजीने पत्करल्यापासून शेतांची सुधारणा झाली, उत्पन्न ही वाढले. हर एक काम तो जातीने पाहू लागल्यामुळे, बांध - बंदिस्तीपासून तो पिकाच्या राखणी पर्यंत उधळ माधळीचा किंवा चोरीमारीचा प्रश्नच रहात नसे. धान्याची कणसे दाणे धरू लागली आणि कपाशीची बोंडे डोळे उघडू लागली का डेबूजीचा मुक्काम कायमचा शेताच्या माचीवर. हातात लठ्ठ बडगा घेऊन रात्रभर जागरण. शिवाय दिवसाची दलामल असायचीच. सारांश, शेतीच्या कामात डेबूजी ईश्वर भक्ती इतकाच तल्लीन रंगलेला असायचा. काया - वाचे - मने करून केलेल्या सेवेच्या भक्तीला बिनचूक, प्रसन्न होणारा शेती शिवाय दुसरा परमेश्वर नाही, हा सिद्धांत डेबूजीला याच कोवळ्या वयात मनोमन पटला आणि येथेच त्याच्या भावी चारित्र्याच्या उज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला.

• कसे होणार याचे दोन हाताचे चार हात? :

लहानपणी मुला मुलींची लग्ने लावण्याचे व्यसन खेड्या पाड्यात आणि मागासलेल्या नाक्षर शेतकरी वर्गात फार. बाल विवाहांना शिक्षा ठोठावणारे कायदे आज जारी आहेत, तरी ही त्यांचे हे व्यसन आज ही लपून छपून चालूच आहे. लग्ना शिवाय माणसाची माणुसकीची ठरत नाही, असा त्या अडाण्यांचा समज. ही लग्ने तरी थोड्या खर्चात, आंथरुण पाहून पाय पसरण्याच्या बाता बेताने करतील तर हराम! घरची किती ही गरिबी असो, सकाळ गेली संध्याकाळची पंचाईत असो, लग्नाचा थाट सरदारी दिमाखाचा उडालाच पाहिजे. तेवढ्यासाठी परवा नाही शेत भात, गाडी घोडा, ढोरं गुरं टक्के करून सावकाराच्या घरात गेली तरी बेहत्तर, पण लग्नाचा थाट दणक्या खणक्याचा झालाच पाहिजे. या फंदाने महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जेवढा कर्ज बाजारी होऊन भिकेला लागला तेवढे इतर कोणत्याही व्यसनाने त्याच्या जीवनाचे कोळसे केलेले नसतील. सखूबाई नि डेबूजीची अवस्था काय विचारता? ना बिस्तर ना बाड, देवळी बिऱ्हाड. आजोबा मामाचा आश्रय मिळाला नसता तर सखूबाईला हात पोर घेऊन गावोगाव भीकच मागावी लागली असती. जात - जमातीला सगळ्याना हे माहीत होते. अशा ना घर ना दार पोराला कोण देतो आपली मुलगी? सोयरा बघायचा तो त्याच्या घरदार शेतीवाडी वरून पसंत करायचा. मग ते घरदार, शेतीवाडी तीन सावकारांकडे सहा वेळा गहाण पडलेली का असे ना. त्याची पर्वा कोणी करीत नसे. इतकेच नव्हे तर जवळ कवडी दमडी नसता ही, लग्नाच्या थाटाने सोयऱ्यांचे नि गावकऱ्यांचे डोळे दिपण्यासाठी खुद्द नवऱ्या मुलालाच एकाद्या सावकाराकडे ७ - ८ वर्षांच्या मुदत बंदीने पोटावारी कामासाठी कायम बांधून दिल्याचा करारनामा करतात आणि लग्नासाठी पैसा काढून तो उधळतात. असे खेडूतांचे नाना छंद असतात. त्यापायी खेडीच्या खेडी गुजर, मारवाडी, पठाण सावकारांच्या घशात जावून, मऱ्हाठा शेतकरी पिकल्या मळ्यावर पोट बांधून सावकराचा गुलाम बनला तरी या अडाणी लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत.

• काय पाहून मुलगी द्यायची? :

"डेबूजी माझा नाती, चंद्रभानजीचा भाचा, त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी, मग त्याची सोयरीक जमायला हरकत कसली? शब्द टाकायची थातड, पाहुण्यांची वरदळ लागेल आमच्या आंगणात." हा हंबीररावाचा नि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसांत दूर झाला. "मुलगा चांगला आहे हो, पण त्याच काय पाहून आम्ही मुलगी द्यावी? ना जमीन ना जुमला. ना घर ना दार." येई तो पाव्हणा हाच नकार देऊन चालता होऊ लगाल. मानी माणसाला नकार सहन होत नाहीत. चंद्रभानजी म्हणजे दापुरीतला एक पुढारी शेतकरी. गावात त्याचा शब्द खाली पडत नसे. नकारांनी पाणथळून न जाता, त्याने खटपटींचा जोर वाढवला आणि कमालपूर येथील धनाची परटावर आपले वजन पाडले. त्याला मुलगा पसंत पडला. पण त्याची बायको काही केल्या रुकार देई ना. हो ना करता १८९२ साली डेबुजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले. घरात सौ. कुंताबाई सून आल्यामुळे, सखुबाईच्या वठलेल्या जीवनाला पालवी फुटली.

• चंद्रभानजीवर सावकारी पाश :

सुख वस्तु घरंदाजांवर कर्जाचे पाश टाकण्याच्या सावकारी युक्त्या जुक्त्या अनेक असतात. तशात तो सुख वस्तु नाक्षर आणि मान पानाला हपापलेला असला तर सावकारी कसबात तो तेव्हाच नकळत अडकला जातो. दापुरे गावच्या शिवाराच्या पूर्वेला पूर्णा नदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिडके नावाच्या सावकाराचा एक ५ एकर जमिनीचा सलग तुकडा होता. जमीन होती उत्तम पण तिची ठेवावी तशी निगा न ठेवल्यामुळे ती नादुरुस्त नि नापीक झाली होती. तिडके सावकाराने तो तुकडा चंद्रभानजीला विकला. विकत घेताना काही रक्कम रोख दिली नि बाकीची रक्कम दोन वर्षांत हप्त्याने फेडण्याचे ठरले. मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर केला नाही. "कागदा शिवाय अडलं आहे थोडंच? जमीन एकदा दिली ती दिली. माणसाची जबान म्हणून काही आहे का नाही?" असल्या सबबीवर कागद आज करू उद्या करू यावरच दिवस गेले. दोन वर्षांत डेबुजीने त्या जमिनीची उत्तम मशागत करून ती सोन्याचा तुकडा बनवली. दोन वर्षात देण्याचे हप्तेही फेडले. तो सावकार चंद्रभानजीला हवे तेव्हा हव्या त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला. त्या सावकाराच्या इतर कुळांच्या देण्या घेण्याच्या भानगडी चंद्रभानजीच्या सल्ल्या शिवाय मिटेनाशा झाल्या. सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची एवढी मोहिनी टाकली की चंद्रभानजीच्या शब्दा शिवाय सावकार कोणाचे ऐकेनासा झाला. भोळसट चंद्रभानजी गर्वान फुगला. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी कुळ धर्म, देव कार्य, उत्सव, मेजवान्यांचा थोट उडवण्यासाठी तिडक्या कडून रातोरात वाटेल त्या रकमा मागवीत गेला. तिडक्याची तिजोरी आपलीच गंगाजळी असा जरी त्याला भ्रम झाला, तरी तिडके होता जातीचा सावकार. त्याने एकूणेक एक रकमेचा जमाखर्च लिहून ठेवला होता. एक दिवस तो त्याने चंद्रभानजीला गमती गमतीने दाखवला आणि या भरंसाट कर्जाच्या फेडीसाठी दे आपली सारी जमीन खरेदी लिहून, असा पेच टाकला. चंद्रभानजीचे डोळे खडाड उघडले. त्याच्या डोळ्यापुढे अंधारीच आली. सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले. त्याने ५६ एकर जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतायची त्याला मुभा मिळाली. सावकारशाहीची जादू डेबुजीला किंवा घरात कोणालाही ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही. शेताचे धान्य कपाशीचे पीक तर घरात महामूर येते, पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या डोळ्यांसमोर घेऊन जातात का नि कशाला? याचा डेबुजीला बरेच दिवस काही थांगच लागेना. घरा समोर कपाशीचा पर्वत उभा रहावा. धान्यांचे डोंगर एकावर एक चढावे आणि एकाद्या दिवशी उठून पहावे तर आंगण मोकळे! अखेर चंद्रभानजीच्या गहाणाचे बेण्ड गावात फुटले. गावात ही कुजबूज उठली. घरंदाज म्हणून मिरवणाऱ्या शेतकरी पुढाऱ्याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट. वरचेवर सावकराकडून रोख रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे, खर्चासाठी रोकड रकमांची तंगी पडू लागली. अंगा वरच्या नित्याच्या खिडूक मिडूक दागिन्या शिवाय बासनातले ठळक नद दूरगावी नेऊन त्यांचे टक्के करण्याचा चंद्रभानजीने तडाका चालू केला. त्याची प्रकृती ही ढासळत गेली. अखेर विपत्तीची विषारी नजर गोठ्यातल्या गोधाकडे वळली.

• डेबूजीचे गोधनावरचे प्रेम :

डेबुजीच्या चरित्राचा श्री गणेशाच गोधनाच्या संगतीत नि गो सेवेच्या संगीतात झाल्यामुळे, ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्त्व त्याच्या मनावर खोल कोरले गेलेले होते. गो रक्षणाचे मूळ बीजच त्याने हेरले होते. औताच्या बैलांची तर तो स्वतः च्या प्राणा पलीकडे निगा ठेवीत असे. गायीला गोऱ्हा झाला का डेबुजी त्या गाईची धार काढायचा नाही. सारे दूध गोऱ्ह्याला पिवू द्यायचा. कोणाला काढू ही द्यायचा नाही. लहानपणी गोऱ्ह्यांना भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडा पेराने बळकट ताकदवान बनतात. अशा २ - ३ खोंडांना भरपूर दूध पाजून त्याने नमुनेदार बैल बनवले होते. सावकार शाहीच्या पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गोऱ्हे विकण्याचा प्रश्न काढताच डेबुजीने जीव देईन पण माझे खोंड विकू देणार नाही, असा खडखडीत प्रतिकार केला. खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे, असा आग्रह पडताच, डेबुजीने करड्या आवाजात आजोबाला नि मामाला बजावले - "दोनच काय तीन ही गोऱ्हे टाका विकून. पण त्या म्हाताऱ्या बैलाला मी विकू देणार नाही. जन्मभर त्याने तुमचे काबाड कष्ट केले. हजारो रुपयांचे धान्य पिकवले. तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव सांभाळला. पोटच्या पोरासारखा आज वर त्याला पाळला, पोसला नि राखला. आज तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय माणुसकी झाली? म्हाताऱ्या बैला प्रमाणे उद्या म्हाताऱ्या माणसांची ही अडगळ घरातलं काढायला लोक सवकतील, तर त्यांचे हात कोण धरणार? तो बैल विकाल तर उद्यापासून मी औताला जाणार नाही, मला घरात ठेवा नाहीतर हुसकून द्या. कुठे ही चरा घरं भीग मागून पोट भरीन, पण असा कसायी खाना मला परवडणार नाही."

• मामा, घाबरता कशाला? :

डेबुजीचे म्हणणे किती ही खरे असले तरी त्याने कर्जाचा बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता? चंद्रभानजी तर अगदी टेकीला आला. डेबुजीने त्याला धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, - "मामा, आपण उपाशी राहू. अंगावर कपडा घालणार नाही. सणवार करणार नाही. मुला बाळांसह खूप कष्ट करू आणि आपल्या माय पोट शेतीच्या पिकांवर या सावकारी पाशातून मोकळे होऊ. पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही अशी शपथ घ्या. खोटे नाटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला सपशेल फसवलंय. चांगल्या हिशेबी माणसाकडून त्याचे हिशेब तपासून घ्या नि खोट्या नाट्याची सरकारात फिर्याद लावा. बाकीचे मी पाहून घेतो." झालंय कधी असं? फिर्याद? कुळाने सवाकरावर लावायची? खोट्या हिशेबा बद्दल? झालंय कधी असं? शेतकऱ्याचे म्हणणे किती ही खरे असले, तरी न्याय मंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते. आणि कागदांवरच्या आकड्यातच सावकारी कोलदांड्याची सारी शहामत सामावलेली असते. सावकारी आकडे मोडीमुळे चांगले शिकले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात. तिथे जन्माचे अडाणी नि नाक्षर अशा नांगरड्यांचा काय पाड? कर्ज फेडीसाठी शेती उमाप पिकवण्याचा डेबुजीचा अट्टहास चालू असतानाच, चंद्रभानजी ताप घेऊन झुरणीला लागला आणि थोड्याच दिवसांत मरण पावला. हंबीररावचे घरच बसले. घरात विधवा सून नि एक लहान नातू बळिराम. सगळा भार डेबुजीवर पडला.

• शेतकरी छोटा ना मोठा :

आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही. खोट्या नाट्याचा मुलाहिजा राखायचा नाही. हा डेबुजीच्या स्वभावातला एक महान गुणधर्म आज ही त्याच्या चारित्र्याचा एक तेजस्वी पैलू म्हणून सांगता येतो. आता शेतावर सखुबाई, मामी, आजा, आजी, बळिराम आणि कुंताबाई सगळेच जातीने काम करू लागले. कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायला सगळे घर एकजुटीने लागल्यामुळे, डेबुजी वट्टीची शेती दापुरे पंचक्रोशीत नमुनेदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत भरण्या सारखी पिकायची. आजवर गडी नोकरांकडून शेती करवी. आता आपण स्वतः कसे राबायचे? असला किंतू आजा आजी मामी आईच्या मनात डोकावू लागताच, डेबुजी म्हणाला - "शेतकरी कधी मोठा नसतो नि छोटा पण नसतो. तो फक्त शेतकरीच असतो. शेतीच्या मातीत कष्ट करावे नि मातीतून सोने काढावे, एवढेच त्याचे काम, तोच त्याचा धर्म नि जमीन त्याचा देव. बाकीचे सारे देव धर्माचे चोचले थोतांडी. श्रीमंती गरिबीचे काय घेऊन बसलात? ढगाची साळवटं ती. येतात नी जातात. श्रीमंतीची मिजास कशाला नी गरिबीची लाज कशाला? मनगटं घासून कामं करावी. मिळेल तो ओला कोरडा घास अभिमानाने खावा आणि जगात मान वर करून वागावे. पूर्वी आपण कसे होतो नि आज कसे झालो, हव्यात कशाला शेतकऱ्याला त्या भानगडी?"

• मेहनती दिलगी, चोरटे हुशार :

सालोसाल शेती पिकवावी आणि सावकाराने कर्जाच्या पोटी कापूस - धान्यांचे पर्वत डोळ्या देखत उचलून न्यावे. वर्षभर काबाड कष्ट करून अखेर पदरात काय तर खळ्याच्या मातीत पुरलेले नि उरलेले धान्याचे दाणे टिपावे, नदीत नेऊन धुवावे आणि पोटासाठी घरी आणावे. करडीचे मातेरे स्वच्छ करून त्याचे घरीच तेल काढावे. धड दिवठाणाला पुरायचे नाही ते, तर खायला कुठचे? म्हातारा हंबीरराव खचत चालला ही अवस्था पाहून. डेबुजी त्याची समजूत घालायचा. "हे पहा आबाजी, आधी पण सावकाराच्य पेचातून मोकळे होऊ या. मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण जोवर ही कर्जाची अवदसा आपल्या मानेवर आहे तोवर अमृत खाल्ले तरी आंगी लागणार नाही." जगात मोठा साधू कोण? घरात मनस्वी कष्ट असताना ही डेबुजी बैलांच्या दाणा वैरणीचे हाल चुकून सुद्धा होऊ द्यायचा नाही. आपण उपाशी रहावे पण ज्यांच्या मेहनती वर आपली शेती पिकते, त्या मुक्या जनावरांचा घास तोडू नये, हा सिद्धांत त्याने कसोशीने पाळला. बैलांना तो जगातले खरे संत साधू म्हणून पूज्य मानायचा. त्यांना धुवून पुसून गोंजारल्यावर तो त्यांना दोन हात जोडून पूज्य भावाने नमस्कार करायचा. शेती किंवा शेतकरी यांच्या पेक्षा जगावर बैलांचे उपकार फार मोठे आहेत. रात्रं दिवस कष्ट करून जो जगाला अन्न देतो, सुख देतो, तोच खरा साधू. हा डेबुजीच्या मनीचा भाव जही त्याच्या चारित्र्यात अपरंपार उफाळलेला दिसून येतो.

• बाप दाखव, नाहीतर.... :

डेबुजी नाक्षर खरा, पण त्याची व्यवहारी नजर मोठी चोख आणि करडी, पीक काढले किती, सावकाराने नेले किती, त्याची चालू भावाने किंमत किती, याचा बिनचूक अंदाज बांधून, त्याने तिडके सावकाराची भेट घेतली आणि हिशेब दाखवा आणि पावती करा, असा आग्रह केला. त्याने अनेक वेळा थापा दिल्या, होय होय म्हटले, सबबी सांगितल्या, पण हिशेबाचा किंवा पावतीचा थांग लागू दिला नाही. मामाचे सर्व कर्ज व्याजासकट फिटून उलट तुमच्याकडेच आमची बाकी निघते, असा डेबुजीने उलटा पेच मारला. पुष्कळ दिवस अशी माथे फोड केल्यावर, एक दिवस डेबुजीने त्याला सरळ हटकले. "हिसेब दाखवून फेडीची पावती देत नसशील, तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आलास तर तंगडी छाटून लंबा करीन. याद राख. गाठ या डेबुजीशी आहे. भोलसट चंद्रभानजी मामाशी नाही."

• आलाच अखेर तो प्रसंग :

सावकाराने हिशेबाच्या आकड्यांची उलटा पालट करून सगळी शेती गिळंकृत करणारा कर्जाचा आकडा डेबुजी पुढे टाकला. हा खोटा आहे, मी मानीत नाही, असा त्याने करडा जबाब दिली. उद्या आणतो तुझ्या साऱ्या शेत जमिनीवर टाच, असा सावकराने दम भरला. ठीक आहे, आणून तर पहा. असा सडेतोड जबाब देऊन डेबुजी परतला. वाटेत पूर्णा नदीच्या काठच्या त्या जमिनी जवळ येताच त्याला ब्रह्मांड आठवले. "ही माझी जमीन. माझी लक्ष्मी. इतक्या वरसं सेवा केली हिची आम्ही सगळ्यांनी. घामा बरोबर चरबी गाळली आणि उद्या तो सावकार कायदे बाजीने हिसकावून घेणार काय आमच्या हातातनं? पहातो कसा घेतो ते." सगळी जमीन सावकाराच्या घरात जाणार, ही बातमी कळताच हंबीररावाच्या घरात रडारड झाली. डेबुजीने धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. मूळचा जरी तो नाक्षर तरी व्यवहाराच्या टक्क्या टोणप्यांनी त्याला मिळाले व्यवहाराचे ज्ञान पढिक पंडितांच्या शहाणपणा पेक्षा अधिक कसदार होते. "माझी बाजू सत्याची नि न्यायाची आहे. सावकारशाही नि कायदेबाजी किती ही धूर्त नि चाणाक्ष असली तरी ही मी त्यांना पुरून उरेन. अन्यायाचा प्रतिकार काय नुसत्या कोर्ट बाजीनेच करता येतो? शेताची माती कसण्यात कसदार बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यांनी कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या आणि गोर गरिबांनी ठोशांनी न्यायाचा ठाव घ्यावा" इतक्या कडे लोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली. पांचशे कोसात सावकाराचा दरारा सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजाऱ्याने डेबुजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला - "डेबुजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदळीच्या दारी झुले हत्ती. वाघाच्या तडाक्यातनं माणूस एकाद वेळ शीर सलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं? छे! नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महा कर्दनकाळ.

• पांचशे कोसात याचा दरारा :

गाभणी गाभ टाकते." डेबुजी - अरे मोठा वाघ का असे ना तो. चौदा वरसं शेत आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कबजा घेऊ देणार. वेळच पडली तर अस्तन्या वर सारून करीन काय वाटेल ते. सोनाजी - डेबुजी, हा आततायीपणा काही कामाला येणार नाही. अरे, खैरी गावचे नि आपल्या इथले जाठ लोक म्हणजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची प्राज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांची ही हड्डी पिळून मळून त्यांना गोगलगाय करून टाकलंय. पहातोस ना? मग तुझा एकट्याचा रे काय पाड? तुझ्या मागं आहे कोण? येणार कोण? या भानगडीत तू पडू नये हे बरं. म्हाताऱ्या हंबीररावने ही सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. "पोरा, काय चालवलंयस हे तू. शेताचा कबजा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटंल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ हे माझ्या गळ्याची, या गावात आपल्या बाजूचे कुणी नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडा नाही. कशाला घेतोस बाबा समर्थाशी होड? व्हायचं असंल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडं भरला दरा तो गाव बरा समजून हवं तिथं जाऊ, कुठं ही दोन कपडं धुवून पोट भरू. पण या सावकाराला आडवा जाऊ नको रे बाबा."

• धरा त्याला... काढा बाहेर :

डेबुजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजू बाजूला जमा झाला. डेबुजी मोठ्या पहाटेलाच शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखूबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८ च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७ - ८ औत, बैल, नांगऱ्ये, ९ - १० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. जुंपा रे आपले बैल, घाला शेतात नांगर आणि तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा. सावकाराने आरोळी दिली. आजू बाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबुजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव व सखुबाईने रडकुंडी येऊन डेबुजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. धरा त्याला, काढा बाहेर, डेबुजी या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला "हनमंत्या, हो पुढे. हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेता बाहेर." असा निर्वाणीचा हुकूम केला.

• जा गुमान मागं, नाहीतर :

हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भइडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून, "हनमंत्या" डेबुजी गरजला. "तुझ्या जिवाची तुला पर्वा नसंल, पोरा बाळांची आशा नसंल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आता जिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेलास समज तू. तुझ्यामागं तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुमान मागं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे." हनमंत्या कचकला नि जागच्या जागी थबकून उभा राहिला. सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपर खळीच्या ताख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुसऱ्याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेऊन. कसा घरी जिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. जाता की नाही इथनं सारे? जीव घेऊन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहून बघ्यांची ही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्या पूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दांनो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही असा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली.

• अजि म्यां ब्रह्म पाहिले :

यमाचा काळदण्ड सावित्रीने आपल्या स्वयं भू तेजाने जसा अचानक परतवला, तसलाच प्रकार हंबीररावच्या डेबुजी नातवाने केलेला पाहताच सावकारशाही वचकाचा शेकडो वर्षांचा फुगाच फुटला. अरेच्चा, सावकाराला असा आडवून तुडवता ही येतो म्हणायचे? हा नवाच पायंडा डेबुजीने वऱ्हाडच्या शेतकरी जनतेला प्रथमच शिकवला. बिचारा तिडके सावकार ही सपशेल पाणथळला. डेबुजीचे उदाहरण उद्या बाकीच्या शेतकरी कुळांनी गिरवले तर आपले काय होणार? या भीतीने त्याच्या तोंडचे पाणी पळाले. डेबुजीला आवरा म्हणून उपदेश करणारी मंडळीच आता त्याची पाठ थोपटायला हंबीररावाकडे धावली. माणसातला कर्दनकाळ म्हणून पिढ्यान पिढ्या गाजलेला सावकाराचा दरारा डेबुजीने एकाच थपडीत मातीमोल केल्यामुळे, पुढे तडजोडीचा मार्ग बंद झाला. दापुरी गावात यायलाही त्याला तोंड राहिले नाही. काही दिवस गेल्यावर, तिडके सावकाराने मध्यस्थांची परवड घालून डेबुजीशी तडजोड करण्याची खूप तंगड झाड केली. "ज्याचा दाम खोटा असेल त्याने सावकाराच्या कोर्ट कचेरीच्या दरडावणीला भ्यावे. माझा हिशेब उघडा नि चोख आहे. वसूल घेतो नि पावती देत नाही? पटवीत नाही? आणि गुमान येतो जमीन कबजा घ्यायला? त्या जमिनीचे मामानी रोख पैसे दिले तरी खरेदी खत केले नाही. काय, कायद्याला डोळे आहेत का फुटले? कायदा काय असा चोरांना पाठीशी घालतो होय. जा म्हणावं तुलाकाय करायचं असंल ते करून घे. आम्ही त्याची एक दिडकी लागत नाही." डेबुजीच्या या बोलण्याला कोणाला ही खोटे पाडता येई ना. अखेर मूळ मालक म्हातारा हंबीरराव याला कसा बसा मथवून, सावकाराने गहाण जमिनी पैकी १५ एकर जमीन परत देऊन, आता काहीही देणे राहिले नाही, अशी दुकान पावती देऊन वांधा मिटवला. हंबीरराव, सखुबाईला आनंद झाला, पण "तुमचे तुम्ही मालक आहात. मी एक तसूभर सुद्धा तुकडा त्याला दिला नसता." हे डेबुजीचे तुणतुणे कायम राहिले. उपाशी रहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नकारे बाबानो, ही गाडगे बाबांची प्रत्येक कीर्तनातली आरोळी लक्षावधि लोकांनी आजवर ऐकली नि रोज ऐकतात. तिच्या मागे हा जुना इतिहास आहे, हे त्यांना आता तरी नीट उमजावे म्हणून या कथेचा किंचित विस्तार करून सांगितली.

• डेबूजीचा देवीसिंग झाला :

सावकार - सापाचे नरडे दाबून सर्वस्वाचा मणि त्याच्या मस्तकातून खेचून काढण्याच्या अपूर्व यशाने दापुरी पंचक्रोशीत डेबुजीला गावकरी नि शेतकरी मोठा मान देऊ लागले. ते आता त्याला देवीसिंग या बहुमान वाचक नावाने संबोधू लागले. एक वर्षातच हंबीररावच्या घराण्याची कळा बदलली. कपाशी, ज्वारी, गहू, जवसी, करडी, तुरीचे पीक ही महामूर आले. अंदाजे एक हजार रुपयांची लक्ष्मी घरात आली. आंगणात धान्यांचे कणगे उभे राहिले. धन धान्य कपडा लत्ता, दूध दुभते यांची चंगळ उडाली. गावकीच्या हरएक भानगडीत लोक डेबुजीला सल्लाम सलतीसाठी मानाने बोलवायचे. या बदलामुळे डेबुजी गर्वाने ताठून

न जाता, उलट पहिल्या पेक्षा अधिकाधिक विनम्र होत गेला. सहज नुसती कोणी हाक मारली तरी नमस्कार करून "काय आपली आज्ञा आहे" अशी लीनतेने तो वागायचा. गावात येणाऱ्या भिकाऱ्या दुकाऱ्यांची, संत गोसाव्यांची, भजन कीर्तनकारांची विचारपूस करून त्यांच्या सर्व गरजा भागवायचा. आपण जे श्रम करून कमावतो त्यात गोर गरिबांचा नि गरजू लोकांचा भाग असतोच असतो. आपण घास घेण्यापूर्वी घरचा दारचे ढोर, कुत्रे - मांजर सुद्धा उपाशी राहता कामा नये. आधी दारचे अतिथी अभ्यागत यांची सोय नि मग आपम. देवाला नैवेद्य दाखवायचा तो असाच दाखवला पाहिजे. ही त्याच्या मनीची भावना असे. सुबत्ता आली म्हणून त्याच्या शेतीच्या कष्टात हयगय झाली नाही. उलट, आजा, आजी, मामी, आई यांसह कामाचा जोर वाढवला. आता ही हा शेतीसाठी नोकर का ठेवीत नाही, याचेच लोकांना नवल वाटायचे.

• अन्यायाची चीड :

गावात नाम सप्ताह व्हायचे. आंधळे पांगळे आणि अस्पृश्य टोळ्यांच्या टोळ्या अन्नसाठी गावा गावाहून धावायच्या. नेहमीचा प्रघात काय, तर सगळ्यांची जेवणे झाल्यावर उरलेले खरकटे उष्टे त्या अन्नार्थी गरिबांवर दुरून झुगारायचे. डेबुजीला हा किळसवाणा बेमाणुसकीचा प्रकार सहन झाला नाही. देवाचा महाप्रसाद नीटनेटका, स्वच्छ असा आपणच गावकऱ्यांनी तेवढा खावा आणि त्या गोर गरिबांच्या नशिबी काय खरकटे उष्टे असावे? ती काय माणसे नव्हत? चांगलं गोड धोड आपल्याला मिळावं असं त्यांना वाटत नाही होय? त्यांना खरकटे चारण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? ते काही चालणार नाही. गावकीचा महाप्रसाद त्यांना नीट पंगतीला बसवून तुम्ही खावू घालीत नसाल तर मी तुमच्यात भाग घेणार नाही. माझ्या घरी निराळा सैपाक करून मी त्यांची हवी तशी सोय लावीन आणि स्वतः त्यांच्या पंगतीला बसून प्रसाद भक्षण करीन असा सडेतोड खुलासा करताच गावकऱ्यांचे डोळे उघडले. लोकांची कांकूं पाहताच डेबुजीने आपल्या घरी ताबडतोब चांगल्या पक्वान्नांचा बेत करू सर्व जमलेल्या अंध, पंगू, महारोगी आणि अस्पृश्य बांधवांना घरच्या अंगणात पंक्तीने बसवून पोटभर जेवू घातले. विचारवंत म्हातारे कोतारे म्हणू लागले, "अरे हा डेबुजी आपल्यातला एकनाथ आहे रे एकनाथ" आता काय?

• मटण दारूची चंगळ! :

डेबुजीचे साधुतुल्य चरित्र आणि चारित्र्य पंचक्रोशीत गाजत वाजत असतानाच सौ. कुंताबाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. सखुबाईला पृथ्वीवर स्वर्गच आल्यासारखे वाटले. मुलाच्या बाजूने नाही तरी मुलीच्या बाजूने पण तंडवाचे तोंड पाहिले म्हणून म्हातारा हंबीरराव नि रायजाबाई आंदाने नाचू लागले. डेबुजीला मुलगी झाल्याची बातमी पंचक्रोशीत फैलावताच, गोतावळ्या जमात वाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आता काय! बाशाच्या दिवशी डेबुजीकडे मटण दारूचे पाट वाहणार! या आशेने जो तो आमंत्रणाची वाट पाहू लागला. परटाच्या आयुष्यात तीन बळी. ही एक म्हणच प्रचारात होती. गरीब असो वा कोणी असो, जन्म, लग्न नि मरतिकीच्या प्रसंगी बोकडाची कंदुरी आणि मन मुराद दारू जात गोतवाल्यांना दिल्या शिवाय चालत नसे. मोठ्ठा जात धर्मच होता तो. कर्ज काढून, भीक मागून हे देव कार्य करावेच लागे. न करील तो पडलाच वाळीत. रूढी प्रमाणे हंबीररावाने बोकडाची कंदुरी नि दारूचा बेत ठरवला. त्याचा घरात खल सुरू होताना सखुबाई कुरकुरू लागली. तिला आपल्या नवऱ्याचे मरण कालचे ते शब्द आठवू लागले. त्या सगळ्या दुर्दैवी घटनांचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे भराभर सरकू लागला. डेबुजीच्या कानावर हा बेत जाताच त्याने तडाड नकार दिला. "आज वर आपल्या घरात चुकून सुद्धा जे आपण कधी केलं नाही, ते काय आज करणार? भले जात गोतवाले रागावले तर. प्रसंगाला आले का कुणी धावून आमच्या? आमचे आम्हालाच निपटावे लागले ना? बारशाला मटण दारू द्यावी, असं कुठच्या धर्मात सांगितलंय? जगा वेगळा धर्म आहे हा. मला नाही तो पसंत. आपल्या घरात मटण दारू बंद. कायमची बंद. काही चांगलं गोड धोड करून घालू गोतावळ्यांना मेजवानी." जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही. गोतावळी मंडळी जमली. पाने वाढली. पण दारूचा वास तर कुठेच येत नाही? हे काय? पानावर पाहतात तो बुंदीचे लाडू वाढलेले! एक पुढारी गरजले - "काय हो हंबीरराव, हा काय जगा वेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू? मटण दारू नाही? जात गोताची रूढी मोडता? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म.

• जात कुळीला बट्टा लावलात तुम्ही :

चला उठा रे. कोण असले जेवण जेवतो? बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबुजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले त्याच्याशी. सगळे जण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेडूतांत असा प्रसंगी खूनही पडतात. अगदी शांतपणाने पण निश्चयाने डेबुजी एकेक शब्द बोलू लागला. "बाप हो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही. आपल्या अडाणीपणाची नि जिभलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू बामण. ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला नि मरतिकीच्या तेराव्याला सुद्धा ते गोडधोड पक्वान्नांच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही, असं का म्हणणं आहे तुमचं?" पुढारी - बोकड मारला नाही, दारू पाजली नाही, तर मुले जगत नाहीत. डेबुजी - कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनचंच ठरवलंय सगळं. मारवाडी, गुजराथी किती श्रीमंत असतात! खंडी दोखंडी बकरी मारण्याच्या ऐपतीचे असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही. दारू पाजली नाही. म्हणून काय त्यांची मुले बाळे जगली नाहीत? त्यांचा काय निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाट वाहवणारे आपण पहा. काय आहे तुमची सगळ्यांची दशा? शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली, संध्याकाळची पंचीत. या मटण दारूच्या पायी घरेदारे, शेतीवाड्या सावकरांच्या घरात नेऊन घातल्यात, तरी डोळे उघडत नाहीत. विचार करा माय बाप. भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुसऱ्या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरीही पुन्हा हत्याच! हा काय धर्म समजता? चला बसा पानांवर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा नि घरोघर जा. मटण - दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे. या शांत पण कट्टर निश्चयी बोलण्या परिणाम चांगलाच झाला. एकाला ही त्याचे म्हणणे खोडून काढता येई ना. सगळे गातोवळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूंची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीत काय, पण हां हां म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याच्या कुशलतेतच समाज - सुधारकाची खरी शहामत असते. गाडगे बाबांच्या चरित्रातला हा पैलू आज ही प्रखरतेने जनतेला दिसत असतो.

• लोकसेवेचा प्रारंभ :

शेतीवाडी धनत्तर पिकत आहे, गुराढोरांनी गोठा गजबजलेला आहे, चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे, भरपूरपैसा घरात येत आहे, समाजात मान्यता वाढती आहे, असा स्थितीत ही डेबुजी लोकहिताची कामे स्वयं सेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून कुदळून नीट करायला कुदळ पावडे घेऊन डेबुजी स्वतः काम करीत रहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटले. पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावकऱ्यांना शिकवला. कोठे घाण - कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेही काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसेल तेथे आपणहून चांगले करावे. त्यासाठी पदरमोडही करावी. हा खाक्या. कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबुजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असू मानू लागले.

• डेबुजीची आत्यंतिक भूतदया :

वाटेने जाताना जरा कुठे कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबुजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाताऱ्या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का याने ती फोडून द्यावी. ओझ्या खाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्य डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. वऱ्हाडात गाडीच्या बैलांना पराण्या चोटण्याचा प्रघात फार असे. डेबुजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतकऱ्याला हटकायचा, "बाप्पा हे काय चालवलंयस? त्या मुक्या जनावराला ना बोलता येत ना रडता ना बोंबलता. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसे रे वाटंल तुला? मुक्या जनावरांचा असला छळ देवा घरी पाप आहे." वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबुजीने अशी कान उघडणी केल्यामुळे, त्या पराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला. बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा फार चाले. "ज्या गो मातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोरा बाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडा मासाचे टक्के घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसं का भुतं? तुम्हाला कुणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातली नसती अडगळ म्हणून दिलं उकीरड्यावर टाकून, तर कसं बरं वाटंल मनाला?" असा उपदेश करून तो त्या गो विक्रीला आडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जावून सौदा मोडायचा. जनावरांना रोग झाला का अडाणी शेतकरी औषधोपचारा ऐवजी ठराविक भगताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत चिक्कार दारू ढोसून अंगारे धुपारे करीत त्या ढोरा भोवती आरोळ्या मार मारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भगताचा देव खरा. मेले तर आपले नशीब. 'लई विलाज केला' म्हणत हळहळणाऱ्यांना डेबुजी धिक्काराने म्हणायचा - "अरे रोग म्हंजे रोग. तो हा देव घुमव्या भगत काय कपाळ बरा करणार? तो काय ढोराचा डाक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डाक्टरांचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथं न्यावं. म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपार नि दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कुणाचं बरं यानी? ढोरा बरोबर तुमचं ही वाटोळं होईल असल्या फंदानं."

• संसारातून समाजाकडे :

पहिली मुलगी अलोका नंतर २ - २ वर्षांच्या अंतराने कलावती मुलगी आणि मुद्गल नावाचा एक मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखुबाई निपटायची. डेबुजी तिकडे ढुंकून ही पहायचा नाही. शेती नि लोक सेवा यात तो अखंड गढलेला. जस जसे दिवस जात गेले तस तसा त्याच्या आचार विचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, तो एका विशेष दृष्टिकोणातून सभोवारच्या समाज जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे. संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत राहायचे काय? जन्माला आल्या सारखे मला आणखी काही करता येण्या सारखे नाही काय? 'आणखी काही' म्हणजे तरी काय त्याचे त्याला ही उमगे ना. माझे सर्व काही ठाकठीक चालले असले म्हणजे आजू बाजूला ही सब कुठ आल्बेल है असे थोडेच? जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजोऱ्या फुगवून कष्टकरी, शेतकरी स्वतः अन्न वस्त्राला महाग. अन्याय, लाच लुचपत, पैसासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुसऱ्याचे गळे कापणारे महाजन! अन्यायाला, खोट्या नाट्याला प्रतिकार करायचीही हिंमत कोणात नाही. अनेक घाणेरड्या रूढी, देव कार्यातले अत्याचार, गांजा - दारूचा भरंसाट फैलावा, देव धर्माच्या नावावर हज्जारो पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली. कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी! पायात संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काही तरी केलं पाहिजे खरं. हरकत नाही तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्ची घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबुजी रात्रं दिवस बहरलेला असे.

• कोण बरे ती विचित्र विभूती? :

मार्गशीर्षाचा महिना, खरीब नि रब्बीची पिके भरघोस डुलत होती. पाखरे हुसकावण्यासाठी डेबुजी मचाणीवर उभा राहून जोरदार हारळ्या मारीत असताना, भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हात दूर समोरून एक विचित्र व्यक्ती खैरी गावाच्या बाजूने हळूहळू चालत येताना त्याला दिसली. धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी. चमकती अंगकांती, दाढी मिशा जटाभार वाढलेला. अंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी. अनवाणी चालत शेतातली ज्वारीची कच्ची कणसे खातखात स्वारी आपल्याच तंद्रीत रंगलेली आस्तेआस्ते जवळ येताना दिसली. साधू संतांचा डेबुजीला आधीच मोठा आपुलकीचा कळवळा. ती विभूती माची जवळ येत आहेशी दिसताच डेबुजीने खाली उडी मारली. दोन हात जोडून सामोरा गेला नि साष्टांग प्रणिपात घातला. त्या विभूतीने दोन हात उंचावून आशीर्वाद दिला. दोघांची नजरा नजर झाली. डोळ्यांना डोळे भिडले. तेवढ्यातच परस्परांच्या हृत्भावनेची काय गूढ देवघेव झाली, सांगता येत नाही आणि गाडगे बाबा ही आज सांगत नाहीत. "महाराज, आपल्याला काय हवे?" असे डेबुजीने विचारताच त्या विभूतीने हासण्याचा खोकाट केला नि म्हटले - "कुछ भी नही. हमारे पास सब कुछ है. तू क्या मंगता है? मै दे सकता हूं. मंगता है कुछ? चल हमारे साथ. आता है?" मंत्रमुग्धा प्रमाणे डेबुजी त्याच्या मागे यंत्रा सारखा आपोआप जाऊ लागला. नदीच्या काठावर गेल्यावर, महाराजांनी थोडे भोजन करावे, अशी डेबुजीने प्रार्थना केली. "ठीक, ठीक, तेरी इच्छा हो तो लाव, लाव सामान." डेबुजी धावतच खैरी गावात गेला. कणिक, गूळ, साखर, तिकट, मीठ, तेल, तूप आणि एक कढई घेऊन आला. त्या विभूतीने ते सर्व पदार्थ एकत्र कालवून तो गोळा तेलात तळून काढला. "जा आता, ही भांडी ज्याची त्याला नेऊन दे." म्हणून सांगितले. डेबुजी गेला. परत आल्यावर विभूती भोजन उरकून त्याची वाट पहातच होती. थोडा प्रसाद ठेवला होता तो डेबुजीने ग्रहण केला. नंतर दोघे दापुरी स्मशानातल्या शिव लिंगाच्या ओट्यावर जाऊन बसले. सबंध रात्रभर तेथेच राहिले. काय भाषणे झाली, कसले हृद्गत चर्चिले, याचा थांगपत्ता लागत नाही. बाबा ही तो आज लागू देत नाहीत. कोणी खोचून विचारले तर "छे, असी कोणी विभूती मला भेटलीच नाही" असे धडकावून सांगून मोकळे होतात.

• डेबीदास कहां है? :

सबंध रात्र त्या विभूतीच्या सानिध्यात काढून दुसरे दिवशी १२ वाजता डेबुजी घरी परत आला. जेवण होताच जरूरीचे काम निघाले. म्हणून बैलगाडी जोडून तसाच दर्यापूरला निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला सारे दापुरी गाव डाराडूर झोपी गेले असताना, तो साधू "डेबीदास... डेबीदास... डेबीदास" अशा मोठ मोठ्याने हाका मारीत गावात फिरू लागला. लोक घाबरून बाहेर आले. पहातात तो एक जटाधारी नंगा दांडगा गोसावी नुसता डेबीदास... डेबीदास आरोळ्या मारीत आहे. पाटील आले. चौकशी केली. "कहां है डेबीदास?" तो गोसावी विचारू लागला. आपल्या गावात कोण कुठचा डेबीदास? सगळे ढोंग आहे हे. हा दरोडेखोरांचा सोंगाड्या सुगावेदार असावा. द्या हुसकावून चोराला. पाटलाने महार जागल्यांना बोलावून त्याला सीमापार हुसकावून दिले.

• बाबानो, काय केलंत हे? :

दुसऱ्या दिवशी सकाळी डेबुजी दर्यापुराहून परत येताच त्याला आदले रात्रीची ही हकिकत समजली. तो मटकन खाली बसला नि फुंदफुंदून रडू लागला. सखूबाईने आजा आजीने खूप खोद खोदून विचारले. शेजारी पाजारी जमा झाले. बराच वेळ तो बोले ना. अखेर, "बाबानो, डेबीदास तो मीच. माझाच शोध करीत तो आला होता. हुसकावलात त्याला? काय केलंत हे?" असा त्याने खुलासा करताच सगळ्यांनाच वाईट वाटले. डेबुजी तसा उठला. स्मशाना जवळच्या महादेवाच्या ओट्यावर नि आसपास खूप तपास केला. खैरी गावात शोध घेतला. आजूबाजूची पाच पन्नास गावे तो सारखा आठवडाभर विचारपूस करीत भटकला. असा कुणी माणूस इकडे आला नाही नि आम्ही कोणी पाहिला ही नाही, असेच जो तो सांगे.

• गाडीचा सांधा बदलला :

या घटनेनंतर डेबुजीच्या राहणीत नि वृत्तीत एकदम बदल झाला. रोजची ठरावीक कामे यंत्रा सारखी करीत असताना तो कसल्या तरी गूढ चिंतनात गुंगलेला असायचा. पौषाचा महिना. दर रविवारी ऋणमोचन येथे या महिन्यात एक छोटीशी यात्रा भरत असे. दर सालच्या हंबीररावच्या घराण्याच्या रिवाजा प्रमाणे पौष व. ८ शके १८२७ रविवार (ता. २९ जानेवारी सन १९०५ रोजी) डेबुजी सहकुटुंब सहपरिवार ऋण मोचनला गेला. यानंतर त्याची मुग्धावस्था वाढतच गेली. भावी आचाराची काही तरी निश्चित रूपरेषा त्याने मनोमन आखली. चर्येवर गंभीर महासागराची शांती आणि नजरेत कठोर निश्चयाची चमक झळकू लागली. एकदम घडलेल्या या फरकाने घरातली मंडळी चरकली खरी, पण खुलासा काढण्याचे धैर्य कोणालाही होईना.

• चालू काळचा सिद्धार्थ :

बुधवात ता. १ फेब्रुवारी सन १९०५, पौष व. १२ प्रदोष शके १८२७ पहाटे ३ वाजता डेबुजीच्या त्या लोकोत्तर जीवन क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछान्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसाळीने एकदम तो उठला. मातोश्री सखूबाई निजली होती तेथे हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचे दर्शन घेतले. तिच्या पायांजवळ जमिनीला डोके टेकून नमस्कार केला. बाहेर येऊन आंगा वरचे सर्व कपडे काढून ठेवले. नेसूचे एक फाटके धोतर पांघरून तो आंगणात आला. तेथे पडलेले एक फुटके मडके नि तोडलेल्या झाडाची एक वेडी वाकडी काठी हातात घेऊन, मागे न पाहता, सर्वस्वाचा त्याग करून झपाट्याने पार कोठच्या कोठे निघून गेला. पहाटेच्या साखर झोपेच्या गुंगीतच सगळे जण असल्यामुळे, त्याच्या या क्रांतिकारक प्रयाणाचा घरातल्या दारातल्या कोणालाही थांगपत्ता लागला नाही. आजवर अनेकांनी संसार त्याग केलेला आहे. त्याची कारणे अठराविश्वे दारिद्र्य, कर्जाचा बुजबुजाट, मुला बाळांचे मृत्यू, कर्कशा किंवा बेमान पत्नीशी पडलेली गाठ, कुटुंबात नि समाजात नित्य होणारी हेळणा, तिटकारा, बेकारी यांपैकी एक दोन हमखास असतात. पण डेबुजीच्या बाबतीत यातले कही कारण नव्हते. प्रामाणिक कष्ट मेहनत करून आजोबाची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून त्याने सुधारली होती. घरात धन धान्य, दूध दुभत्याचा सुकाळ होता. चार चौघात प्रतिष्ठा होती. घरात आज्ञा धारक पत्नी, दोन गोजीरवाण्या खेळत्या बागडत्या मुली. नातवंडांचे कौतुक करणारे आई, आजा, आजी हयात. गाई - बैल - वासरांनी गोठा गजबजलेला. मायेचा हात पाठीवर फिरवणारी आई पाठीशी सदानकदा उभी. असा भरभराटीच्या संसाराचा डेबुजीने केलेला त्याग म्हणजे कपिलवस्तू येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन राज वैभवाच्या त्यागाच्या अजरामर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटली पाहिजे. घरात रडारड झाली. गावकरी शोधासाठी दाही दिशांना गेले. काही तपास लागत नाही बुवा. सगळ्यांचा एकच जबाब आला.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : २ -
नव मानव धर्माच्या शोधात

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• संसार त्यागाच्या मागे काय होते? :

मामुली साधू संत मोक्षासाठी संसार त्यागासाठी भगत गणांना शिकवण देतात. डेबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम स्मरणाने भवसागर तरून जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा, ही संताळी विचार सरणी ही त्याने जुमानली नाही. आजही जुमानीत नाही. मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीचभर संसारातल्या आधी व्याधींची कोडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देव धर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दुष्ट आणि व्यसनी चाली रितींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जात गोतवाल्यांचा रोष ही पत्करला होता. देवाच्या नुसत्या नाम स्मरणा पेक्षा किंवा आराधाने पेक्षा मनगट घासून कष्ट मेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचार विचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट नि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणे नि धीटपणाने पायबंध ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांना पटवून ही दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याचा भरवसा ही होता. तरीही त्याची भक्ति आंधळी नव्हती. डोळस होती. वयाच्या २८ वर्षेपर्यंत जूबाजूच्य सर्व थरातील समाजांच्या सामिक नि धार्मिक जिण्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. शेतकरी कामकरी वगैरे मागासलेले समाज, हाड मोडी कष्ट करून सुद्धा कमालीच्या दारिद्रयात किड्या मंग्यांच्या जिण्याने जगत आहेत. सावकारादि वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून, त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत.

श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकार जीवनाची ना चिळस ना लाज. वरचढांच्या लाथा खाव्या, मरे मरेतो कष्ट करून त्यांच्या तिजोऱ्या भराव्या, आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरेदारे नि वाडे लिंपावे शृंगारावे, हाच आपला धर्म, हेच आपले जिणे, यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती! वरच्या खालच्या एकंदर समाजाची दैनंदिन स्थिति पाहिली तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली. धर्माचे आचरण पाहिले तर तेथे ही भूतदयेला थारा नाही. देवाला दारू, माणसांना दारू, रेडे बोकडांच्या कंदुरी शिवाय देवाची शांति नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजन कीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी. संतांचे बोल वतनदारीसाठी. संगीत सुराने वरच्या वर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूती सहकार नि सेवा या भावनाच हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल तिथे कोपराने खणावे नि स्वार्थ साधावा. आज वरच्या साधू संतांनी माणसांना माणुसकी शिकवण्यासाठी जान जान पछाडली. कोटि कोटि अभंग रचना केली. पंढरीच्या वाऱ्यांचा परिपाठ चालवला. विठ्ठल भक्तीचे लोण आब्राह्मण चांडाळांच्या झोपडी झोपडी पर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा झुगारता आला नाही. या परिस्थितीला आरपार पालटण्यासाठी काय केले पाहिजे? मला काय करता येईल? या मुद्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता.

• षड्रिपूंचे दमन कसे केले? :

सन १९०५ साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन १९१७ या बारा वर्षांच्या साधकावस्थेत डेबूजीने आपल्या देह मनाचा चोळामोळा करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कस कसे केले. त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील. या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भा वरच भागवणे जरूर आहे. घरातून बाहेर पडल्यावर डेबूजी २ - ३ दिवस सारखा चालतच होता. कोठे जायचे नि काय करायचे याचा काही विध निषेध नसल्यामुळे, पाय नेतील तिकडे, एवढाच कार्यक्रम. दापुरीपासून ४० - ४५ मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावा बाहेरच्या मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न बसतो तोच हा कुणी तरी दरोडेखारंचा टेहळ्या असावा, अशा समजुतीने गावकऱ्यानी नि पाटलानी उपाशी तापाशी गावा बाहेर हुसकावून दिला. पौषाचा महिना. वऱ्हाडातली थंडी, माणूस जागच्या जागी हात पाय काकडून कोलमडून पडायचे. किर्र अंधारी रात्र. काट्या कुट्यातून पाय नेतील तसा बिचारा डेबूजी वाट काटीत चालला. वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला. त्याने हात, पाय, तोंड धुतले. रिकाम्या पोटात अन्नाच्या ऐवजी पाणी रिचवले. थोडी हुशारी येताच शेजारच्या शेतातली ज्वारीची चार पाच कणसे तशीच कच्ची खाऊन वर पाणी प्याला. विसाव्यासाठी ओढ्याच्या काठीच मातीवर झोपेसाठी अंग टाकले. किर्र जंगल. आजूबाजूला श्वापदांचा सुळसुळाट. पण काही नाही. खुशाल तो डाराडूर तिथे झोपी गेला. झुंजुमुंजू होताच उठावे. दिवसा आढळतील त्या दहा पाच गावी भ्रमण करावे, एकाद्या घरी भाकरी तुकडा मागावा, मिळाल्यास खावा, नकार दिल्यास आणखी काही तरी मागावे, लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायला ही उठावे. हुसकावून द्यावे. यांच्या शांत वृत्तीवर लवभर सुद्धा परिणाम व्हायचा नाही. हुसकावले का पुढे जावे. या रीतीने गावांमागे गावे नि खेड्यांमागे खेडी धुंडाळीत डेबूजी कोठे कोठे भटकंती करीत जाई त्याचा त्यालाच ठाव ठिकाणा उमजे ना. दिवसा मागून दिवस गेले. दाढीचे नि डोक्याचे केस वाढले. जटा झाल्या त्यांच्या. अंगावर चिंध्या बाजल्या. नदी ओढा लागला का तेथे आंघोळ करावी नि त्याच धुतलेल्या चिंध्या ओल्याच अंगावर पांघरून पुढे चालू लागावे. अशा विचित्र थाटाने ही स्वारी एकाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुंक भुकून आधी त्याचे स्वागत करायची. मग गावची उनाड पोरे त्याच्या मागे ``वेडा आला रे वेडा आला’’ असा कल्होळ करीत मागे लागायची. दगड मारायची. हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हासत मुखाने तो सहन करायचा. त्याचे पाय सारखे चालतच असायचे. विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थाराच द्यायचे नाहीत. अर्थात विसाव्यासाठी सदानकदा किर्र निर्जन अरण्याचाच आसरा घ्यावा लागे.

• वनवासात ही लोकसेवा :

पाय नेतील तिकडे जायचे. हव्या त्या घरी भाकर मागायची. मिळेल तर कायची. नाहीतर पुढे जायचे. असल्या क्रमात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला पण होऊन मदत करायला धावायचे. हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे. सामानाने लादलेला खटारा चिखलात रुतून पडलेला दिसला का डेबूजी तेथे धावत जाऊन तो बाहेर काढायला गाडीवानाला मदत करायचा. त्याने कोण, कुठचा, काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे, दोन हातांनी त्याला नमस्कार करावा आणि मुकाट तोंडी आल्या वाटेला लागावे. हा खाक्या. आश्चर्याने तो गाडीवान पहातच रहायचा. देवच माझ्या धावण्याला पावला अशा समजुतीने तोही गाडी हाकीत निघून जायचा. वऱ्हाडचा सूर्य माध्यान्हीला माथ्यावर कडाडला आहे. पाय पोळताहेत. एकादी मजूर बाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मानमोड्या बोजा घेऊन चाललेली दिसली का डेबूजी तिच्या जवळ जायचा. दोन हात जोडून म्हणायचा : "माय माझी. दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर. चल मी तुझ्या मुकामावर नेऊन पोचवतो." विचित्र वेषाचा हा असामी पाहून ती बाई प्रथम भेदरायची. पण डेबूजी ओझ्याला हात घालायचा, स्वतःच्या डोक्यावर घेऊन घेऊन चालू लागायचा आणि तिला मुकामावर पोचवून, एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा. ती बाई आचंब्यात पहातच रहायची. आजू बाजूचे गावकरी सुद्धा म्हणायचे, "कोण असावा हा माणूस? आपल्या झिंगरीचे ओझे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडा ही न मागता खुशाल आपल्या वाटेने जातो? कुणी देव माणूस किंवा साधू असावा हा!" खेडे गावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीची आगरे. आजू बाजूला घाण पाण्याचे ओघळ वहायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायची. डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा. "मला पोहरा दोरी द्या हो माय बाप. मी पाणी काढून ढोरांना पाजतो." अशी त्याने विनंती करून पोहरा दोरा मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे. विहिरी भवतालची घाणेरडी जागा फावडे घेऊन स्वच्छ करावी. पोहरा, दोरा, फावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन पार दूर निघून जावे. लोक आचंब्यात पडायचे. हा कोण चिंध्या बुवा आला, त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले नि मुकाट्याने निघून ही गेला. कोण असावा हा? ज्वारी - कापणीचा हंगाम चालू. स्वारी अशा शेतां जवळून चालली असताना थांबायची. मालका जवळ "एक पाचुंदा द्या हो बाप्पा" म्हणायची. "तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा." मालक गुरगुरायचा. (पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्या) "बरं तर दोन पाचुंदे द्या." मालक रागवायचा. चल चालता हो म्हणून धमकावयाचा. कैक वेळा मारायला अंगावर ही धावायचा. जसे कोठे काही झालेच नाही अशा चर्येने डेबूजी तेथेच बसून रहायचा. मजूर कापणीत गुंगलेले. काम जोरात चालू. एकादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून, डेबूजी त्याच्या जवळ विळा मागायचा. खुषीने दिला तर ठीक, नाहीतर घ्यायचा हिसकावून. 'माजी माय, जरा विसावा घे. मी करतो तुझं काम. रागावतेस कशाला?" असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा. इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्यांच्या पेक्षा थोड्या वेळात दुप्पट तिप्पट कापणी करताना पाहून मजूर नि मालक डेबूजीकडे पहातच रहायचे. सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी याच्या कापणीचा सपाटा तडाखे बंद चालूच. या उपऱ्या प्रवाशी पाहुण्याने भलताच हात चालवून सगळ्यां पेक्षा कापणीत तो पार पुढे गेलेला पहाताच मजूर नि मालक त्याला भाकरी खायला बोलावीत. ठरवलेले काम रेटले का डेबूजी ज्याचा विळा त्याला परत देऊन, मिटल्या तोंडी पार निघून जायचा. सारेजण त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पहातच रहायचे. इथे आला काय, झपाटे बंद कापणी केली काय आणि भाकर देत असता ती नाकारून निघून गेला काय! हा काय कुणी साधू असावा का देवच असावा? एकाद्याने पाच पेंढ्या दिल्याच तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंना उपाशी पडलेले ढोर आढळले तर त्याला एक पेंढी खायला घालायची, त्याला गोंजारायचे नि पुढे जायचे. ज्वारी वहाण्याचे काम कुठे चालू असले का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेंढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे. कोठे औत चालू असतील तर तेथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून, घाम पुशीत पुशीत शेतकऱ्याला नमस्कार करून निघून जावे. कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही. काम करावयाचे नि पसार व्हायचे. मनात आले तर दिली भाकर खायची, नाहीतर देत असताना ही पाठ फिरवून वाट धरायची. जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्या पाड्यांतून पसल्या आणि पुण्यावानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो. असल्या भुमका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या. ज्यांना अनुभव आले होते. त्यांनी तिखटमीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्या जाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले. अचाट निर्भयतेची कमावणी. एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, तुफानी वाऱ्याचा सोसाटा चालू झाला. रात्रीची वेळ. जिकडे पहावे तिकडे गुडुप अंधार. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले. ओढे नाले खळखळू लागले. नदीचा ही प्रवाह नि वेग वाढला, पुढे पाऊल टाकायची सोय नाही. कुठे जायचे आता? फिरस्ता डेबूजी तसाच बिन दिक्कत चालत होता. अखेर वारा नि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही, अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी थांबला. कसचे काय नि कसचे काय! वाऱ्याचा जो एक तडाक्याचा झोत आला, त्यासरशी ते प्रचंड झाड कडाडले आणि मुळासकट धाड दिशी जमिनी वर कोसळले. डेबूजी चटकन बाजूला सरला म्हणऊन ठीक झाले. ज्याचा आसरा घ्यायला तो गेला, तोच कोसळून जमीन दोस्त झाला. आता पुढे काय? कडाडणाऱ्या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडी वर गेला. वारा नि पाऊस यांची झुंज चालूच होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ते तुफान थंडावले. डेबूजी नख शिखांत चिंब भिजला. टेकडी वरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली. अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाळल्या. पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला. बारा वर्षांच्या साधनावस्थेत गाडगे बाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत. थंडी, वारा, पाऊस, कडाक्याचे ऊन्ह, तुफान वावटळी, रानातल्या वणव्यांची आग, एकूणेक प्रसंगांत त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट पाडली. मनाची शांती अचल राखली. काम त्यांनी जाळलाच होता. पण क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मदादि विकारांचे ही त्यांचे दमन कार्य अखंड चालूच होते. इतकेच काय पण नेहमीच अरण्यात वसतीचे प्रसंग असल्यामुळे, सर्प, विंचू, इंगळ्या, वाघ, कोल्ही, लांडगे या क्रूर श्वापदांचे ही भय त्यांनी गिळून टाकले होते. निर्जन राना वनात मन मानेल तेथे तो गाढ झोपी जाई. आसपास जंगली श्वापदे येवोत जावोत ओरडोत वेढा देऊन बसोत, काय वाटेल ते करोत, त्यांची त्याला पर्वा कशी ती कधी वाटलीच नाही. रात बे रात सुद्धा तो जंगलांतून प्रवास करीत असे. हव्या त्या ओसाड जागेत विसावा घेई. थंडीच्या दिवसांत स्मशानात पेटलेल्या सरणा जवळ बसून ही शेक घेई. खाण्या पिण्याची तर पर्वाच नसे. मिळेल ते शिळेपाके कच्चे - पक्के खुशाल चवीने खाई नि ते त्याला पचत ही असे. अनवाणी चालण्याने पायतळांना भोके पडली तरी त्याचीही खिस गणती त्याला नसे.

• थोडे घरात डोकावू या. :

करता सवरता डेबूजी परागंदा झाल्यावर बळि रामजीने सगळ्या कामांचा उरक पत्करला, तरी आजा, आजी, आई दुःखात झुरतच होती. नातावळ्या गोतावळ्यांनी यावे, दोन दिवस रहावे, समाधान करावे नि जावे. अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ २-३ महिन्यांनी रायजाबाई देवलोकी गेली. आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्या सारखे झाले. निराशेच्या काळ्या ढगाराला ही आशेची चंदेरी शलाका असते म्हणतात. डेबूजी गेला तेव्हा सौ. कुंताबाई ३ महिन्यांची गरोदर होती. रायजाबाईच्या मृत्यू नंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आई बापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म. जन्म - मृत्यूची ही पाठ शिवणी सखुबाईच्या चांगलीच परिचयाची होती. मुलाचे नाव गोविंद ठेवून, सखुबाईने जवळचे काही गोतावळे जमवून त्याचे बारसे केले.

• अखेर तपास लागला. :

एक दिवस मूर्तिजापूरला कामाला गेलेला बळि रामजी घरी आला आणि टांगा न सोडताच एकदम मोठ्याने ओरडला, "आत्या, डेबू दादाचा तपास लागला. तो साधू झालाय नि माहूर भागात फिरताना त्याला आपल्या एका वट्टीने पाहिले." चला, पत्ता लागला आता शोध करून त्याला घरी परत आणायची खटपटच तेवढी करायची. माहूर भागातल्या जात गोतवाल्यांना इशाऱ्याचे निरोप रवाना झाले. वार्षिक ऋण मोचनाची पौषी यात्रा ही जवळ आली. डेबूजी कुठे ही असला तरी ही यात्रा चुकवणार नाही ही सगळ्यांची खात्री.

• ऋण मोचनचा रविवाऱ्या शंकर. :

दापुरीपासून ऋण मोचन अवघ्या ३ मैलांवर. पौष महिन्यातल्या दर रविवारी तेथे यात्रा जमत असे. पूर्वी ती लहान असे. उगाच १० - १२ खेडूतांचे खटारे यायचे. गाडगे बाबांच्या माहात्म्याने मात्र गेली अनेक वर्षे त्या यात्रेला महात्सवाचे रूप आलेले आहे. एखाद्या पौषात ५ रविवार आले का त्या शेवटच्या रविवाराच्या देव दर्शनाचा महिमा मोठा. शंकराचा आवडता वार सोमवार. पण या ऋण मोचनच्या मुद्गलेश्वर महादेवाची यात्रा मात्र रविवाची. हे काय त्रांगडे आहे समजत नाही. बहुतेक यात्रेकरू सर्व जमातीचे. रविवारी यात्रेला आले का प्रत्येकाने पूर्णा नदीत बुचकळी मारायची आणि ओलेत्याने शंकराला बेलपत्री वहायची, असा रिवाज. या शंकराचे नाव मुद्गलेश्वर. म्हणूनच डेबूजीच्या अल्पायु मुलाचे नाव त्याने मुद्गल असे ठेवले होते.

• चुकणार नाही, येईलच तो. :

पौष उजाडला नि रविवार ही आला. सखुबाई बळि रामजी वगैरे मंडळी मोठ्या पहाटेलाच ऋण मोचनला येऊन बसली. पण डेबूजी कोठेच आढळे ना! पूर्णा ऊर्फ पयोष्णा नदीचे पात्र ऋण मोचन जवळ फार रुंद नि खोल. काठच्या जमिनीचा चढाव तीन पुरुष उंचीचा. मोठा कठीण नि निसरड्या चिकण्या मातीचा. स्नान करून ओलेत्याने वर येणारी मंडळी हटकून पाय घसरून पडायची. दर सालची ही कटकट. पण यंदा नवल वर्तले. कोणी तरी एक चिंध्याधारी जटाधारी माणूस फावडे, टोपली घेऊन ओल्या मातीवर सुकी माती भराभर टाकीत सकाळपासून सारखा झगडतोय. लोकांच्या वर्दळीने चढावाचा काठ भिजला का पडलीच याची सु्क्या मातीची टोपली त्यावर. कोण बुवा यंदा हा महात्मा आला ऋण मोचनला? निरखून पाहतात तो कोण? अहो, हा आपला डेबूजी वट्टी! जटा - दाढी - मिशांचे जंगल अमाप वाढलेले, अंगावर फाटक्या चिंध्या, घामाच्या धारा निथळताहेत. आणि आजू बाजूला किंचित ही न पाहता. टोपल्या भरभरून सुकी माती आणून टाकण्याच्या कामात एकतान रंगला आहे. पिल्लू हरवलेल्या वाघिणीच्या उसाळीने सखुबाईने "डेबू... माझा डेबू..." अशी किंकाळी मारून त्याच्याकडे झाप टाकली.

• ऐन कसोटीचा प्रसंग हाच. :

कोणाला ही नकळत घरदार सोडून देशोधडीला निघून जाण्याने संसाराचा मोहपाश तोडला जातोच, असे थोडेच आहे? मोहपाशापासून लांब दूर असे तोवर ही भावना किंवा कल्पना ठीक असते. निर्जन अरण्यातल्या वस्तीत ब्रह्मचर्याची शेखी कोणीही मिरवावी. पण सौंदर्यवान तरुणींच्या मेळाव्यात खेळी मेळीने राहून ब्रह्मचर्य टिकवील. त्याचीच खरी शहामत आणि तोच अखेर कसोटीला उतरणार. देह मनाची मुंडी मुरगाळून काम क्रोधादि षड्रिपूंचे दमन करण्याच डेबूजीने एक वर्ष वनवासात घालवले. पण या घडीला त्याच्या भोवती जन्मदाती आई, शेजेची बायको, लडिवाळपणे हाता खांद्यावर खेळवलेल्या दोन गोंडस लहान मुली आणि गृह त्यागानंतर झालेला वंशाचा आधार असा तो छोटा पुत्र गोविंद, शिवाय गावोगावचे सारे जिवाभावाचे सवंगडी यांचा लोखंडी साखळ दंडासारखा वेढा पडलेला. आई रडत ओरडत आहे. बायकोच्या डोळ्यांतून आसवांचे पाट वहात आहेत. मामी, मामेभाऊ, स्नेही सोबती यांच्या विनवण्या चालू आहेत. डेबूजी निश्चल वृत्तीने सगळ्यांकडे निर्विकार मुद्रेने पहात आहे. फत्तरावर घणाचा घाव घातला तर एकादी कपरी तरी उडते. पण येथे काही नाही!

• मी मेलो असतो, तर तू काय केले असतेस? :

"मी मेलो असतो, तर तू काय केले असतेस?" एवढेच आईला बोलून डेबूजी उठला. आता तो जाणार निघून, असे पहाताच सखुबाईने हंबरडा फोडला. "अग, एवढी ओरडतेस कशाला? मी काही आताच जात नाही कुठे. हा पौष महिना इथेच आहे." असे सांगून डेबूजी गेला निघून दुसरीकडे.

• डेबूजी वट्टी आला रे आला :

"डेबूजी वट्टी आला रे आला" ही हाक यात्रेकरूंत फैलावल्यामुळे, सगळे गणगोत नि लंगोटी मित्र त्याला पहायला धावले. दरसाल नदीच्या निसरड्याचा अनुभव सगळ्यांना होता, पण ओल्या चिंब मातीवर सुकी माती टाकून लोकांचे हाल कमी करण्याची कल्पना नि योजना आजवर एका ही शहाण्याच्या डोक्यात आली नव्हती. आणि आज? परागंदा झालेला आपला डेबूजी या विचित्र वेषाने यात्रेला येतो काय आणि यादवजी पाटला कडून टिकाव, फावडे, टोपली घेऊन एकटाच ते काम करतो काय! लोकहितासाठी असली कामे कोणी ना कोणी केलीच पाहिजेत, ही कल्पनाच ज्या खेडुतांना नाही नि नव्हती, त्यांना डेबूजीचा हा खटाटोप पाहून काय समजावे हेच समजे ना. कोणी म्हणे "बिचारा वेडा झाला." कोणी आई, बायको - मुलांकडे पाहून कळवळत. दुसरा विशेष शहाणा शेरा मारी की "अहो पहिल्यापासूनच याला देवा धर्माची आवड, म्हणून झाला आता तो बैरागी साधू." तिसरा तुंकाराने सांगे, "अहो कसला देव नि कसला धर्म! याने आपल्या कुळ दैवत खंडोबा नि आसराईचे बोकड दारू बंद करून विठोबा रखमाई करू लागला, वाड वडलांची चाल मोडली. फिरले डोके नि झाला असा वेडा पिसा." ज्याला जसे सुचले तसे तो लोकांच्या जमावात येऊन शेरे मारी नि निघून जाई.

• खराट्याचा नवा धर्म :

सगळ्या यात्रेकरूंची स्नाने आटोपल्या वर, डेबूजीने स्वतः स्नान केले, अंगावरच्या चिंध्या धुतल्या नि तशाच पुन्हा पांघरल्या. देवळात जाऊन महादेवाला बिल्वपत्रे वाहिली. फराळाला बसलेल्या अनोळखी यात्रेकरू कडून चतकोर तुकडा भाकर, चटणी, कालवण मागितली आणि मडक्यात घेऊन नदीकाठी तो खात बसला. आईने त्याच्या पुढे फराळांचे जिन्नस ठेवले, तिकडे त्याने पाहिले ही नाही. भाकर संपताच तो उठला आणि गेला निघून दूर कोठे तरी. संध्याकाळी लोक पहातात तो डेबूजी हातात खराटा घेऊन यात्रेतली सारी घाण झाडून साफ करीत आहे. कागद पानांची भेंडोळी, खरकट्याचे तुकडे, फार काय पण जागोजाग लोकांनी केलेली मलमूत्र विसर्जनाची खातेरी, पार सगळे स्वच्छ झाडून साफ करण्याचा झपाटा चाललेला. सकाळी याने दरडीवर माती टाकून लोकांची स्नाने सोयीची केली. वाटेत दिसलेला दगड धोंडा गोटा दूर नेऊन टाकला. आता तर यात्रेतला सारा घाण, केर कचरा स्वतः भंग्या प्रमाणे साफ करीत आहे. हा काय वेडा आहे होय? येथल्या घाणीमुळे ऋण मोचनला कसली ना कसली रोगरायी होतेच. आपण कधी लक्षच दिले नाही. दरसाल असे होतेच, एवढ्या वरच आपली अक्कल ठेचाळायची. पण त्या रोगरायीला ही घाणच कारण, हे आज आपल्याला या डेबूजीने शिकवले. याला वेडा म्हणणारेच वेडे. बरे, याला साधू म्हणावे, तर आज वरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलेच नव्हते. सारे लोक मंदिरातल्या दगडी शिव लिंगाच्या आरत्या धुपारत्यांत गुंतलेले, तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळीत आहे. गाभाऱ्यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळा बाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ? विचारी होते ते हा विचार उघड बोलू लागला. डेबूजीकडे ते विशेष कौतुकाने नि आदराने पाहू लागले. "अरे वेडा कसचा हा! हाच खरा महात्मा. सकाळपासनं तो तुमची सेवा करीत आहे. आता तर तुमची सारी घाण निपटून यात्रेचे ठिकाण स्वच्छ करीत आहे. ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा. उगाच टाळ मृदंग कुटून भजनाचा टाहो फोडून काय होणार आहे." असे बरेच लोक बोलू लागले.

• माणुसकीचा संदेश :

सगळी घाण निपटल्यावर डेबूजी सखुबाई बसली होती तेथे आपण होऊन आला. नमस्कार केला सगळ्या लहान थोरांना आणि मुकाट्याने बसला. सखुबाईने अंगावरून हात फिरवला. ती सारखी रडत होती. सभोवार जमलेल्या सगळ्यांनी घरी परत येण्या विषयी आग्रह केला. "मी तुझ्या बरोबर आलो नि उद्या परवा मेलो, तर तू काय करशील? आजोबा, आजी, मामा गेले, त्यावेळी काय केलंस तू आणि करणार तरी कोण काय? स्वतःपुरते सगळेच पहातात. पण शिलकी आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजवले, तर तीच खरी देवाची सेवा. देवळातल्या दगडी देवाचे हात पाय रगडून काय होणार? सभोवार पसरलेली ही माणसांची दुनिया, हे खरे ईश्वराचे रूप. त्या हजारो लाखो देवांची पडेल त्या रीतीने केलेली सेवाच देवाघरी रुजू होते. सुवासिक फुले, पत्री आणून देवाच्या दगडी मूर्तीवर वाहण्यापेक्षा, सभोवार पसलेल्या हालत्या, बोलत्या, चालत्या दुनियेच्या सेवेसाठी हाडे झिजवली, भुकेल्यांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जन्माचे सार्थक होईल. त्या पत्री फुलांपेक्षा माझा खराटा झाडूच श्रेष्ठ आहे. उमचायचे नाही तुम्हाला ते आज." इतके बोलून डेबूजी उठला नि गेला निघून. "मी तुह्या संग आलो अन् सकाळ परवा मेलो त तु काय करशीन? आबा, आजी, मामा मेले त्या वाकती त्वा काय केलं अन् कोन काय करनार? आपल्या पुर्त सर्वेच पाह्यतत पन् उरलं हुए आयुष्य अळल्या नळल्या गरजी लोकाईची सेवा कऱ्याले खरसलं तर तेच खरी देवाची सेवा आहे. देवळाईतल्या दगळ गोठ्याच्या देवाचे हात पाय दाबून काही होत नाही. भोवताली पसरलेली ही माणसांची दुनिया हेच खरं देवाचं रूप आहे. त्या हजारो लाखो देवांची करता येईल त्या मार्गानं सेवाच करनं देवाच्या घरी रुजु होईन. वासाचे फूलं वेल आनून देवाच्या गोट्याच्या मूर्तीवर वाह्यल्यापक्षे भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या सेवेत आयुष्य खरसलं, भुकेल्या हुया लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जलमाचं सार्थीक होईन. त्या फुलपत्रापक्षे माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे. आज काही तुम्हाले ते समजनार नाही.’’

• यात्रा संपली, डेबूजी पसार :

कोठे सटकला त्याचा थांग ना पत्ता. पुन्हा पायपिटी नि वनवास. दररोज १५ ते २५ मैलांची दौड सारखी चालू. रात्र नाही. दिवस नाही. ऊन्ह, थंडी, पाऊस नाही. तुफाने, वादळे, झंजावात नाही. त्याचे पाय सारखे चालतच रहायचे. जाता जाता शेतातली कणसे, कांदे, मिरच्या, शेंगा, गाजरे काय मिळेल ते खायचे आणि विसाव्यासाठी मनाला येईल तेथे अंग टाकायचे. कोणत्याही गावात एक दिवस किंवा एक रात्र यापेक्षा अधिक काळ रहायचे नाही. भूक लागली का हव्या त्या दारी जायचे आणि माय बाप चटणी भाकर द्या ही आरोळी मारायची. कोणी द्यायचे, कोणी हुसकवायचे. शिळी पाकी कशी का असे ना, भाकर, चटणी, कालवण मडक्याच्या टवकळात घ्यायचे आणि दूर नदीकाठी अथवा गावाबाहेरच्या विहिरी जवळ बसून ती खाल्ली का झाली स्वारी पसार दुसरीकडे. कित्येक वेळा पोलीस नि पोलीस पाटील डेबूजीला चौकीत बंदीवान ही करायचे. काही ठिकाणी तर चोर समजून पोलिसांनी त्याला उपाशी ठेवावे, कबुलीसाठी रात्री खूप मार द्यावा. याचे काही नाही, मार खात असताना ही हा हसायचा. पक्का बेरड आहे लेकाचा म्हणून आणखी छळायचे. डोईवर जडजड पेटारे देऊन पाचपाच मैल दुसऱ्या गावी चौकीवर चालत न्यायचे. तेथे आणखी तपास व्हायचा. कोणी सज्जन गावकरी भेटावा नि त्याने "अहो हा वेडा आहे. असाच गावोगाव भटकत असतो." असे पोलिसांना सांगितले म्हणजे सुटका व्हायची. लगेच स्वारी आपल्या तंद्रीत हास हासत पुढे रवाना व्हायची. कोणी निंदा, वंदा वा अटकेत करा बंदा, कशाची काही दिक्कत खंत वाटायचीच नाही. शारीरिक, मानसिक, वैचारिक अवस्था एकतान, निर्लेप, निर्विकार नि स्थितप्रज्ञ. पुष्कळ वेळा तो मुद्दामच लोकांचा राग आपणावर ओढून घ्यायचा. षड्रिपूंचे दमन किती झाले आहे, याची क्षणोक्षणी पदोपदी तो कसोटी लावून पहायचा. कसोटी लावून पहायचा! लिहा बोलायला शब्द फार सोपे आहेत. वाचायला ही काही कठीण जात नाहीत. पण तसल्या एकाद्या प्रसंगाची नुसती कल्पना करून पहा, म्हणजे डेबूजीच्या साधकावस्थेतील तपश्चर्येची कदर किती भयंकर होती, याची थोडी फार कल्पना झाली तर होईल.

• विक्षिप्तपणाचे काही नमुने :

१) कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची. चतकोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची. बरं अर्धी घे म्हटले तर सगळी द्या मागायची. तीही पुढे केली का सगळ्या भाकऱ्या मागायच्या. तुला सगळ्या दिल्यावर आम्ही रे काय करायचे? तुम्ही उपाशी रहा, मला फार भूक लागली आहे. अशा जबाबाने प्रकरण शिव्यागाळी हुसकावणीवर यायचे. तसे ते आले का स्वारी निमूटपणे पुढे चालू लागायची.

२) एकाद्या गाडीच्या मागे मागे चालायचे. दोन तीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडी मागे चालतोय, याची गाडीवानाला शंका येऊन तो विचारायचा. मला गाडीत बसू द्या. कुठं जायचं आहे तुला? तुम्ही जाता त्याच गावाला. बरं बस गाडीत. तुम्ही खाली उतरा मग बसतो मी, बैलांना दोघांचे ओझे होईल. अखेर काय? शिव्या निंदा नि टवाळी. तेवढी पूजा घेतली का स्वारीने पायांचा मोर्चा वळवलाच दुसरीकडे.

३) दोन प्रहरी एखादी स्त्री शेतावर नवऱ्यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना, स्वारीने तिला हाक मारून थांबवावे आणि भाकरी मागावी. माय, भूक लागलीय, दे ते भाकरीचं गठोडं मला. औतकऱ्याला मग काय रे देऊ? राहील तो उपाशी, मला काय त्याचे? उस्तळून ती बाई कडकडून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची.

४) एखाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशांची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची. भिकारी समजून ते एखादा पैसा देऊ लागायचे, पैसा नको, मला रुपाया हवा. रुपाया? तुझ्या बापाने ठेवलाय, चल हो चालता इथून, प्रकरण धक्का बुक्कीवर आले का पोबारा करायचा.

५) मोळी विकणारे भेटले का त्यांच्या जवळ लाकडे मागायची. तुला रे लाकडे काय करायची? सैपाक करीन सैपाक करीन बाप्पा. सैपाक? कशावर करणार? धोतरावर करीन. सगळे हसायचे. खांदाडावर डोकं दिसतं पण ते मडकं रे मडकं! धुडकावणी झाली का स्वारीला समाधान.

६) तीन प्रहरी एखाद्या घराशी जावे नि भाकरी मागावी. भाकरी शिल्लक नाही म्हटले तर शेवया द्या, मला शेवया फार आवडतात. तुझ्या बापाने ठेवल्यात म्हटले तर दूध द्या गाडगेभर अशी मागणी करायची. दूध नाही तर दोन शेर गूळ दे माय. खाऊन पाणी पिईन. घरवाला बाहेर यायचा नि स्वारीला दण्डा दाखवून हुसकावून द्यायचा.

६) गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे. मालक दिसला का त्याला विचारायचे "काय हो, महारांची विहीर कोणती?’’ डेबूजीला महार समजून तो आई माई वरून शिव्या देऊ लागायचा. "पण मालक, मी नुसता बसलो आहे, पाणी नाही प्यालो अजून, आता पितो." मालकाने दगड धोंडे मारून स्वारीला हुसकवायचे.

८) एकदा एका देवळात पुराण चालले होते. खेडूतांची गर्दी. वेदान्ताचा एक मुद्दा पुराणिक बुवा मोठ्या अवसानाने श्रोत्यांना ओरडून ओरडून सांगत होते. सारे जण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देहभान विसरून रंगले होते. एकदम डेबूजी आरोळी मारतो "भाकर द्या हो माय बाप. लइ भूक लागलिया पाया पडतो. बाप हो, भाकर द्या." या आरोळीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या आध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाडकन बसल्या जागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले. पुराणिक बुवा संतापले.

पुराणिक -
काय रे ए गाढवा, मनुष्य आहेस का कोण आहेस?

डेबूजी -
मी कोण ते आपण सांगितलंच.

पुराणिक -
पुराण चाललंय दिसत नाही तुला?

डेबूजी -
पुराण चाललंय, दिसतंय मला माय बाप. पण भाकरी मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये, असं कोणत्या पुराणात लिवलंय दादा.

पुराणिक -
फार शहाणा दिसतोय लेकाचा. पुराणाच्या जागी भीक आणतात का कुणी? चल चालता हो. नाही तर...

डेबूजी -
इथं नसलं तर आणवून द्या कुठून तरी. फार भूक लागलिया बाप्पा.

पुराणिक -
पुराण बंद करून तुला भाकर आणून द्यायला, कोण असा तू मोठा साधू लागलास? कोण आहेस तू? महार का मांग?

डेबूजी -
मी माणूस आहे महाराज.

पुराणिक -
ते कळतंय आम्हाला. जात कोणती तुझी?

डेबूजी -
जात? माणसाची.

पुराणिक -
हे विचित्र सोंग कशाला घेतलंस?

डेबूजी -
साधू होण्यासाठी माय बाप.

पुराणिक -
अरे अकलेच्या कांद्या, हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर? त्यांना देव तरी कसा भेटणार?

डेबूजी -
बरं तर. साधू होण्याचा फंद देतो टाकून. पण मला फार भूक लागलीय. भाकर द्या. लवकर द्या. जीव कासावीस झाला.

"द्या रे हुसकावून द्या या गाढवाला. नसती पीडा शिंची." असे पुराणिक बुवा कमाण्डरच्या अवसानात लोकांना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पहात आहेत, असा देखावा तयार होतो.

पुराणिक -
(चिडून) खूप धंदा शोधू काढलाय गाढवानं. तरणा बांड असून भिक्षा मागतोस. लाज वाटायला पाहिजे तुला.

डेबूजी -
पुराणिक असती तर भिक्षा कशाला मागितली असती महाराज.

पुराणिक -
पहा पहा कसा चुरचूर एखाद्या पंडिता सारखा बोलतोय तो. आज काल ताळतंत्रच राहिले नाही. जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो. साधू व्हायला आमच्या सारख्या श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले का काय? म्हणून या चिंध्या मडके धाऱ्यावर ती पाळी आली.

सज्जन हो,
पहा, ऐका, खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी विसरून वरिष्ठांची पायमल्ली करू लागल्यामुळेच पुराणिक गेले, शेती बुडाली आणि हे असले भिकार दिवस आले.

इतके वादळ उठले तरी डेबूजी शांत मुद्रेने जागच्या जागी उभाच. ओरडून ओरडून पुराणिक बुवांचा घसा खरचटला. ते किंचित थांबले का दिलीच त्याने पुन्हा जोराची आरोळी भाकर वाढा हो माय बापांनो. अखेर मंडळीतून कोणी तरी उठले आणि त्याला बगोटे धरून लांब दूर नेऊन घालवला.

• कुटाळांच्या अड्डयावर :

हर एक पुराणिक गावात कुटाळ लोकांची टोळकी असायचीच. चावडीवर किंवा गावाबाहेरच्या प्रशस्त पारावरत्यांची बैठक. नदीवर पाण्याला जाणाऱ्या बायका पोरींची नि इतरांची टिंगल टवाळी करायचा त्यांचा धंदा अजून ही चाललेला दिसतो. डेबूजी असल्या वाटेने जाऊ लागला का ते टोळके त्याला हाका मारायचे. तो मुक्या बहिऱ्या सारखा पुढेच चालत असायचा. मग टोळीतला कोणी तरी त्याला आडवा जायचा.

टोळके  -
काय रे, हाका मारल्या त्या ऐकू नाहीत का आल्या? चर फिर माघारा.

डेबूजी -
मला पुढं जायचं आहे.

टोळके -
अरे हो मोठा पुढं जाणारा. मागं फिर. पाटील बोलवताहेत तुला.

डेबूजी -
मला काय पाटलाशी करायचं बाप्पा?

टोळके -
पाटलांचा कचका माहीत नाही वाटतं. येतोस, का नेऊ खेचीत.

खेचीत न्या टोळके धकांड्या मारीत स्वारीला चावडी पुढे किंवा पारा जवळ आणायचे.

पाटील -
कुठून आलास रे?

डेबूजी -
इकडून आलो.

पाटील-
कडून? इकडून म्हंजे कुठून?

डेबूजी -
इकडून म्हंजे तिथून.

पाटील -
मणजे कुठं?

डेबूजी  -
पाय नेतील तिथ.

पाटील -
कोण आहेस तू?

डेबूजी -
बाप्पा, मी आहे भयाणा.

पाटील -
घरदार बायका पोरं काही आहेत का?

डेबूजी -
आठवत नाही.

पाटील -
आई बाप तरी होते का?

एक टवाळ -
का आकाशातनं पडलास?

डेबूजी -
हो, अगदी तसंच.

टवाळ -
तरणा तगडा दिसतोस. टोळके नाही का केलीस?

डेबूजी -
केली होतीसे वाटतं.

पाटील -
तू घरा बाहेर कशाला पळालास?

डेबूजी -
बायकोनं दिलं हुसकून म्हणून.

पाटील -
बायकोनं हुसकलं नि तू बाहेर पडलास? शहाणाच आहेस.

डेबूजी -
शहाणा नाही बाप्पा. भयाणा आहे मी भयाणा. असली कसली तरी भरमसाट उत्तरे देऊन तो आपली मनसोक्त टिंगल टवाळी निंदा करून घ्यायचा. क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादि षड्रिपूंची खरचटून झाडणी करण्यासाठी डेबूजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला `असामान्य’ हे विशेषण सुद्धा अपुरे पडेल.

• ऋण मोचनचे ऋण फेडले :

सन १९०७ साली डेबूजी बिनचूक ऋण मोचनच्या यात्रेला आला. या वर्षी त्याने नाम सप्ताह आणि भंडाऱ्याची योजना जमाती पुढे मांडली. लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले. पक्वान्नांची भांडी चुलीवर चढली. तिकडे ओल्या दरडीवर सुकी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला. संध्याकाळी ५ वाजल्या वर सरळ ओळीत पद्धतशीर पंगती मांडल्या. सगळ्या स्त्री - पुरुषांना नि मुलांना हात पाय धुवून पानांवर बसवले. वाढणीसाठी स्वयं सेवकांची योजना केली. काही बायका ही तयार झाल्या. प्रत्येक पानापुढे उदबत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर पुण्डलीक वरदा हारी विठ्ठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला. परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पहायला गावोगावचे लोक धावून आले. पंगती चालू असताना डेबूजीने एकतारीवर सुस्वर अभंगांचे गायन करून, त्यातूनही आत्मोद्धाराचे नि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले. डेबूजीच्या संघटन-चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला. मागासलेली नि अडाणी नाक्षर परीट जात. पण तिला हे नवीन शिस्तीचे नि संघटनेचे वळण डेबूजीने लावलेले पाहून, त्या जमातीत त्याचा मोठा आदर होऊ लागला. एवढा मोठा मिष्टान्नाचा भंडारा झाला. हजार बाराशे पान झाले. मोठा सोहळा झाला. डेबूजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली. अखेर खरकटी काढली. भांडी घासली. जागा साफ केली आणि स्वतः मात्र चटकन कोठे तरी जाऊन मिळवलेल्या शिळ्या पाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पहाताच हजारो स्त्री - पुरुषांच्या डोळ्यांत कौतुकाचे, कृतज्ञतेचे आणि आदराचे अश्रुबिंदू चमकले.

• अखेर दगडी घाट झाले :

डेबूजीच्या खटपटीमुळे ऋण मोचनच्या पौषी यात्रेला सालोसाल वाढते महत्त्व येऊ लागले. दरसाल यात्रा जमावी. स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच रहावी आणि तेथे डेबूजीने सुकी माती टाकायचे हाडमोडे काम करीत रहावे, हे काही ठीक दिसत नाही. हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला. नदीला फरस बंदी घाट बांधला पाहिजे. एवढी डेबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड, भराभर जागच्या जागी वर्गण्यांचे आकडे आणि रोख रकमा जमू लागल्या. सांगवी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेल्या सावकारांनी - बनाजी प्रीथमजी तिडके आणि त्यांचे बंधु तुकाराम प्रीथमजी तिडके यांनी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले. सन १९०८ साली पूर्णानदीचा पहिला घाट बांधून तयार झाला. जमलेल्या रु. ७५०० पैकी घाटाचे काम होऊन रकम शिल्लक उरली, तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटा शेजारीच श्री लक्ष्मी - नारायणाचे देऊळ बांधण्यात आले. यानंतर सालोसाल अनेक लोकांनी देणग्या देऊन नदीच्या दोनी तीरांवर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले. ४ - ५ वर्षांनंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने एकेका नवा समाज-संघटनाचा प्रघात चालू करावा. भंडाऱ्याच्या जोडीने त्याने नाम-सप्ताहाची प्रथा चालू केली. मांस भक्षण नि दारूबाजी. या व्यसनांच्या हकालपट्टीची निकराने चळवळ केली. देवीच्या नावाने जागोजाग होणाऱ्या पशु पक्ष्यांच्या हत्या महापाप ठरवून बंद पाडल्या. भंडारा करून उरलेल्या पैशानी मोठ मोठी भांडी खरेदी करवली. सन १९१४ साली पत्र्याची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली. लोक हिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या. त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे रहावे. फार काय, पण पार दूर कोठेतरी निघून जावे, असा त्याच्या जीवनाचा ओघ चालू झाला.  "डेबूजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे," असे एकाने सहज म्हणता क्षणीच, "नाही हो बाप्पा, मी एक फुटके खापर आहे. मोत्यासारखा कुणाच्या छातीवर हारात रुळत राहण्यापेक्षा, मोत्याच्या थेंबासारखा दवाचा कण म्हणून तान्हेल्या चिमणीच्या घशात नेमका पडावं, ही तर माझी सारी खटपट आहे." असा जबाब द्यायचा. ऋण मोचनप्रमाणेच मार्की (ता. अमरावती), पिंजर (ता. अकोला) आणि माहूर (निजाम प्रदेश) येथील यात्रांतून डेबूजीने भंडारे, नाम सप्ताह आणि धर्मशाळा चालू करून, स्वतः त्या कोठल्याही उद्योगाच्या मोहात नाम मात्र ही राहिला नाही.

• डेबूजी पुढे, कीर्ति मागे :

ठिक ठिकाणच्या या कार्यामुळे डेबूजीचे नाव लांबवर फैलावले. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असे जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्य क्रमात तो कोठे ही गेला, कोणाला ही भेटला, तरी त्याने आपले नाव चुकून ही कधी कोणाला सांगितले नाही आणि आज ही सांगत नाहीत. तोच हा लोकसेवक डेबूजी असे लोकांना ही पटायचे नाही .एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि परिटांसारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृत सिंचन करणारा असा वेडा विद्रा, रकटी चिंध्या पांघरणारा, मडके गळ्यात बांधून फिरणारा, दिगंबर असेलच कसा? याला तरी लोक पुढारी मानतील कसे नि याचे ऐकतील कसे? दरसाल हजार गावे पायपिटीत पालथी घातली, लाखो बऱ्या वाईट लोकांशी संबंध आला, पण कोणालाही डेबूजीच्या नावा गावाचा थांगपत्ता लागला नाही. डेबूजीची कीर्ती व-हाड, खानदेश, नागपुरापर्यंतच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी नाक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठाकठीक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पहाण्यासाठी ठिक ठिकाणचे लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कोणी सगे सोयरे आले, त्यांनी डेबूजीच्या वेषाची, वृत्तीची नि ग्रामसेवेची माहिती दिली म्हणजे "अरे हो रे हो. परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहिरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाडले. त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर नी तिचे पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला ७ मैल सोबत केली नि घरी आणून घातली. बाबा, काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारले तर काहीही न बोलता नुसता हसला नि नमस्कार करून धावत पळत गेला निघून. अरेरे, दापुरी ऋण मोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही. आम्ही त्याला ओळखले सुद्धा नाही हो. छे छे छे. फार वाईट गोष्ट झाली." असे तडफडायचे.

• रेल्वे आमची मायबाप :

भटकंती मध्ये रेल्वेचा ही प्रवास यायचा. उतारूंच्या गर्दीत स्वारी खुशाल घुसून आगगाडीत जाऊन बसायची. मनात येईल तेथे आणि फास्ट गाडी असल्यास ती थांबेल तेथे उतरायचे. हा क्रम. तपासणीत तिकीट कलेक्टराला हा बिन तिकिटाचा उतारू आढळला का त्याने शिव्यागाळी करून, धक्के मारून बाहेर काढायचा. झडती घेऊन कफल्लक आढळल्यामुळे, एकदोन चपराका लगावून स्टेशन बाहेर हुसकून द्यायचा. दुसरी गाडी आली का स्वारी घुसलीच आत नि चालली पुढे. हे साधले नाही तर खुशाल पुढची एक दोन स्टेशने पायी चालत जायचे आणि तेथे एकादी गाडी पकडून पुढे चालते व्हायचे. काशी प्रयाग यात्रेचा प्रवास डेबूजीने असाच केला. परत येताना इटारसी स्टेशनवर एका गोऱ्या इन्स्पेक्टरने त्याला तिकिटा शिवाय नि कफल्लक प्रवास करताना पाहिले मात्र, हाणली ढुंगणावर बुटाची लाथ नि दिला भिरकावून फलाट फार्मावर. त्या डब्यात एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याच्या डोळ्यांना टचकन पाणी फुटले. तीन चार गटांगळ्या खाऊन, डेबूजी उठला नि तो गोरा अधिकारी दूर गेल्याचे पाहून पुन्हा डब्यात घुसला.

मुसलमान -
अरे बाबा, का एवढा हाणमार सोसतोस? जवळ पैसे नसले तर पायी प्रवास करावा. तिकिटा शिवाय का बरं घुसावं नि जागोजाग असली मारपीट खावी? गाडी चालू झाली होती.

डेबूजी -
(हात जोडून त्याला म्हणाला) "हे पहा जनाब साहेब, गोऱ्या साहेबाची एक लाथ खाल्ली तर १०० मैल सुखाने पुढे आलो ना मी? पायाने चालतो तर ऊन्ह आहे, थंडी आहे, पाऊस आहे, किती तरी त्रास असतो चालताना. त्यापेक्षा दर जंक्शन वर एक बुटाची ठोकर काय वाईट? एक लाथ बसली का चालला १०० मैल पुढे.’" त्या सज्जन मुसलमान गृहस्थाने डेबूजीची अवस्था पाहून दहा रुपयांची नोट पुढे केली. "साधूजी, ए लेव. ऐसी मारपीट मै नही देख सकता." डेबूजीने त्याला हात जोडून विनयाने म्हटले - "जनाब साहेब, पैसा मला काय करायचा? ही काठी, हे मडक्याचे टवकळ नि अंगावरच्या या चिंध्या, एवढीच माझी धन दौलत नि संपत. आपण दिलदार आहात." डेबूजीची ती निरिच्छ वृत्ती पाहताच त्या गृहस्थाचे डोळे पाण्याने डबडबा भरून आले. "तुम बडे अवलिया हो" असे म्हणून तो डेबूजीचे पाय धरणार तोच तो चटकन बाजूला सरला. "जनाब, नमस्कार देवाला - अल्ला करावा. माणसाचे पाय धरू नये"

• घार फिरे आकाशी :

घार फिरे आकाशी ।
परि चित्त तिचे पिल्लांपाशी ।

बारा वर्षांच्या वनवासात दापुरी किंवा तेथले घर यांचे दर्शन डेबूजीने कटाक्षाने टाळले होते. चुकून एकदा ही तिकडे कधी तो फिरकला नाही. तरी सुद्धा समाज हिताच्या चालू केलेल्या नानाविध कार्यांवर त्याचे लक्ष बिनचूक लागलेले असे. परीट जातीत आणि मागासलेल्या इतर समाजांत ज्या

ज्या राक्षसी नि घाणेरड्या रूढींच्या उच्चाटनाची आपण खटपट केली, त्या खरचटून नाहीशा झाल्या का या ना त्या आड पडद्याने तसाच चालू आहेत, याचा तो वरचेवर कानोसा घेत असे. त्याचे एकनिष्ठ मित्र नि अनुयायी त्याला कोठे तरी गाठून भेटून सल्ला मसलत घेत असत.

• हुण्डा-देज-निषेधाचा तडाखा :

लग्न कार्यात वरपक्षाने किंवा वधू पक्षाने हुंडा किंवा देज देता घेता कामा नये, असा प्रचार त्याने केलेला होता. जो कोणी हे पाप करील, त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये, बहिष्कार घालावा. हुंड्याच्या नि देजाच्या प्रघाताने दोन्ही ही कुटुंबे कर्ज बाजारी होतात. हातच्या शेतीला गुराढोरांना मुकून सावकाराचे दास बनतात. नवविवाहित जोडप्याचा नवा संसार कर्जाच्या उकीरड्यावर चालू करणे महापाप आहे, आत्मघात आहे. लग्नासाठी सावकाराचे कर्ज काढून गाव जेवणावळीचा, आरस परस आहेरांचा नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा, गरिबाला साजेशोभेशा झुणका भाकरीने तो साजरा करावा, असा त्याचा प्रचार कीर्तनांतून नेहमीच होत असे. आज ही तो चालूच आहे. एका ठरलेल्या लग्नात वऱ्हाड मंडळ जमून नवरा नवरीला हळद लागल्यावर, वर पित्याने हुंड्याची मागणी केली. वधू पिता गांगरला. ठरावाची भाषा बदलली तरी हळद लागल्यावर लग्न मोडायचे कसे? हुंड्याची अट पुरी केलीच पाहिजे. सावकाराकडे कर्जासाठी जाणाऱ्या वधू पित्याला डेबूजीच्या स्थानिक मित्रांनी थोपवून धरले आणि चारी दिशांना हेर पाठवून डेबूजीला तेथे बोलावून आणले. त्याने वर पित्याची समजूत घालण्याचा खूप प्रयास केला. पण तो आपला हट्ट सोडी ना. `हे लग्न मोडले’ असा पुकारा करून डेबूजी जवळच्या एका गावी गेला आणि तेथे एका तरुणाला लग्नासाठी उभा करून त्या मुलीचे त्याच्याशी झुणका भाकरीच्या मेजवानीने थाटात लग्न करून दिले. नवलाची गोष्ट, त्या हुंडेबाज तरुणाला पुढे कोणीही आपली मुलगी द्यायला धजला नाही आणि तो जन्मभर अविवाहितच राहिला.

• एकतारीवरची भजने :

भटकंती चालू असताना डेबूजीने शिंदीची एक हातभर फाटकी हातरी आणि एक एकतारी या दोन वस्तुंची आपल्या इस्टेटीत भर घातली. नागपुराकडे हातरीला चापरी म्हणतात. म्हणून त्या प्रदेशात त्याचे नाव चापरे बुवा असे पडले आहे. एकतारी कुठून मिळाली? कोणी दिली? कधी दिली? याविषयी मी स्वतः बाबांना विचारले असता "मले काय आठवत नाय आता." असे उत्तर मिळाले. "ओसाड अरण्यात फिरत असता माझी नि एका जख्खड म्हाताऱ्याची गाठ अवचित पडली. तो एकतारीवर भजने गात असे. मला ही भजनाचा नाद. मी पण बसलो त्याच्या शेजारी भजने गात. कधी तो एकतारी वाजवायचा, कधी मी वाजवायचा. दोघांचे काही दिवस छान जमले होते. मी बाळगलेली एकतारी मला कोणी दिली का त्या म्हाताऱ्या बाबाजीनी दिली, आज काही आठवत नाही." हा त्यांनी आणखी खुलासा केला. आधीच डेबूजीला भजनाचा नाद मोठा. `रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय, गोविंद राधे गोविंद राधे’ हेच नि एवढेच हरिनाम स्मरण करीत तासनतास तो एकांतात निमग्न गात बसायचा. भजनाच्या सरावामुळे आधीच आवाज गोड झारदार, तशात जातिवंत तल्लीनतेने हरिनामाचे गायन, त्यामुळे कोठेही तो गात बसला तरी आजूबाजूचे लोक हां हा म्हणता सभोवार जमून त्याचे भजन मुकाट्याने ऐकत बसायचे."अरेच्चा, हा वेडा बुवा भजने छान म्हणतो!" ही आवायी आसपासच्या खेडेगावात जायची आणि तो गावात आला म्हणजे, "बुवाजी, गा थोडे भजन गा" असा लोक आग्रह करायचे. गा म्हटल्यावर गाता तर मग तो डेबूजी कसला? लोक म्हणतील त्याच्या काही तरी उलट करायचे, त्यांना राग आणायचा, त्यांच्या शिव्या खायच्या, चिडून ते मारायला उठले का त्यातच परमानंद मानायचा, हा खाक्या. लोकांनी "म्हण की लेका एकादा अभंग" असा अट्टाहास चालवायचा आणि "मले कायबि येत नाय दादा" असे यांनी म्हणायचे. "मग झक मारायला ती एकतारी कशाला जवळ बाळगलीस? टाक फोडून" असे म्हटल्यावर "मी कशाला फोडू बाप्पा. तुम्हाला वाटले तर टाका फोडून" या उत्तरावर कोण काय जबाब देणार? कधी कधी भजनासाठी लोक हट्ट धरायचे. स्वारीने एकतारी बेसूर लावायची आणि भसाड्या आवाजात भजनाला प्रारंभ करायचा. मग मंडळी `आता बंद कर बाबा तुझं हे भजन’ असा ओरडा करून निघून जायची. स्वारी लहरीत असली नि कोणी  "बुवा, भजन करता का?" असे विचारले तर "हो हो. रात्री गावाबाहेर करीन देवाचे कीर्तन. गावकऱ्यांना निमंत्रणे द्या, बत्त्यांची सोय करा, म्हणजे थाट होईल." चिंध्या - मडकेधारी फटिंगाची ही थाटामाटाची भाषा ऐकून लोक नि पोरे टोरे खदखदा हसायची. कोण जातो एवढी कीर्तनाची सरबरायी करायला? झाले. रात्री १० वाजले. डेबूजीने आपली एकतारी सुरात लावली. रामकृष्ण हरि जय भजनाला सुरुवात केली. गावाबाहेरचा उकीरडा. आजूबाजूला काजळी अंधार. एकतान एकसुरी भजनाचा तो भरघोस गोड आवाजाचा सूर कानी पडताच, "कोण रे कोठे गात आहे? फार छान भजन चालले आहे. चला चला, जाऊ या तिकडे." म्हणत एक धावला. दुसरा धावला. तिसरा. चवथा, पाचवा. बायका पोरे, बाप्ये, म्हातारे कोतारे सारे गाव जायचे डेबूजी भोवती त्या अंधारात. "अरे एकादा दिवा तर आणा कुणी." असे कोणी म्हटल्यावर एकादे टमरेल यायचा कुणी तरी घेऊन. लोकानी काहीही केले तरी स्वारी आपल्या एकतारीच्या भजनात बेभान तल्लीन. बरेच लोक जमले म्हणजे स्वारीने भजन करायचे बंद. मग लोक ओरडायचे, "बुवाजी काही तरी सांगा. सांगायचे नसेल तर निदान भजन तरी आणखी वेळ चालू द्या." लहर असली तर हरिनामाचे महत्त्व, समाजावर संतांचे उपकार, या मुद्द्यांचा मुखडा घेऊन, शेतकरी कामकरी समाजातील कित्येक वाईट रूढी, जनावरांची हत्या, शिक्षणाचे माहात्म्य, व्यसनांचा दुष्टपणा, स्वच्छतेची जरूरी, या नि असल्या विषयांवर डेबूजी असे काही चित्तवेधक प्रवचन करायचा का आबालवृद्ध सारे श्रोते अगदी गहिवरून जायचे. 'हा म्हणतो ते सारे खरे आहे रे खरे आहे. हा काही वेडा नाही. आपल्या खेडूत समाजाची याची पहाणी फार बारीक आहे. हा साधू आहे. ठेवून घेऊ याला आणखी दोन दिवस आणि करू या याची कीर्तने चांगला बत्त्यांचा झगझगाट करून.’ गावकऱ्यांचा इकडे हा बेत चाललाय तर तिकडे डेबूजी पहाटेलाच उठून गाव सोडून पसार.

• दापुरीत काय घडले? :

९ - १० वर्षे गेली. आता घरच्या सगळ्यांची खात्री पटली का डेबूजी पुनश्च संसारात बसणे अशक्य म्हणून बळि रामजीने थोरली मुलगी अलोकाबाईचे लग्न ठरवले. डेबूजीने आशीर्वाद पाठवला पण लग्नाला आला नाही. मातोश्री सखूबाईचे ही प्रपंचावरून चित्त उडाले. रात्रं दिवस ती हरिनाम भजन करू लागली. या अपेक्षित क्रांतीची खबर लागताच डेबूजीने ऋण मोचन जवळच्या एका ओसाड खेड्यात एक काट्या कुट्याची झोपडी बांधली. आई, बायको, मुले यांना तेथे रहायला सांगितेल. झोपडीत सारा संसार मडक्यांचा. सखुबाई नि कुंताबाई मोलमजुरी करून कसाबसा निर्वाह करीत तेथे राहिल्या. डेबूजी चुकून ही कधी तिथे वस्तीला किंवा अन्न ग्रहणाला रहायचा नाही. कधी मधी फेरा आलाच तर वाजवी पेक्षा अधिक गाडगे मडके आढळल्यास ते कोणाला तरी देऊन टाकायचे. निर्वाहापेक्षा अधिक धान्य दिसल्यास गोर गरिबांना ते वाटायचे आणि जय जय रामकृष्ण हरि गर्जना करीत भटकंतीला निसटून जायचे असा खाक्या चालू झाला. या चंद्रमौळी झोपडीने ही वऱ्हाड, मुंबई, पुणे वगैरे अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. गाडगे बाबा केव्हा येतील आणि चला उठा म्हणतील, याचा नेम नसायचा. असेल ती झोपडी मोडायची आणि भलत्याच ठिकाणी दुसरी थातर मातर उभारून तिथे आई, बायको - मुलांना सांगायचे रहा म्हणून. ऋण मोचन, आमले, झिंगले, मूर्तिजापूर, पुन्हा आमले, नंतर शेगाव, फाटफ, मुंबई किंग सर्कल. नारायण शेटची वाडी माटुंगा, पुणे, आळंदी, पुन्हा मूर्तिजापूर, परत पुणे, शिवाजी पार्क दादर, वांद्रा अशा अनेक ठिकाणी त्या काट्या कुट्याच्या झोपडीचे स्थलांतर झाले, त्याची याद कोठवर द्यावी? प्रत्येक ठिकाणी नुसती झोपडी कशी बशी उभी राहायची, कोणी चांगली जागा देऊ केली तर ती कटाक्षाने नाकारायची. आणि पोट भरण्याची सोय काय? तर जे मी करतो तेच करा तुम्ही, हा जबाब. गाडगे बुवांचे कुटुंब म्हणून कोणी भक्त काही अन्न धान्य देऊ म्हणेल तर तेही परवडायचे नाही. भटकंतीचा फेरा आला नि झोपडीत काही कापड चोपड धान्य आढळले का निघालेच ते बाहेर आणि झाली त्याची गोर गरिबांना खैरात, हा प्रकार अजून ही चालूच आहे. याविषयी बाबांचे एका काळचे एक निकटवर्ती अनुयायी मूर्खानंद यांची एक आठवण येथेच वानगी दाखल दिलेली बरी. "पुण्याला सोमवार पेठेत बाबांची एक धर्मशाळा. तिच्या शेजारी एका लहानशा झोपडीत सौ. कुंताबाई रहात होत्या. आमच्या पैकी काहींनी आणि इतर बाबांविषयी आदर असलेल्यांनी आईंना काही बाही आणू द्यावे. त्यांनी लोभाविष्ट दृष्टीने त्याकडे पहात म्हणावे, "काह्याले आनलं बाप्पा? साधु बाबा (बाबा) येतीनं, तर राहू देतीन् म्हनतां काय? अईमाय्! त्याहिच्या हातावर तर जसा कर्नराजा (कर्ण) येऊन बसला!" बाबांना असे भले बुरे म्हणत आईंनी ती वस्तु घ्यावी आणि आपल्या झोपडीत लपवून ठेवावी. केव्हा तरी बाबा पुण्याला यावेत. आईंनी घाईघाईने धर्मशाळेत येऊन बाबांना म्हणावे, "तुमाले ममईले जाव् लागते ना?" बाबांना ही त्यांची युक्ति माहीत. त्यांनी आपल्या पत्नीशी म्हातारपणाचा विनोद करावा, "बाप्पा! जेव्यागिव्याले घालीत नाहीस काय मले?" आणि त्यांनी आईंच्या झोपडीकडे चालू लागावे. झाले! झोपडीत मोठ्या युक्तिबाजपणे आईंनी लपवून ठेलेल्या सामानाची लागली वाट! आईंनी घाईघाईने बाबांच्या मागोमाग निघावे. कुणाला ठाऊक? भांडाभांडी करून कदाचित् या वेळी तरी त्यांतली एखादी वस्तु ठेवून घेता येईल! पण बाबा सरळ झोपडीत शिरायचे! मग मला सर्वहुत यज्ञ करणाऱ्या ऋषींची आठवण व्हावी! बिचाऱ्या आईं जवळ बाबांच्या तीक्ष्ण दृष्टीपासून वस्तू लपवून ठेवण्याची चातुरी कुठून आसणार? बाबा झोपडीत लपलेल्या एकेक चिजा बाहेर काढायचे. कुठे कुणी दिलेली चादर, घोंगडी, लुगडे, तांब्या, परात, पळी, पार सगळ्या वस्तुंचा बाहेर ढीग पडायचा. फारतर काय, आईंनी घर म्हणून ठेवलेले धान्य ही बाबा राहू द्यायचे नाहीत! आणि शेवटी वकिली करून ही बाबांच्या पुढे टिकाव लागला नाही, की आईंनी जणू एखाद्या प्रिय जनाची प्रेतयात्रा निघावी, तशी मुद्रा करून सतृष्ण दृष्टीने त्या वस्तुंकडे पहात कपाळावर हात देऊन बसावे! बाबांनी कष्टकरी मंडळीस हांका मारून ते सगळे सामान वाटून टाकावे आणि आईस म्हणावे, "आता कशी झ्याक् झाली तुही (तुझी) झोपडी? बसली काय तथीसा? जेव्याले नाही देत काय?" आईंनी तावातावाने म्हणावे, "आता कुकून (कुणीकडून) घालू जेव्याले? तुमचा हात फिरला अशीन (असेल) सगळा (सगळ्या) झोपडीवर! आतां हाडयाले (कावळ्याला) तुकडा घाल्या पुरतं ही पीठ कशाला ठेवलं असन् तुम्ही?" बाबांनी मोठ मोठ्याने हसत धर्मशाळेकडे निघावे! आणि हा असा क्रम अनेक वर्षे सुरू होता!"

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ३ -
लोक जागृतीची पार्श्वभूमी

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

सन १९०५ ते १९१७ च्या बारा वर्षांच्या साधकावस्थेत मनसोक्त देश पर्यटन, प्रत्यक्ष जन संपर्काने नि संघर्षाने षड्रिपूंचे दमन, एकतारीचे कीर्तन आणि जागोजाग कट्टर निरिच्छतेने चालवलेली मानवसेवा नि पशु सेवा या गोष्टींच्या साधना बरोबरच लोक स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण हा डेबूजीच्या चरित्रातील महत्त्वाचा गाभा आहे. आज वरच्या साधु संतांचा लोक संग्रह आणि डेबूजीचा लोक संग्रह यात जमीन अस्मानाचा भेद आहे. हा भेद नीट लक्षात येण्यासाठी या लोकहितवादी कर्मयोगी संताने बृहन्महाराष्ट्रात सिद्ध केलेल्या लोक जागृतीची आणि लोकोपयोगी मोठ मोठ्या संस्थांच्या माहात्म्याची पार्श्वभूमी त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही. महाराष्ट्राची संत - परंपरा प्राचीन आणि असंख्य आहे. त्यांचा लोक संग्रह ही अफाट नि विशाळ आहे आणि त्यातून उद्भवलेले पंथ आणि संप्रदाय यांची ही संख्या अगणित आहे. बहुतेक सगळ्या संत संप्रदायांचा अट्टहास पारलौकीक सौख्य नि मोक्ष यांवरच खिळलेला. पृथ्वी वरील प्राप्त जिण्याची, संसाराची आणि व्यवहाराची प्रत्येक संताने कडकडीत शब्दांत निर्भर्त्सना करून आपल्या शिष्यादि अनुयायांना परलोकच्या अमृता समान काल्पनिक जीवनासाठी सर्वस्वाला झिजविण्याचाच उपदेश केलेला आहे. संत - परंपरेच्या या महिम्यामुळे महाराष्ट्रात बुवाबाजीचे भरमसाट पीक सारखे पिकत आलेले आहे आणि लक्षावधि स्त्री - पुरुष जागो जागच्या मठस्थ पीठस्थ बुवा-महाराजांच्या भजनी लागून, वाजवी व्यवहाराच्या नि विहित कर्तव्याच्या क्षेत्रांत भ्याड, पराङमुख नि दुबळे होऊन बसले आहेत. जरा कुठे एकादा विचित्र किंवा विक्षिप्त माणूस पारलौकीक मोक्ष साधनेची स्पष्ट वा अस्पष्ट बडबड करताना दिसला, लोक व्यवहारापेक्षा भलतेच वेडेचार करताना आढळला का हां हां म्हणता लोक त्याला बुवा किंवा महाराज बनवतात. त्याला मठ बांधून देतात. देवासारखी त्याची पूजा अर्चा, भजने - आरत्या करतात. बुवाच्या लोकोत्तर नि लोक विलक्षण चमत्कारांच्या गप्पा स्वानुभवाच्या साक्षी - पुराव्याने चोहीकडे फैलावण्यात येतात. मोठ मोठे पैसेवाले, निपुत्रिक, पदवीधर, शिकलेले, संसारांत पिकलेले आणि बेकर्तबगार म्हणून दैववादाला विकलेले उल्लू त्या बुवाच्या साधूपणाचा नि अवतारीपणाचा एकच डांगोरा पिटतात. त्याच्या लोक विलक्षण भलभलत्या कुकर्मांवर नि बदकर्मांवर ही गूढ अध्यात्माची जरतारी शालजोडी पांघरतात. जिवंतपणी यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधीची देवस्थाने निर्माण होतात. त्या बुवा महाराजांचा एक ठराविक संप्रदाय चालू होतो. शिष्य समुदाय आजू बाजूला तयार झालेलाच असतो. मग बुवांच्या मागे पट्टशिष्य म्हणून गादीवर कोण बसणार या भानगडीचे तंटे लागतात. कारस्थाने चालतात, मारामाऱ्या होतात, मठात जमलेल्या द्रव्यनिधीचे, मठ, समाधि, शेतवाड्या, इमारतींच्या हक्कांचे वाद आणि तंटे - कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्या खतवू लागतात. काही वकील शिष्य या बाजूला, काही त्या बाजूला असा देखावा उभा राहतो. म्हणजे बुवांचे खरे खोटे आध्यात्म जाते बुवांच्या बरोबर समाधीत आणि मठ समाधिच्या संसाराचे त्रांगडे लागते शिष्य - प्रशिष्यांच्या मागे. या सगळ्या उद्व्यावापात नि मोक्ष साधनाच्या हलकल्होळात देशाची अवस्था काय आहे? मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या जिण्याची स्थिती कशी आहे? किती लोक एक वेळा जेमतेम खातात आणि किती उपासमारीने मरत आहेत? भिकारी लोकांची, लंगड्या पांगळ्या वेड्या लोकांची संख्या का वाढत आहे? त्यांच्या जगण्या मरण्याची कोणी विचारपूस करतात का नाही? वर्षभर शेतात राबून ही शेतकरी भिकेला का लागला? शेकडो जमातींची दिनचर्या अनेक घाणेरड्या रूढींनी कशी पाशवी अवस्थेला पोचली आहे? व्यसनातिरेकांनी कुटुंबेच्या कुटंबे उकीरड्यावर कशी झुगारली जात आहेत? सावकारांचा नि सत्ताधा-यांचा जुलूम गावोगाव कसा होत आहे? इत्यादि प्रश्नांची त्या मठ - पीठ - पूजक अध्यात्मवादी गबरूंना चिंता पर्वा दिक्कत लवमात्र नसते. तू तो राम सुमर, जग लढवा दे, हा एकच त्यांचा खाक्या! बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या हर एक बाई - बुवाची विवंचना स्वर्ग लोकच्या साधनासाठी. तेवढ्यासाठी मारे कथा, कीर्तने, पुराणे नि भजनांचा आटोकाट अट्टहास अखंड चालू.

• कथा किर्तनांनी काय केले? :

कथा, कीर्तने, पुराणे आणि भजने या संस्था ब-याच जुन्या आहेत. लोकांत धर्म जागृति केल्याची पुण्याई त्यांच्या पदरी बांधण्याचा एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्म जागृति कोणती? कथा, कीर्तन, पुराण भजन, वाटेल ते ऐका, त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकूटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकाराला ही उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा, परमात्मा, योग, सिद्धी, समाधी, गुरूपदेश, सदेही विदेही मोक्ष इत्यादि शब्दांची भरमसाट पेरणी केली का चढला कथा - पुराणांना रंग. सारे श्रोते मोक्षानंदात डुलत रहायचे. कथा - पुराण संपून उठले का झाडलेल्या उपरण्याच्या फटकाऱ्यातच ते सारे ब्रह्मज्ञान झटकून जायचे. कोरडा पाषाण श्रोता घरी आल्यावर विचारले का, 'काय आज कशा कशी काय झाली?’ तर उत्तर काय? 'वा वा वा! बुवा मोठे विद्वान. बहुश्रुत. अधिकारी. संगीताची साथ पण छानदार. खूप रंग भरला, खूप रंग भरला.’ कथा पुराणांनी गेल्या दोन तीनशे वर्षांत खरोखरच काही धर्म जागृति केली असती तर हिंदु जनतेला आजची हीन, दीन, लीन, क्षीण अवस्था आलीच नसती. भजनांनी मागासलेल्या समाजात धर्म जागृति केली म्हणावी तर तेथेही हाच परिणाम दिसून येतो. कथा पुराण भजनांनी लोकांत देव भोळेपणा, भिक्षुक बडवे बामणांचा वरचढपणा, भलभलत्या दान-दक्षणांचे घाणेरडे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतः विषयी तिटकारा आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीज तोड विवंचना, बायका-मुले संसार व्यवहाराचा पातकीपणा, तीर्थ यात्रांचे दान - पिंडांचे भिक्षुक भोजनांचे गोदानांचे फाजील स्तोम, धातू दगड धोंड्यांच्या मूर्ति पूजनांचा अट्टाहास, उपासाचा बडेजाव, अशा हजार भिकारड्या भानगडी फैलावण्याचे कर्म मात्र केलेले आहे. तीन ही लोकी श्रेष्ठ असलेल्या ब्राह्मण कथा - पुराणकारांनीच असले भलभलते प्रचार कथा पुराणांतून फैलावल्यावर, अनाडी लोकांनी जाखाई, जोखाई, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा, खंडोबा वगैरे शेकडो गावठी दैवतांची पैदास करून त्यांनाही कोंबड्या - बकऱ्यांचे बळी देऊन संतुष्ट करण्याचा कारखाना खेडोपाडी धूम धडाक्याने चालवला, तर त्यात नवल कशाचे? नाक्या नाक्यावरील ओसाड जागेत एकेक गावदेव ठाण मांडून बसला आणि आवस - पुनवेला कोंबडी बकरी दारूचा नैवेद्य हबकू लागला. माणसांच्या अंगातही तो घुमू लागला. असल्या घुम्यांचा एक पंथच निर्माण झाला. घरात तापसरायी येवो अथवा गावात पटकीचा आजार फैलावो, औषधोपचारा ऐवजी सगळ्या गावकऱ्यांची भिस्त देव-खेळव्या घुम्या भगतावर. भटा भिक्षुकांप्रमाणे घुम्या भगत सांगेल ती पूर्व. त्याचा हुकूम व्हायची थातड का गावदेव नि गाव देवीपुढे धडाधड झाल्याच चालू कोंबड्या बक-यांच्या कंदुऱ्या आणि दारूचे पाट. पावसाचे अवर्षण पडले, खेळवा दे. गावकीचे तंटे पडले, लावा देवाला कळी आणि घ्या त्याचा निकाल. घरात मूल जन्माला आले, एकाद्याचे लग्न निघाले किंवा कोणी मेला, तरी दगड्या धोंड्या गाव देवाला कोंबडे, बकरे नि दारू दिलीच पाहिजे. सारा गाव मग झिंगून तर्र! आणि हे सारे कशासाठी? तर देवा धर्माच्या सांगतेसाठी. दसऱ्याला रेड्याचे बलिदान हवेच. नाहीतर रोगरायीच्या तडाक्यात गावाची मसणवटी व्हायची. शिवाय, त्या रेड्याच्या बलिदानात गाव महारांचा नि गाव पाटलांचा मोठ्ठा मान असायचा. पटकीचा रोग आला आणि सगळीकडे दुष्काळ असला तरी भीक मागून खंडीवरी तांदळाच्या भाताचे गाडे भरायचे, त्यावर गुलाल शेंदूर उधळायचा, जागोजाग कोंबडी, बकरी कापीत, रक्ताचे सडे पाडीत पाडीत, मरिआईच्या गाड्याची मिरवणूक गावाबाहेरच्या वेशीवर नेऊन सोडायची. याचा अर्थ, एका गावाची इडा पीडा दुसऱ्या गावाच्या वेशीवर नेऊन टाकायची असा असल्यामुळे, त्या गावचे लोक काठ्या, बडगे, भाले वरच्या घेऊन मरिआईच्या गाड्याला विरोध करायला अस्तन्या सरसावून उभे असतात. आमच्या गावाच्या वेशीवर गाडा आणू नका, दुसरीकडे न्या, आणाल तर याद राखा, डोकी फुटतील. या धमक्यांच्या हाका आरोळ्या चालू होतात. गाडा कोणीकडे ही नेला, तरी कोणत्या ना कोणत्या गावाची वेस असणारच तेथे. हरएक वेशीवर गावगुंड तयारच असतात मग काय? कचा कचीची मारमारी होते आणि प्रकरणे जातात फौजदारी कचेरीत. तालुक्याच्या वकिलांची पोळी पिकते. जखमी लोकांनी दवाखाने फुलतात. कधी कधी मारामारी टाळण्यासाठी मरिआईचा शेंदूर गुलालानी माखलेल्या खंडीभर भाताचा गाडा तेथेच वेशीवर टाकून बैलांसकट गावकरी माघारी पळतात, कुत्री कावळे सुद्धा तो भात खात नाहीत. कुजून जातो तसाच उकीरड्यावर. देवा धर्माच्या नावावर शहरांत नि खेड्यांत शेकडो वर्षे चालू असलेल्या असल्या प्रकारांची यादी फार मोठी नि लांब आहे. कथा पुराणकार शहरी शहाण्याना मोक्षाच्या नादी लावून लुटीत असतात आणि खेड्या पाड्यातल्या अडाणी म्हणूनच मूर्ख रयतेला गाव जोशी, कुलकर्णी, तलाठी, पाटील आणि देव भगत शेकडो फंदांत नादाला लावून हवे तसे पिळीत छळीत असतात. काही फिरते भजनी संत खेड्या पाड्यांत गेले आणि त्यांच्या कीर्तन - भजनांचा धुमाकूळ चालू झाला, का त्यांच्या ही शिकवणीत संसार असार आहे, माणसाचे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फटकन फुटेल त्याचा नेम नाही, बायका पोरे, धन दौलत, घरदार, शेतीवाडी सगळे इथच्या इथे राहणार, बरोबर काही येणार नाही, अखेर चला लंगोटा छोड ही अवस्था. तेव्हा या सगळ्यांचा त्याग करून पंढरीच्या वाऱ्या करा. तो पंढरीनाथ तुमचे तारण करील. रात्रं दिवस विठ्ठल नामाची गर्जना करा. एकादशीचे कडकडीत उपास करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पायी करा. असल्या उपदेशाचा तडाका चालू व्हायचा. हजारो खेडूत त्या बुवांच्या नादाला लागतात. घरदार धुवून त्यांच्या झोळ्या भरतात. रोजगार व्यवहाराकडे पाठ फिरवून बेकार भणंग होतात. "तू तो राम सुमर, जग लढवा दे" असल्या बेफिकिरीने पंढरीचे वारकरी बनतात. तेथेही त्यांना लुटणारे आणि कुटून काढणारे बडवे आणि भजनी टाळकुटे तयारच असतात. उपाशी तापाशी बेभान टाळ कुटीत नाचणाऱ्या असल्या कंगाल वारकऱ्यांची 'अहाहा, केवढी ही विठ्ठल भक्ती आणि केवढा हा नामाचा महिमा’ असे म्हणून वाहवा करणारे लफंगे लोक आजू बाजूला उभेच असतात. त्यांच्या चिथावणीने त्या पोकळ डोक्या वारकऱ्यांना आणखीच चेव येतो आणि मोक्षाचे सारे गाठोडे या कंगाल वारकरी जीवनातच आहे, अशा समजुतीने तो त्याच भिकारड्या निष्क्रिय भीकमाग्या आयुष्याचा अभिमानी बनतो. महाराष्ट्रातले लक्षावधी धट्टेकट्टे पुरुष आणि बाया या वारकरी फंदात सापडून स्वार्थाला नि परमार्थाला सफाचट मुकलेले दृष्टीस पडतात. वारकरी पंथाने धर्म जगवला जगवला म्हणतात तो हा असा! संसारात, व्यवहारात कायमच्या नालायक ठरलेल्या आणि देशाला जडभार झालेल्या लक्षावधी नादान बाया बुवांचा वेडपट समुदाय म्हणजेच वारकरी पंथ, अशी व्याख्या करावी लागते. खेडूत मूळचेच नाक्षर, अडाणी म्हणून अविचारी. केवळ मेंढराची जात. दाढीवाल्या बोकडाच्या मागे मुंड्या खाली घालून सगळे जाणारे. तो त्यांना चरायला कुरणात नेतो का मरायला सरणात नेतो याची चौकशी ते करीत नाहीत. असले अनाडी लोक देहाच्या सार्थकासाठी (म्हणजे कशाच्या? तेही त्यांना अवगत नसतेच.) वारकरी कळपात घुसले, तर त्यांना फारसा दोष देता येणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या ५० - ७५ वर्षांत कित्येक पांढरपेशा पदवीधर भटा - बामणांनी टाळ माळधारी वारकऱ्यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिटरकी, मास्तरकी किंवा प्रोफेसरकीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठले माझे आई भजनाच आणि ज्ञानदेव तुकाराम संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटाची जात सुशिक्षित. कथा, पुराण, प्रवचने सांगण्यात पिढ्यान पिढ्या जिभली सरावलेली आणि सवकलेली. तशात पाश्चिमात्य इंग्रेजी ज्ञानाची भर. कोणताही अध्यात्माचा मुद्दा उलट सुलट झकास विधानांनी रंगवून सांगण्याची सफाई. शहरी शहाण्यात मानकरी, म्हणून खेडुतांनाही त्यांच्या पांडित्याचा मोठा वचक, दरारा नि आदर. असले ही लोक जेव्हा हरि नामा शिवाय मोक्ष नाही, संसार असार आहे, बायका, पोरे वैरी आहेत, अंतकाळी आपले आपण, देहाचे सार्थक करण्यासाठी या माया मोहातून बाजूला झालेच पाहिजे, असा उपदेशाचा तडाका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडुतांनाही ते हडसून खडसून पटते आणि ते त्यांच्या भजनी लागतात. गुरुदेव म्हणून त्यांच्या पाया पडतात, पायांचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी घरेदारे धुतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला. ज्योतिषावर ही पोट भरण्याची पंचाईत पडू लागली. मास्तरकी, कारकुनीत ही आता काही दम राहिला नाही. म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना अनुयायी भगतांची उणीव केव्हाच पडत नाही. संसार असार आहे, एक हरिनाम सत्य आहे, हे बडबडत असताना, या वारकरी सोंगाच्या भटा - बामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठल नामाचा केवढा बरे हा प्रताप! शिवपूर्व काली आणि कदाचित शिवकाली, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी, विठ्ठल नाम संकीर्तनाने आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने, हिंदु संघटनेचे काही कार्य केले असले, (मला तर शंकाच येते,) तरी त्यानंतर या संप्रदायाने हरएक मऱ्हाठी हिंदूला माणसातून उठवण्याची आणि व्यवहारी कर्तृत्वाला मुकवण्याची दुष्ट कामगिरीच केलेली आहे. पाच पन्नास लाख लोक पिढ्यान पिढ्या संसार-व्यवहाराला रामराम ठोकून, देह सार्थकाच्या सबबी खाली आणि मोक्षाच्या आशेने गळ्यात माळा घालून टाळ कुटीत जगण्याचा धंदा करीत आढळावे, ही महाराष्ट्राच्या भवितव्यते वरची मोठी भयंकर आपत्ती आहे. देव वादाचा फैलावा. देव धर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वाऱ्यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधने शिवाय दुसरा मार्गच नाही. देव भक्तीचा आटारेटा करूनही स्वतः चे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैव रेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायला ही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव - दैववादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीची ही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? "ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा," हा एका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो. देव - दैववादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी किती ही शिकलेला असो, भविष्य पाहिल्या शिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज - शरमेचे ही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्राम जोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतर ही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशी बुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला. देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्य नारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट - भोजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या. या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुती शनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. "देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन." मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेण थापणी अशा दुहेरी रंग रंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात. देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे. दगड - माती - धातूचे देव - देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेती ही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदु धर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आज वरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि - मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हर एक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. "निवडणूकीत यशस्वी होईन का?" याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनि ऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.

• देवळांचा सुळसुळाट :

धर्माची देवळे नि देवळांचा धर्म हे एक हिंदु धर्माचे आणि समाज स्वास्थ्याचे महाभयंकर पाप होऊन बसले आहे. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून सोन काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यम वर्ग नामशेष झाला, शिक्षित पदवीधारांची बेकारी बोकाळली, असला आरडा ओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्याला ब्रम्हांड पंडिताना हिंदूच्या देवळांत किती अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग गोर गरिबांच्या उध्दारासाठी न होता, लुच्चा लफंग्या चोर जार ऎदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, याची दखल घेण्याची अक्कल अजून हि सुचलेली नाही. दुष्काळाने कोट्यावधि लोक अन्न अन्न करुन मेले तरी देवाना शिरा केशरि भाताचा नैवेद्यी अखंड चालूच आहे. लाखो श्रमजीवी कर्तबगार तरुण उदर भरणासाठी भयाभया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचे जड जवाहीर आणि सोन्या मोत्यांचे दागिने देवळी देवांच्या अंगावर चढलेले आहेतच. देशाला शेतकरि आणि कामकरी कळणा कोंड्याच्या आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या पुजारी आणि सेवेकरी नि बडवे भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळ एवढा ही खळगा आजवर कधी पडला नाही. ”विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा” असा शेकडा ९६ जीवांचा गेली शंभर वर्षे सारखा कंठशोष चालला असंताहि देवळांतल्या घुमटांखाली लाखो महामुर्ख भट गोसावडे गंजड भंजड नि ट्गे गंध भस्म रुद्राक्ष्यांच्या पुण्याई वर पोट फुटून वांति होई तो परार्धावरी पल्ले धान्यांचे बिनबोभाट फडसे पाडीत असतात. देवळांच्या छ्परांखाली ब्रम्हचार्यांरचे वंश किती वाढतात, पति नसताना ही किती विधवा पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरु महाराज मठ गोकुळातल्या चिखलात कटीबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगी भंगी ट्ग्यांचे थर तेथे खुशाल चेण्डुप्रमाणे निर्घोर जिवन कंठीत असतात याची, स्वताच्या किंवा पूर्वजांच्या स्मारकांसाठी देवळे बांधणारांनी आणि देवळे म्हणजे धर्म स्थाने समजून आंधळेपणानी त्यांची जोपासना करणारानी दखल घ्यायला नको काय? आज देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधि रुपयांची संपत्ति हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडली आहे. आणि ईकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या कर्जात खोल खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाहि मुत्सद्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही. अनाथ बालकाश्रम, अनाथ विधवाश्रम, गोरक्षण कॄष्ठरोगी लंगडे पांगळे यांचे आश्रम, मागासलेल्या समाजांतील मुलांमुलींचे शिक्षण, किती तरी समाज जीवनाच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणाराना प्रश्न आहेत. ते सोडवणाराचा घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडे रुपयांची संपत्ति शतकान शतके तळ घरात गाडलेली राहते, या नाजुक मुद्याचा आजवर एकालाही घाम फुटलेला नाही. देश - देव - धर्माच्या या असल्या विलक्षण आणि माणूसघाण्या परिस्थितीच्या पार्श्वभागावर उभे राहून डेबूजी गाडगे बाबांच्या सेवा - धर्माची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मोठ मोठ्या शहरांपासून तो ५ - १० झोपड्यांच्या कोना कोपऱ्यातल्या खेड्यापर्यंत सर्वत्र भट्कंती करीत असताना त्यांची समाज-जीवनाची बारीक सूक्ष्म टेहळणी सारखी चाललेली होती. अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात त्यांचा जन्म, त्या समाजाच्या मानसिक शारिरिक आर्थिक सर्व हालापेष्टांचा त्याना पुरा अनुभव . रक्त थिजून हाडे पिघळे पर्यत शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाहि. वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यान पिढ्या अखंड चालूच . देवा धर्माच्या आणि रुढीच्या नावावर जागोजाग पशु पक्ष्यांची हत्या बेगुमान चाललेली, गरिबानी मरावे नि श्रीमंतानी मनमुराद चरावे हा समाज व्यवस्थेचा द्ण्डक, गरिबाना गरिबीची लाज नाही. खंत नाही. जीवन सुधारण्याची महत्त्वाकांक्षा ही नाही. नाक्षर अडाणी म्हणून आस्ति - नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ति असो द्यावे समाधान." महार मांगादि जमातीनी इतरांपासून दुर खोऱ्यात का रहावे? कुष्ठरोगी वेडे लुळे पांगळे यांची समाजाने कसलि ही दाद का घेऊ नये? देव देवळांचा जागोजाग एवढा ऎश्वर्याचा बडीवार चालला असतांहि , गोर गरिबांच्या तोंडांत वर्षातून एकदाहि कोणी साखरेची चिमूट, गुळाचा खडा किंवा तुपाचा थेंब कां घालू नये? यात्रेच्या ठिकाणी भिक्षुक बडव्यांच्या मनस्वी त्रास जाच सोसून लाखो लोक मेण्ढरांसारखे कां जातात? तेथे त्यांच्यापासून पैसे उकळून काढले जातात, पण अन्नपाणी आसणाऱ्यांची निवाऱ्याची सोय कां करीत नाहीत? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.

• तीक्ष्ण निरीक्षणांचे सिध्दांत :

हजारो खेडी गावे नि शहरे पायदळी तुडवीत डेबूजीची भटकंती चालू असताना, समाजातील हर एक लहान मोठ्या घटनांचे त्याचे तीक्ष्ण निरीक्षण अखंड चालू होते. लोकांचे कोठे काय चुकते? त्याना कोण कसे नि कां चुकवते? काय केले असता अडाणी नि भोळा बहुजन समाज जागा होऊन आपल्या शेकडो ठकवणींच्या कर्ता - कर्म - क्रियापदांचा शोध आणि बोध घेईल? हे एकच विचारांचे चक्र त्याच्या मस्तकात सारखे भिरभिरत असायचे आणि आज हि ते तसेच भिरभिरत असते. अमंगल अनीतिमान नि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचेच हे असे. त्याला कोण काय करणार? अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचे निरीक्षण चिंतन मनन करीत तिथेच उभा रहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा. याचा एकच दाखला पहा. एका नाक्षर महाराचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर कुळकर्णी महाराज. "दादा, पोराचं काय पतर आलाय ते जरा वाचूनशी दावा, पाया पडतो." महाराचे ते पत्र कुळकर्ण्याने घेतले. "ही माझी लाकडे दे फोडून आधी, मग दाखवतो वाचून?" कुळकर्णी बोलला. "पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?" "आधी लाकडे फोड. मग सांगेन पत्र वाचून." तास दीडतास खपून त्याने दीड दोन गाडाभर लाकडे फोडून ढिगार रचला. "पोरगा खुशाल आहे ना, एवढं तरी सांगा दादा." अशा सारख्या विनवण्या तो महार मधून मधून करीत होता. पण प्रत्येक विनवणीला एक शिवी हासडून, "आधी लाकडं फोड गाढवा." असा कुळकर्ण्याचा तडाखा चालू. बिचारा महार आधीच उपाशी. पाण्याचा घोट मागितला तरीही शिवी आणि "काम पुरे कर आधी" ही दटावणी. अखेर दोन तीन काठीण गाठईचे ओंडके त्याला फुटेनात. जीव कासावीस होऊन तो घामाघूम मटकन खाली बसला. "दादा, तुम्हाला वाचायचे नसेल तर परत द्या, घेतो आणखी कुठून तरी वाचून. पण या गाठी पोडण्याची ताकद नाही मला." "गाठी फुटत नसतील तर पत्र ही देत नाही परत. जा चालता हो." कपाळावर हात मारून महार परत फिरणार तोच चिंध्या - मडकेधारी डेबूजी बुवाची स्वारी तेथे आली. दुरून बराच वेळ त्याने तो कुळकर्ण्याचा बेमाणुसकीचा तमाशा पाहिला होता. "आण रे बाबा इकडं तुझी कुऱ्हाड." डेबूजीने कुऱ्हाडीचे जोरदार तडाखे मार मारून त्या सगळ्या गाठीच्या ओंडक्यांचे तुकडे केले, स्वतः राशीवर साठवले आणि कुळकर्णी महाशयाकडे कदरबाज नजर रोखून म्हटले, "काय दादाजी, आता देता का नाही या महाराचे पत्र परत त्याचे त्याला." कुळकर्ण्याने पत्र न वाचताच परत केले. डेबूजी त्या महाराला म्हणाला - "बाबा, तू नि मी दोघेही गाढव आहोत. चार अक्षरं शिकले असतो, तर तुझी अवस्था ही अशी कशाला असती आणि माझी ही असी का असती? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा!" या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचने करण्याचा परिपाठ चालू ठेवला तो आज पर्यंत अखंड चालू आहे. गाडगे बाबांनी जागोजाग अनेक शाळा चलवल्या आहेत. स्कॉलर शिपांसाठी फंड जमा करून दिलेले आहेत. गयावळ पंडे नि बडवे खोट्या नाट्या नरक - मोक्षाच्या थापा मारून काशी मथुरा प्रयागाच्या यात्रेत ही लोकांना कसकसे लुबाडतात, हे स्वतः अभ्यासले. महाराष्ट्रातल्या यच्चयावत तीर्थ क्षेत्रांचा पोटभरू महिमा तर त्याच्या नित्याच्या परिचयाचा. देव - देवळांच्या थोतांडा बरोबरच जागोजाग चालू असलेली बुवाबाजी, स्वप्ने, साक्षात्कार, दृष्टांत, नवस, गुरूपदेश, समाध्या, आरत्या यांचा माजलेला धुमाकूळ आणि त्या थोतांडात साक्षर पदवीधरांपासून तो सही निशाणी आंगठा दाखवणाऱ्या अडाणी खेडुतांपर्यंत गुरफटलेला समाज, या भानगडीही त्याच्या तीक्ष्ण चिकित्सक नजरेतून सुटल्या नाहीत. एकीकडे साक्षात्कार दृष्टांत अनुभव आणि मोक्ष सिद्धीच्या खटपटींचा बाजार उसळला आहे आणि दुसरीकडे पहावे तो माणसेच माणसांना खायला उठलेली! देवा धर्माच्या नावावर जागोजाग प्राणी हत्या अखंड चाललेली! तिळा एवढ्या स्वार्थासाठी ईश्वर साक्ष खोटे बोलणाऱ्यांची चालली आहे भरभराट आणि हाडांची काडे करून मिटल्या तोंडी कष्ट मेहनत करणारांची अखंड मुस्कट दाबी! झोपडीतला मडकी गाडग्याचा संसार सुद्धा नीट चखोट करण्याचा आवाका कोणात नाही. नाक्षरांच्या अडाणीपणावर साक्षरांनी चरावे. त्यांनाही आणखी वरचढानी मनमुराद तुडवावे. भल्याची दुनियाच नाही. ही विचित्र परिस्थिती बदलली पाहिजे. अडाणी जनतेला अध्यत्माच्या बुवाबाजी खळापासून मुक्त करून, व्यवहाराच्या चोख कर्तव्य कर्माच्या राजमार्गावर आणून उभे केले पाहिजे; या एकाच ध्येयाने डेबूजीने आपल्या कीर्तन प्रवचनांच्या धोरणाची दिशा स्पष्ट आखून घेतली.

• खबरदार, पायांना हात लावाल तर :

कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू, संत, महंत काय, त्यांच्या पायांचे दर्शन आणि तीर्थ घ्यायला लोक नेहमीच धाधावले आढळतात. आणि तेही पठ्ठे, समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. कित्येक संत नमस्काराला आलेल्या भगतांच्या डोक्यावरच आपले पाय ठेवतात. असे झाले म्हणजे झालो बुवा, पावन झालो, भवसागरातून मुक्त झालो, जन्म - मरणाचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळतात. डेबूजी गाडगे बाबांनी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासूनच अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात. पण कोणालाही आपल्या पायांना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसांच्या पायांवर का म्हणून डोके ठेवावे? आदर काय दुरून दाखवता येत नाही? अशी त्यांची आचार - विचारसरणी आहे.

• ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या :

कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरतीत दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवांना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगे बाबांनी कीर्तनात ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या. तरी सुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदय स्पर्शी प्रवचनाना भारावलेल्या नि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पद स्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गाडगे बाबा जवळपास एखादी गुपचूप दडून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्होळ चालू करून दिला का सटकन निसटून त्या जागी दडून बसतात. पुंडलीक वरदा हारि विठ्ठल होऊन लोक पाहतात तो काय? गाडगे बाबा गडप, गुप्त, अदृश्य! भराभर लोक त्यांना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरून ही जायचे. अखेर, बुवा देवावतारी. झाले. गुप्तच झाले. अशा कण्ड्या पिकायच्या नि भोळसट त्या खऱ्या मानायचे. अनेक वेळा 'कीर्तन आटोपल्यावर मला तुझे कांबळे दे बरं का पांघरायला थोडा वेळ’ असे कुणाला तरी आधीच सांगून ठेवायचे आणि दडायची वेळ आली का ते कांबळे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठे तरी काळोखात बसून रहायचे. कांबळे काळे नि काळोख ही काळाच. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी त्यांना विनोदाची ही हुक्की यायची. 'अहो तो गोधड्या बुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला.’ असे कांबळ्याच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेल खेडूत श्रोत्यांपैकी एखादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे - होय तर. तो लागलाय असा सहज सापडायला. देवरूपी तो. गेला पार कुठच्या कुठं पारव्या सारखा उडून. मग बुवाजी हळूच कांबळे बाजूला सारून प्रगट व्हायचे नि म्हणायचे, "अहो, बाप्पानो, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल काय? बोल बोलता तो काय हवेत विरून जाईल? बामणांची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या फिसाटावर विश्वास ठेवण्याची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे."

• अनेक नामी साधू :

डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिक ठिकाणचे लोक त्याला निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. वऱ्हाडात त्याला डेबूजी बुवा किंवा वट्टी साधू म्हणतात. नागपुराकडे चापरे बुवा म्हणतात. मद्रास नि कोकण विभागात गोधडे महाराज. सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज. गोकर्णाकडे चिंधे बुवा. खानदेश, पुणे, बडोदे, कराची मोंगलाईत गाडगे महाराज इत्यादी अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील नि निकट परिचयातील मंडळी त्यांना श्री बाबा किंवा नुसते बाबा म्हणतात.

• डेबूजीच्या कीर्तनातली नवी जादू :

सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत. असा हरदासाने गंभीर ध्वनि काढून कथेला प्रारंभ करताच, हा एकटा हरदासच तेवढा काठावर धड धाकट उभा नि बाकीचे सगळे जग समुद्रास्तृप्यन्तु झाले असे कोणीही शहाणा कधी मानीत नाही. कथा - कीर्तन - पुराणकारांची ब्रह्म मायेची नि समाधि मोक्षाची बडबड सुद्धा एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात नि दुसऱ्याने बाहेर सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, न आवड, ना काही राम. जुलमाचा राम रामच असतो तो! त्याच पौराणिक कथा नि तीच आख्याने आणि तेच बिन काळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या

कीर्तनातल्या आख्यान - व्याख्यांनांची तऱ्हाच न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाच पडण्यापेक्षा, वर्तमान काळाच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा नि नळ - दमयंतीचा वनवास कशाला? खरं खोटा, तो झाला गेला, कालोदरात गडपला. समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या वनवासावर नि उपासमारीवर त्याचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्यांना कस कशी फसवून लुटते. अनाक्षरतेमुळे गहाण - फरोक्ताचा भेद कसा उमगत नाही. आपली बाजू खरी न्यायाची असूनही खेडूत लोक कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढायला कसे घाबरतात नि सावकार म्हणेल ते मेंढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोड गोड बालून रोजंदारीचा ठरलेला १२ आणे दाम हातावर ८ आणे टिकवून तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतकऱ्याला आपला गुलाम बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो, या अवस्थेचे शब्द चित्र आपल्या बाळ बोध गावंढळ भाषेत तळमळीने रंगवू लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यांतून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. "तुम्ही निरक्षर राहिलात ते बस्स झाले. पण आता आपल्या मुलांमुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा." हा त्याचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा. कीर्तनातले तत्त्वज्ञान परंपरेच्या ठराविक चाकोरी बाहेरचे नव्या विचारांचे तत्त्वज्ञान बहुजन समाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठ मोठ्या धर्म - पंथ - संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्य शोधनाचा नवा वळसा दिसला रे दिसला का बहुजन समाज सटकलाच लांब दूर. पण डेबूजी गाडगे बाबांची शहामत मोठी! ते आपल्या तत्त्व चिंतनातले सत्यशोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्या पुढे कीर्तनांतून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुट्या भोळसट वारकऱ्यांपासून तो कट्टर शहरी नास्तिकापर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या आबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी गाडगे बाबा ३ - ४ तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंगवून टाकतात, याचे शब्द चित्र काढणे माझ्या ताकदी बाहेरचे आहे. तो अनुभव ज्याचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा, दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो.

(१) देवासाठी आटापिटी -

बरं आता, देव म्हणजे काय? हे सांगणं कठीण आहे बाप्पा. शास्त्र पुराणं वेद यांचं हे काम. माझ्या सारख्या अनाडी खेडवळाला कसं बर ते सांगता येणार? पण माझ्या इवल्याशा बुद्धी प्रमाणे सांगतो. पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयाला ही नेणारी एखादी महाशक्ती असावी. तिला आपापल्या कुवती प्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव नि रूप दिलेले आहे. नाव रूपा शिवाय माणसाची समजूत पडत नाही. बरं आता देव कुठं आहे? संतशिरोमणि तुकोबाराय म्हणतात -

देव आहे तुझ्यापाशी ।
परि तू जागा चुकलाशी ।।

माझे भक्त गाती जेथे ।
नारदा मी उभा तिथे ।।

अशी एक कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठाव ठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात का मी वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठंही नाही. मग पत्ता? तर देव सरळ पत्ता देतात हे नारदा, माझे भक्त माझे गुणगान कीर्तन करीत असतील, तेथे द्वारपाळाची नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडं कुठं हुडकण्याची नि पहाण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो. भलभलत्या फंदाच्या नादी लागून भटकत आहोत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे. बंदे! तूं क्यूं फिरता है ख्वाब में, मैं हूं तेरे पास. आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा यात्रा तीर्थ क्षेत्रे धुंडाळू लागलो. यावर संतांचे इषारे काय आहेत पहा.

जत्रा मे फत्तर बिठाया ।
तीरथ बनाया पाणी ।।
दुनिया भई दिवाणी ।
पैसे की धुळधाणी ।।
काशी गया प्राग त्रिवेणी ।
तेथे धोंडा पाषाण पाणी ।।

तीर्थवासी गेले ।
दाढी मिशा बोडून आले ।।
पाप अंतरातले नाही गेले ।
दाढी मिशीने काय केले ।।

भुललो रे भुललो. आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराय म्हणतात.

शेंदून माखोनिया धोंडा ।
पाया पडती पोरे रांडा ।।
देव दगडाचा केला ।
गवंडी त्याचा बाप झाला ।।
देव सोन्याचा घडविला ।
सोनार त्याचा बाप झाला ।।
सोडोनिया खऱ्या देवा ।
करी म्हसोबाची सेवा ।।

दगडाला चार दोन आण्याचा शेंदूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडता, तोंडात राख घालता, ही काय रे बाप्पा तुमची अक्कल? देव मूर्ती घडवणारे पाथर वट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला. आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्ड्याकडं चाललो आहोत. म्हसोबा मरीआई पुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललंय ते पहा.

सवाल -
जगात देव किती आहेत?

जबाब (श्रोत्यांचा) -
एक.

सवाल -
देव एकच आहे, हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बाप्पा. आपल्या गावी खंडोबा आहे का नाही? (आहे.) मग आता देव किती झालं? (दोन.) आपल्या गावी भैरोबा आहे काय? (आहे.) आता देव किती झालं? (तीन.) आपल्या गावी मराई आहे का नाही? (होय, आहे.) आता देव किती झालं? (चार.) आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? (आहे.) आता देव किती झालं? (पाच) पहिलं म्हणत होता देव एकच आहे म्हणून. मग हा कारखाना कुठं सापडला? आणि याची वाढ कुठवर लांबणार? अशा लोकांना तुकोबा म्हणतात, "वेडं लागलं जगाला देव म्हणती धोंड्याला" मेंढे आहोत आपण. काही ज्ञान नाही. एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगाव पहावं तर दगडांना शेंदूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालू ठेवलाय.

अहो,
बाप्पानो, दगड धोंड्यांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसाला ही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटेबाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठ मोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरंढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमंल का हे असं केलं तर? (नाही, नाही, नाही.) तर मग हा धंदा लबाडीचा आहे.

(२) साकार निराकाराचा वांझोटा वाद -

अखिल विश्व निर्माण करणारा आणि ते सुयंत्र चालवणारा कुणी तरी असावा. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, काय वाटेल ते नाव द्या. पण तो चार हातांचा आहे, आठ हातांचा आहे, भक्तांना स्वप्नांत दर्शन देतो, मोठा प्रकाश पाडतो, भक्तांना साक्षात्कार होतात, या गोष्टी थोतांड आहेत, असा बाबा सिद्धांत सांगतात. `स्वतःची बुवाबाजी माजविण्यासाठी या थोतांडाचा मतलबी लोक मोठा व्यापार करतात. त्यापासून शहाण्याने सावध असावे.’ "माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ती बनवतो आणि आपलेच चित्र उभे करतो आणि त्याला देव समजून लोटांगणे घालतो. माणसा सारखाच देव असता, तर देवाला साधले ते माणसाना ही साधले असते. देव सगळ्यांना सारखा पाहणारा. किडी मुंगीपासून सगळ्यांवर त्याची दया सारखी. मग अमक्याला दर्शन दिले नि तमक्याला द्यायचे नाही, असला भेदाव त्याच्यापाशी का असावा? माझी खात्री झाली आहे की देव साकार नाही आणि निराकार ही नाही. तो कुणाला दर्शन देत नाही. व्हायचंच नाही ते. दर्शनाची, स्वप्नाची, साक्षात्काराची नि प्रकाश दिल्याची सारी सोंगे ढोंगे आहेत." "देव दिसणारच कसा? तो कसा आहे, हेच मुळी आजवर कुणाला उमगलेले नाही मोठे मोठे ऋषि मुनि होऊन गेले. 'आम्हाला हे देवाचे गूढ समजले नाही हो नाही.' हे त्यांनी चक्क कबूल केले. तरीही या देव दर्शनाच्या नि साक्षात्काराच्या गप्पा चालूच आहेत. खोट्या आहेत त्या साऱ्या."

(३) अंगात येणारे देव -

तुमच्याकडं देव अंगात येतात का? (होय. येतात) आज वर देव कुणाच्या अंगात आला नाही, येत नाही आणि येणार पण नाही. तुम्हा आम्हाला देवाच्या रंग रूपाचा नाही ठावठिकाणा, असा तो देव माणसाच्या अंगात येईलच कसा? अंगात देव आल्याचे सोंग करणाऱ्या घुमाऱ्यांना नि अंगारे देणाऱ्यांना चांगले फैलावर घ्यायचे सोडून, आपण त्यांच्यापुढं नाकदुऱ्या काढतो. देवा असं कर, तसं कर म्हणतो. कसला हा अडाणीपणा? देव अंगात आणण्याच्या कामी पहिला नंबर बायांचा. दोघी चौघी जमल्या, एक ऊदकाडी पेटवली, नाकात थोडं धुपट गेलं का झाली नाचा उडायला नि घुमायला सुरुवात. ज्या बाईच्या अंगात येतं तिचा नवरा हवा चांगला खमक्या मर्दाना. पण हा असतो मसाड्या. बाई नाचायला, उडायला लागली तर हा धुपाटण्यात ऊद घालून तिच्यापुढं नमस्कार घालतो. मग त्या बाईला येतो डबल जोर. ती जोरजोरात नाचायला लागते. याला औषध फार सोपं आहे. पण त्या बाईचा नवरा खरा मर्दाना पाहिजे. आपली बायको लाज लज्जा गुंडाळून नाचायला लागली का एका बाजूने जाऊन त्याने तिच्या अशी सज्जड थोबाडीत भडकावून द्यावी, एका थपडीत तिचा घुमारा बंद. शकून सांगणारे, अंगारे धुपारे देणारे, ताईत गण्डे दोरे बांधणारे आणि हे घुमारे यांच्या सावलीत सुद्धा जाता कामा नये. यांच्या नादी लागला त्याचे झालेच वाटोळे समजा. या अंगातल्या देवांची मजा पहा. मुंबईला डोंगरीहून देव घुमत निघाला चौपाटीकडे. आता देवाची हुशारी पहा. रस्ता मोकळा असेल तर देव मेनरोडच्या अगदी मधोमध नाचत उ़डत घुमत जातो. जर का समोरून एकादी मोटार टों टों करीत आली का देव झटकन फूटपाथच्या बाजूला धाव घेत जातो. मोटार गेली से दिसले का पुन्हा सगळे ते मांग डफलेवाले मंजिरीवाले नि त्या २ - ३ बाया लागल्या पुन्हा मेन रोडच्या मधोमध येऊन टपांग डांग चिन् वाजवीत नाचायला, घुमायला. अशा ढोंग धत्तुऱ्यारा बाबांनो तुम्ही काय देव समजता? असल्या देवांची चांगली सटक जाईपावतर झणझणीत पूजा केली पाहिजे काठी खराट्याने. पण आपण पडलो मेंढ्याचे मावस भाऊ! (अंगात देव आणणाऱ्या बायांची नि त्यांच्या ढोलकी तुण तुणेवाल्यांची हुबेहूब नक्कल करताना गाडगे बाबा इतके विनोदी रंगात येतात की लोकांची हासता हासता मुरकुंडी वळून, शरमेने ते माना खाली घालतात.)

(४) आणि तो सत्य नारायण -

(सार्वजनिक सत्य नारायणाच्या महापूजेचे व्यसन सगळीकडे फार बोकाळलेले आहे. पुष्कळ वेळा एकाद्या ठिकाणी असल्या सत्य नारायणाच्या महापूजेचा बेत ठरवून, पाठोपाठ गाडगे बाबांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. ठरल्या वेळी बाबा येतात ते थेट कीर्तनाच्या जागेवर जाऊन उभे राहतात. सत्य नारायणाच्या थाटाकडे ते पाहत ही नाहीत. नमस्कार ही करायचे नाहीत आणि तीर्थ प्रसाद ही घ्यावयाचे नाहीत. मग कशाला करतील ते स्पर्श त्या तुपाळ शिऱ्याच्या प्रसादाला? कीर्तनात हरि नामाच्या गजर चोलू होऊन प्रवचनाला रंग चढला का मग बाबांचा हल्ला सत्य नारायणावर कसा चढतो ते थोडक्यात पहा. ``आता हा सत्य नारायण देव लोकांनी तयार केला आहे. चांगला सोयिस्कर देव आहे बरं का हा. सव्वा रुपयात हवा तो नवस पुरा पाडतो. सव्वा रुपयात हल्ली मजूर नाही कामाला मिळत. आणि मिळाला तरी चोख काम करील तर हराम. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मघाशी तुम्ही त्याची पोथी ऐकलीच असेल. त्या कलावति का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईनं सत्य नारायणाचा प्रसाद खाताच. झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर काय? आहे का नाही या देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धांत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो मोठ मोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सत्य नारायणाची सोपी युगत अजून त्यांना कोणी सांगितली नाही कशी, कोण जाणे? बंदरावर एक मोठा सत्य नारायण केला, त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला का भरभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील. येतील का नाही, सांगा तुम्ही? ही लांबची विलायतची भानगड राहू द्या. आपल्या जवळच्या मुंबई बंदरातच ती रामदास बोट बुडाली आहे.

बाप हो,
माझी पैज आहे. एक कोट रुपये रोख देतो. कोणीही सत्य नारायणाच्या भगतान अपोलो बंदरावर सत्य नारायणाची महापूजा करून, ती बोट वर आणून दाखवावी असं झालं नाही, तर हा सुद्धा, बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा एक लबाडीचा धंदा आहे. त्यांच्या नादी लागू नका."

(५) देवापुढे पैसे फळे ठेवू नका -

देवापुढे पैसा अडका, फळ फळावळ ठेवली म्हणजे आपण मोठे पुण्य केलं अशा समजाचे लोक पुष्कळ आहेत. ही त्यांची चूक आहे,

बाप्पांनो,
चूक आहे. भूल आहे. देव मोठा का आपण मोठे? (देव मोठा.) सर्व काही देवाने आपल्याला द्यायचे का आपण देवाला? (देवाने द्यायचे) देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसे का ठेवता? हा देवाचा अपमान आहे. देवापुढे पैसे ठेवणारे लोक मोठे डोकेबाज नि हुशार असतात हां. देवाच्या पाया पडायला जातो नि नमस्कार करून पुढे काय ठेवतो? तर एक भोकाची दिडकी! आपल्या खिशात शंभर दहा पांच रुपयांच्या नोटा असलेल्या देवाला काय माहीत नसतात का हो? सगळा अस्सल माल आला नि रद्दी तेवढी देवाची. हा न्याय कुठला हो बाबांनो? जरा विचार करू याआपण. देव त्या भोकाच्या दिडकीने खूष होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर तो रुष्टच होईल.

अहो,
कसल्या तरी क्षुल्लक चुकीसाठी पोलिसाने आपल्याला पकडले, तर सुटकेसाठी तो सुद्धा भोकाच्या दिडकीने खूष होतो काय? त्याला लागते हिरवी नोट. दिली नाही का बसलाच त्याचा दण्डा आपल्या पाठीवर. हे पहा बाप्पांनो, पैशा अडक्यानं नि फळ फळावळींनी देवाशी चाललेला आपला हा व्यापार मूर्खपणाचा आहे. पैसा, फळे देवापुढे ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप पहा. पैसे लावील पुजारी आपल्या कडोसरीला नि फळांवर पडेल त्याच्या मुला मुलींची धाड. देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्तिशिवाय कशाचा ही भुकेला नाही. "देव भावाचा भुकेला... धरा बळकट भाव, आपोआप भेटे भाव." भक्तिभावाने केलेल्या एका नमस्कारातच देव खूष असतो. राजी असतो. म्हणून सांगतो हात जोडून का बाबांनो देवापुढं पैसा अडका, फळ फळावळ ठेवू नका. देवाला नवस करू नका. केले असतील तर देऊ नका. देव कुणाच्या नवसाला आजवर पावला नाही, आज पावत नाही, पुढे पावणार नाही. देवाला नवस देणारे घेणारे व्यापारी, सावकार तुम्ही बनू नका. प्रपंच करून शिवाय वर मोठेपणा मिळावा यासाठी धूर्त लोकांनी तर्का तर्कांनी भोळ्या भाविकांना पद्धतशीर जाळ्यात अडकवण्यासाठी ही अनेक देव देवतांची लफडी निर्माण केली आहेत. ती देव दैवते नसून पुजाऱ्यांची अल्प भांडवली दुकाने आहेत. या दुकानांवर देवाणीचा नव्हे तर फक्त घेवाणीचाच सवदा होत असतो. असल्या फंदांचा सर्व संतांनी कडकडीत निषेध केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात -

म्हणती देव मोठे मोठे ।
पूजताती दगड गोटे ।।
कष्ट नेणती भोगती ।
वहा दगडाते म्हणती ।।
जीव जीव करूनी वध ।
दगडा दाविती नैवेद्य ।।
रांडा पोरे मेळ झाला ।
एक म्हणती देव आला ।।
नाक घासूनी गव्हार ।
देवा म्हणती गुन्हेगार ।।
एका जनार्दनी म्हणे ।
जन भुलले मूर्खपणे ।।

(६) नवसाने पोरे होतात? -

कामंधामं आटपल्यावर संध्याकाळी भोळ्या बाया नि त्यांचे मालक सुद्धा शिळोप्याच्या गप्पा मारायला गावच्या देवळात जमतात. दर्शन घेतल्यावर मालक थोडा वेळ बाहेर थांबतात. हो, कारण ज्ञानोबाराय सांगतात ना की,

देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।

दररोज या चारी मुक्ति साधण्याचा लाभ टाळायचा कसा? मालक गेले का बायांची पार्लमेण्ट भरते. तिथं कस कसल्या भरताड गप्पा निघतील त्याचा नेम नाही. एकादी भागूबाई गंगूबाईला सांगते, "बगा बया, मला पदर आला तवापून चार वरसं झाली, सा वरसं झाली, पुन मुलाचा पत्या नाय. त्या भीमा आजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला. जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस. फुकाट दीस कशाला घालवता? दुसऱ्याच दिशी कारभारी नि मी खंडोबाकडं गेलू, नवस केला, आनं तवापासनं हा नाऱ्या, गंप्या, चिंगी नि बनी झाल्या पगा बायांनो. देवाच्या दरबारात बसलूया समदी आपन. खोटं कशाला बोलायचं? त्ये पहा समूरच कारभारी बसल्याति. इचारा त्येना हवं तर. खरं का न्हाय वो कारभारी!" कारभारी पडला नंदी बैलाचा मावस भाऊ. तो सरळ होकाराची मान हालवतो. आता विचार करा माझ्या माय बापानो, खंडोबापासनं जर पोरं होतात, तर नवरा चांगला, नवरी चांगली, मुहूर्त पहा, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेण्डबाजा लावा, वरात काढा, नवरा बायकोचा जोडा खोलीत घाला, या खटपटी कशाला हो हव्यात? कुण्या ही बाईनं उठावं, देवळात जावं, देवाला सांगून चार पोरं आणि दोन पोरी घेऊन यावं. सोपा कारखाना. जमंल का हे? (नाही नाही) नाही ना? मग नवसानं पोरं झाली नि होतात, असं म्हणणारांची माथी कशी पोकळ आहेत बरं? तुकाराम महाराज म्हणतात -

नवसे कन्या पुत्र होती ।
मग का कारणे लागे पति ।

देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबांनो. तीर्थ क्षेत्रे, जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुल भुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढी मिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा.

(७) जादूटोणे आणि चमत्कार -

जादूटोणे आणि चमत्कार यावर विश्वास ठेवणारांची विनोदपूर्ण कोटिक्रमांनी कीर्तनात बाबा टर उडवू लागले का हास्याचे खोकाट उडतात. "जादूटोणे करून अथवा मूठ मारून हवा त्याचा धुव्वा माणसाला उडवता येता तर मग तो देवापेक्षा ही मोठा म्हटला पाहिजे. लढायात असले आठ दहा मूठ मारणारे सोडले का काम भागले. कशाला हव्यात बंदुका, तोफा नि ते आटम बांब?

मंत्रच वैरी मरे ।
तरी कां बांधावी कट्यारे।।"

"चमत्कार! अमका माणूस म्हणे एकदम गुप्त झाला. एकाच वेळी चार दूर दूरच्या गावात लोकांना दिसला. असं कधी होतं का बाप्पा. खोटं आहे हे सारं. मुळीच विश्वास टाकू नका असल्या गटार गप्पांवर. देवाला घाम फुटला. मारुतीच्या बेंबीत म्हणे कोणाला टिळक दिसले. का बाबांनो आमच्या टिळकांची नि त्या मारुतीच्या मूर्तीची अशी हकनाहक बदनामी करता?" "सगळ्या पोथ्या पुराणांत हे असले चमत्कार रगड लिहिले आहेत. पण खरं खोटं आपण उमजून घेतलं पाहिजे. उगाच मेंढ्या मागे मेंढ्यासारखं जाण्यात काय हशील?" "माणूस हाच एक मोठा चमत्कार आहे. त्यातल्या त्यात कष्ट मेहनत करून जमिनीतून अन्नाचे सोने काढणारा शेतकरी उपाशी मरतोच कसा? हा एक मला मोठा चमत्कार वाटतो. या चमत्काराचे मूळ शोधायचे, त्यातले खूळ टाकायचे, का अमका गुप्त झाला नि तमका दहा ठिकाणी एकदम दिसला, असल्या चमत्कारांच्या गप्पा मारीत बसायचे? याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे बाबांनो."

• बाबांच्या मागे चमत्कारांचे लिगा़ड -

जुन्या संत - चरित्रकारांनी आणि पोथ्या पुराणांनी चमत्कार साक्षात्कार दृष्टांत नि स्वप्नांतल्या प्रेरणांचा लोकमतांवर भलताच परिणाम करून ठेवलेला आहे. स्वतः गाडगे बाबा या फिसाटांचा कडकडीत निषेध दररोजच्या कीर्तनात अखंड करीत असून ही, त्यांच्या ही मागे चमत्कारांचे नि साक्षात्कारांचे लिगाड लटकवणारे लोक किती तरी आढळतात. बाबांच्या पायांना हात लावला म्हणजे दारिद्र्य जाते, अशा कंड्या पिकल्यामुळे, कीर्तन आटोपताच, बाबांच्या काठीचा तडाका खाऊन ही पायाल चुटपुटता हात लावण्याची शिताफी साधू पहाणारे भ्रमिष्ट जागोजाग दिसतात. एकदा एका गृहस्थाशी बाबा रेल्वे स्टेशनवर बोलत उभे होते. इतक्यात गाडी आणि 'याच गाडीने जा तुम्ही’ असे बाबा म्हणाल्या वरून तो गृहस्थ तसाच तिकिटा शिवाय गाडीत चढला. मध्यंतरी तिकिट तपासणारे आले. सगळ्यांची तिकिटे तपासली. हा गृहस्थ चुळबुळत घाबरून बसूनच राहिला. त्याचे तिकिट मागितलेच नाही. "काय चमत्कार बाबांचा पहा", आपल्या आठवणीत तो मला लिहितो, "इनस्पेक्टराने एकदा ही माझ्याकडे पाहिले नाही आणि मी सुखरूप घरा आलो." तिकिट तपासणाऱ्यांचे पुष्कळ वेळा असे दुर्लक्ष्य होते. नाही असे थोडेच? पण त्या भाविक गृहस्थाला तो बाबांनी घडवलेला चमत्कार वाटला आणि तो त्याने मला मुद्दाम लिहून कळवला. अशा गोष्टी बाबांच्या कानांवर गेल्या म्हणजे काय करावे असल्या लोकांना? असे म्हणून कामाला लागतात. कीर्तन झाले म्हणून गावचा पटकीचा फेरा चुकला. असा ही एक चमत्कार एकाने कळवला आहे. वस्तुस्थिती काय झाली? कीर्तनाच्या गावात बाबा आणि मंडळी गेली. गावभर त्यांना घाण दिसली का आधी ते स्वतः हातात खराटा घेऊन बरोबरच्या मंडळीसह मिटल्या तोंडी गाव सफाईच्या कामाला लागतात. या सफाईच्या तडाक्यात गावचे लेंड ओहोळ ही आरशासारखे स्वच्छ व्हायचे. बाबाच स्वतः त्या घाण सफाईच्या कामाला लागल्यावर गावकरी ही खराटे, टोपल्या, फावडी नि कुदळी घेऊन धावायचे. जन्मात ज्या गावची घाण कधी निघायचीच नाही, ती खरचटून साफ झाल्यावर पटकीचा फेरा येतोच कशाला मुळी? स्वच्छतेचे हे साधे तत्त्व लक्षात न घेता, झाला तो बाबांच्या कीर्तनाचा चमत्कार झाला, असे मानणारे भाविक भाबडे लोकच गावोगाव फार. `कसे शहाणे होणार हे अडाणी लोक, कोण जाणे’ इतकेच म्हणून बाबा स्वस्थ बसतात.

(८) हिंसा बंदीचा अट्टाहास -

मांस मांस सब एक हि है ।
मुरगा बकरा गाय ।।
ऐसा मानव चूतिया ।
बडा प्रेमसे खाय ।।
अपने बेटे का शिर मुंडावे ।
देख सुरा लग जाय ।।
दूसरे की तो गर्दन काटे ।
जरा शरम नहि आय ।।

जन्मवरी पोसे लेकूराच्या परी ।
हातीं घेउनी सुरी उभा राहे ।।
असा कसा तुमचा देव ।
घेतो दुसऱ्याचा जीव ।।

- तुकाराम

या आणि अशाच अनेक संत वचनांचा आधार घेऊन कीर्तनात हिंसा बंदीचा अट्टहास गाडगे बाबा विलक्षण उमाळ्याने करतात. लहानपणा पासूनच भूतदया हा त्यांचा स्वभाव विशेष. कीर्तन द्वारा त्यांनी महाराष्ट्रात शेकडो गावी देवांच्या नावानी होणारी कोंबड्या - बकऱ्यांची आणि रेड्यांची हत्या कायमची बंद पाडलेली आहे. त्यांच्या अनुयायांसह बाबा तेथे धाव घेतात आणि दगडाला ही पाझर फुटेल असा युक्तिवादाने लोकांचे मने जिंकून त्यांना त्या खाटकी कर्मापासून परावृत्त करतात. या हत्याबंदीचा तपशीलवार इतिहास विस्तृत आहे. ठिक ठिकाणच्या जीवदया मंडळाने ही आपल्या चळवळीसाठी बाबांच्या कीर्तन - प्रचाराला अनेक वर्षे वरचे वर निमंत्रणे दिलेली आहेत. हिंसा - विध्वंसनाच्या प्रवचनात बाबा तल्लीन झाले म्हणजे लोकांना विनोदी चुटक्यानी रंजवितात, संत वचनानी पाप कर्माचा इषारा देतात आणि एकाद्या जिवलग स्नेह्याच्या भूमिकेवरून त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला अशा खुबीने आळवतात, का कीर्तनातून परततानाच सारे श्रोते हत्या बंदीची शपथ घेऊनच घरोघर जातात.

• मठ - पीठाच्या खटपटीचा निषेध :

साधकावस्थेत आणि त्यानंतर बाबांच्या प्रचार संचार नि आचाराची मोहिनी अनेकांना लागली. आपण ही या वैराग्यशील लोकसेवेला लागावे अशा आशेने बरेच लोक बाबांच्या जवळ आले. त्यांच्या निरिच्छ वैराग्यशील जीवनाची अवधूत गंगा कृतार्थाच्या सागराला मिळण्यासाठी फोफावत जात असताना, वाटे वरची काही झाडे झुडपे तिच्या पाण्याच्या ओलाव्याने तरारली. विरक्तीचा विवेकी शिडकाव पडलेला कोणी का असामी जवळ येतोसा दिसला का त्याला बाबा हाताशी धरीत. त्याच्या लोक सेवेच्या महत्त्वाकांक्षेला नि विरक्तीच्या ठिणगीला हळुवार फुंकर घालून तो प्रज्वलित करीत. बाबांचे संघटना-चातुर्य असामान्य. नजरेला नजर भिडली का माणसाच्या मनाची इमानाची नि कर्तृत्वाची खोली ते चटकन अंदाजतात. आजवर त्यांनी अनेक माणसे जवळ केली. त्यांना कार्याची दिशा दाखविली, कीर्तनांचे शिक्षण दिले, आपल्या बरोबर खराट्याचा सेवा धर्म शिस्तवार पाळायला लावला. पण त्या अनुयायांच्या कार्य सिद्धीची अथवा कसोटीची वाट पहात कधीच ते कुठे थांबले नाहीत. ते आपला निश्चित मार्ग एकत्रित आक्रमीतच राहिले. म्हणूनच आज त्यांच्या भोवताली शेकडो विरक्त अनुयायी, निष्ठावान भक्त आणि चाहते श्रीमंत दाते यांचा भरगच्च वेढा पडलेला असता ही, बाबा त्या सर्वांपासून अगदी अलग, भिन्न, दूर, अलिप्त आणि अक्षरशः एकटे आहेत. स्वतःलाचा डोके टेकायला निवारऱ्याची इंचभर जागा ठेवायची नाही, तेथे मठ, पीठ नि मंदिराचा मोह टिकणारच कसा? वाटेल तिकडे स्वतंत्र संचार करावा, कीर्तनांनी लोकांना हितोपदेश सांगावा, मिळेल ती ओली, कोरडी भाकर खावी आणि कोणत्याही गावी एक दिवसावर चुकून ही न रहाता भ्रमणाची गति अखंड ठेवावी. विसाव्यासाठी सरळ अरण्यवास पत्करावा! हा स्वतःचा बाणा अनुयायांनी चालवला पाहिजे, एवढीच बाबांची अपेक्षा. त्यांच्या मनात कोणा विषयीही मोह अथवा माया कधीच निर्माण झाली नाही. अगदी त्यांच्या आवडत्या अशा कीर्तनकारां विषयी ही नाही. विरक्तीच्या मार्गावरून ढळतोसा दिसला रे दिसला का दिलाच बाबांनी केळ्याच्या सालपटासारखा दूर भिरकावून! तिथे मग दया नाही, माया नाही नि कोणाची पर्वा नाही. बाबांच्या असामान्य निःस्पृहतेचे मर्म येथेच आढळते.

• ना मंत्र ना गुरूपदेश :

शिष्यांच्या कानात मंत्रोपदेश देणे, ठराविक संप्रदायाची माळ गळ्यात घालणे किंवा एकादा विशेष पेहराव वापरायला लावणे, या मामुली संताळी चाळ्यांना गाडगे बाबांनी केव्हाही थारा दिला नाही नि मुलाजा ही राखला नाही. "ज्यांना लोक सेवेची ही कष्टाची कामगिरी आवडत असेल, त्यांनी कडकडीत निर्लोभी वृत्तीने ती करावी. परवडली नाही, संसाराचा मोह मनात डोकावू लागला रे लागला का झटदिशी हा मार्ग सोडून खुशाल प्रपंचाला लागावे." हा त्यांचा इषारा वरचे वर ते अनुयायांना देत असतात. आधी प्रपंच करा नि मग परमार्थाला लागा, हे प्रत्येक नवागताला बाबा अट्टहासाने सांगतात. अविवाहिताला सुद्धा "लग्न करून ही बायको सकट लोक सेवेच्या मार्गाला लागलास तरी हरकत नाही. पण दांभिक ब्रह्मचर्य नको." असा खडखडीत इषारा देतात. शिष्य म्हणून मिरवणारांना अनुलक्षून कीर्तनात ते कटाक्षाने जाहीर सांगत असतात की - मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही. स्वयं प्रेरणेने प्रपंचाचा मोह टाकून जे जे कोणी निरिच्छतेने आणि निर्लोभी वृत्तीने दीनोद्धाराच्या आणि अडाणी जनतेला देव धर्म विषयाचे खरे ज्ञान देऊन त्यांना कर्तबगार बनवण्याच्या कामात तल्लीनतेने झतटत झगडत अजून माझ्या मागे टिकून राहिलेले आहेत, ते सारे माझ्या अनंत जन्माचे गुरूच आहेत." परवा एका गावी कीर्तन करीत असताना आपल्या एका अनुयायाचा बाबानी गुरुबंधू म्हणून उल्लेख करताच, सभोवारचा हजारो श्रोतृगण चमकला. शिष्याला बाबा `गुरुबंधू’ म्हणतात हे काय गूढ असावे, हाच प्रत्येकाला प्रश्न पडला. खुलासा विचारला असता बाबा हासत हासत म्हणाले - "बाप्पा, तुकाराम बुवा आमचे समद्याहीचे (सगळ्यांचे) गुरू. त्याहीचे (त्यांचे) आमी सगयेच (सगळे) शिष्य न हो काय?" या छोट्याशा उत्तरातच बाबांच्या सांप्रदायिक निषेधाचे सारे ब्रह्माण्ड आढळते.

• कीर्तन - सप्ताह आणि भंडारे :

बाबांचा लोकसंग्रह शतरंगी आहे. त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत ब्राह्मणांपासून तो थेट महार मांगापर्यंत सर्व जमातीचे कीर्तनकार भजनी लोकसेवक आणि त्यागी संचारी प्रचारक यांचा सरमिसळ भरणा झालेला आहे. कोण कोठचा नि कोणत्या जातीचा हा भेदच उमगायचा नाही. भेदातीत बंधुभावाचे इतके कौतुकास्पद उदाहरण उभ्या भारतखंडात एकाहि संघटनेत आढळणार नाही. `कीर्तनाला जा’ असा बाबांचा हुकूम सुटला आणि नवशिक्याने कुठे जाऊ या? असा सवाल टाकला म्हणजे बाबा सांगतात - "हवा तिथे हवेसारखा जा. पाय नेतील तिकडे जावे. हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे." बाबांच्या कीर्तनाची मोहिनी महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात संचारल्यावर, जागोजाग लोक त्यांना सप्ताहाचा आग्रह करू लागले. जा त्या गावी, लावा विणा, असा हुकूम सुटला का अनुयायांपैकी कोणीतरी तेथे जाऊन सप्ताहाचा प्रारंभ करायचा. सातव्या दिवशी फक्त कीर्तनाला बाबा हजर. गाडगेबाबांचे कीर्तन होणार ही आवाई गेली का आसपासच्या १० - १० नि १५ - १५ कोसांवरून स्त्री - पुरुष - मुलांचे घोळकेच्या घोळके पायी, घोड्यांवर नि गाड्यांतून जमा व्हायचे. त्या चिमुकल्या खेड्यात किंवा तालुक्याच्या गावात एकाकी मोठे लष्कर उतरल्या सारखा गाडीतळ पडायचा. माणसांची तर दाटी वाटीची यात्राच जमायची.

• प्रसादाच्या भंडाऱ्याची योजना :

बाबांच्या कीर्तनासाठी गावोगावचे हजारो लोक आस्थेने यायचे. मावळतीला परक्या गावी आल्यावर त्यांच्या जेवण्या खाण्याची सोय काय? कीर्तन रात्री ९ च्या पुढे चालू व्हायचे नि मध्यरात्री १ - २ वाजता पुरे व्हायचे. म्हणजे रात्रभर मुक्काम करावाच लागे. सुखवस्तू आपापल्या पुरते फराळाचे आणीत. पण केवळ बाबांच्या रसाळ कीर्तनाच्या रंगात रंगण्यासाठी अन्न पाण्याची पर्वा न करता आलेल्या इतर असंख्य जनांची सोय काय? त्यांनी काय उपाशी पोटी कीर्तन ऐकावे? थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार, या तुकोक्तीच्या संदर्भाने बाबांनी लोकमताचा कल भंडाऱ्याकडे मोठ्या कुशलतेने वळवून, सप्ताहाच्या दिवशी भंडाऱ्याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. "गोर गरिबांसाठी थोडे बहुत अन्नदान कराल तर ठीक होईल. आपल्याला दूध द्यायची सक्ती नसेल तर ताक तरी द्यावे. तेहि नसेल तर पोटभर पाणी पाजावे 'आईये बैठीये पीजे थोडा पाणी, यह दो बातों को नलगे पैसा और आणि.’ आपल्याकडे येणाऱ्यांचा प्रेमाने आदर करणे हा मोठा गृहस्थ धर्म आहे." अशा अर्थाचे बाबांचे उद्गार बाहेर पडताच मग काय हो! सारे गावकरी कंबर कसून भंडाऱ्यासाठी साहित्याची भराभर जमवाजमव करायचे. ज्वारी - गव्हाच्या पिठांची पोती, साखरेच्या गोणी, गुळाच्या ढेपी, भराभर थप्प्या लागायच्या. चुली पेटायच्या. पुरुष बायका मुले कामाला लागायची. सैपाक तयार झाला का पुढचा थाट पहा कसा व्हायचा तो. बाबांनी नि अनुयायांनी हातात खराटा घेऊन भोजनासाठी जागा अशी स्वच्छ नि चोख झाडायची का सारे गावकरी आश्चर्याने बघतच रहायचे. ज्वारीच्या पिठाने रांगोळ्या घालायच्या पत्रावळी मांडायच्या. "बाबा आम्ही आहोत, तुम्ही नुसते पहा." असे कुणी सांगितलेले परवडायचे नाही. कामाचा झपाटा सारखा चालू. पंगती सुद्धा नीट सरळ ओळीत रांगेने आखायच्या. वेडे वाकडे जड बोजड थातर मातर खपायचे नाही. पंगतीच्या मांडणीचा थाट पाहून शहरी इंजेनर ही तोंडात बोट घातले पाहिजे आणि खेडुतांना ही शिस्तीच्या वळणाचा धडा घेता आला पाहिजे, असे धोरण. वेळ झाली का सगळे भोजनार्थी पाहुणे, जात कुळी, धर्म, स्पृश्य - अस्पृश्य कसला ही भेद न जुमानता, सरळ एका जवळ एक एका पंगतीत बसून पुण्डलीक वरदा हारि विठ्ठल गर्जनेत जेवायचे. जेवणे आटोपल्यावर खरकटी काढायला, जागा झाडून सारवून स्वच्छ करायला, इतरांच्या बरोबरीने गाडगे बाबा सगळ्यांच्या पुढे हजर. सहस्र भोजन आटोपताच कीर्तनासाठी रंगणाची व्यवस्था ही तेच करायचे. इकडे दिवाबत्ती लागत आहे तोच चटकन बाबा कोठे तरी निघून जायचे. एवढे प्रचंड मिष्टान्नांचे भोजन व्हायचे, पण बाबांनी आजवर चुकून कधी त्यातला एक घास तोंडात घातलेला नाही. ते जवळपासच्या कोठे तरी एकाद्या झोपडीसमोर हारळी देऊन मिळेल ती कांदा चटणी मडक्यात खाऊन, बिनचूक वेळेला कीर्तनासाठी समाराधनेच्या जागेवर हजर. मात्र असल्या मिष्टान्न समाराधनेतच जर कोणी भाकर, भाजी , झुणका, आमची आणून त्यांच्या मडक्यात दिली तर पंगतीत दाटी वाटीने बसून आनंदाने खातील. मिष्ठान्न अपंग गोर गरिबांना. आपण स्वतः इतरांना भरपूर वाढायला सांगतील. त्यांचे खरकटे काढतील. पण एक घास चुकूनही कधी चाखणार नाहीत. हा निर्धार आजपर्यंत अखंड पाळलेला आहे. या समाराधनेत अनाथ अपंगांना कपडे वाटण्याचेही कार्यक्रम नेहमी होत असतात.

• अंधू पंगू कुष्ट्यांना मिष्टान्न - भोजने :

आत्यंतिक निरिच्छता हा गाडगे बाबांच्या चारित्र्याचा आत्मा. त्याच्या पुढे मोठ मोठ्या धनवंतांनी हात टेकले नि उदारधींच्या उदारतेने मान वाकवली. चिंध्या - मडकेधारी ही त्यागी विभूति कंठशोष करून जनतेला नवा माणुसकीचा धर्म शिकवते, दररोज पाच - पंचवीस मैलांची पायपिटी करीत गावेच्या गावे नि शहरेच्या शहरे पायदळी घालते कोणी काही मिष्टान्न पक्वान्न, कपडालत्ता दिला तर त्याचाही अव्हेर करून निघून जात, अडल्या नाडल्याच्या अडवणुकीत सोडवणुकीला धावते, कसे या साधु पुरुषाचे पांग फेडावे? या प्रश्नाने गावोगावचे लोक विव्हळ व्हायचे. "बाबा, तुमच्यासाठी आम्ही काय करावे सांगा?" "माझ्यासाठी? मला कशाचीच गरज नाही. काही करायचेच असेल तर तुमच्यासाठी तुम्ही करा, मी सांगतो. अन्नदाना सारखा जगात दुसरा मोठा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता.

बाबांनो,
जरा सभोवार नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे, पांगळे, लुळे, लंगडे महारोगी गावोगाव मुंग्याच्या वारुळासारखे वळवळाताहेत. उष्ट्या माष्ट्यावर कशी तरी पोटाची खाच भरताहेत. तुमच्या कमायतीत नाही काहो बाबांनो, त्यांचा काही हक्क? त्या आपल्या अभागी भावा बहिणींना सन्माने पाचारून वर्षातून एकदा तरी, एकाद्या यात्रे जत्रेच्या प्रसंगी, गोड धोडाचे पोटभर जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा निवेद. तीच त्याची खरी भक्ति नि ती खरी त्याची महापूजा." सप्ताहाच्या भंडाऱ्या प्रमाणेच अनेक वेळा केवळ अनाथ अपंगांसाठी मिष्टान्नांची भोजने आणि त्यांना वस्त्रदान, हे समारंभ महाराष्ट्रात हजारो ठिकाणी आज वर साजरे केले आहेत आणि साध्य ही होत आहेत.

• झंजावाती संचाराती फलश्रुति :

गाडगे बाबांचा संचार म्हणजे एक तुफानी झंजावाताचा सोसाटा म्हटले तरी चालेल. कोणत्याही ठिकाणी एक दिवसापेक्षा अधिक ते कधी रहायचेच नाहीत. आज मुंबईला दिसले तर उद्या व-हाडात वर्ध्याला, परवा औरंगाबादला नि तेरवा थेट गोव्याच्या सरहद्दीवरील एकाद्या गावी. त्यांची गाठभेट बिनचूक घेणे आजवर त्यांच्या निकटवर्ति अनुयायांना ही साधत नाही, तेथे इतरांचा पाड काय? या झंजावाती संचारात त्यांनी वऱ्हाड ते गोमांतकापर्यंत लोकांच्या रहाणीचे फार सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे. यात्रा जत्रांच्या तीर्थ क्षेत्रांत गोर गरिबांच्या अन्नपाणी, निवाऱ्याचे किती भयंकर हाल होतात, ते त्यांनी पाहिले होते. ही अडचण दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि जागोजाग धर्मशाळा, सदावर्ते, पाणपोया आणि मागासलेल्या जनतेच्या उमलत्या पिढीसाठी शाळा नि बोर्डिंगे स्थापन करण्याची अनन्यसामान्य कामगिरी केलेली आहे. सन १९०८ साली ऋण मोचनच्या नदीला घाट, परीट जमातीची धर्मशाळा गावकऱ्यांच्या इच्छेसाठी लक्ष्मी नारायणाचे मंदिर वगैरे गाडगे बाबांना लोकांकडून करवून घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. त्यानंतर सालो सालच्या वार्षिक मुद्गलेश्वराच्या पौषी यात्रेला बाबा गेले का एकेका नवीन कार्याचा पाय घालीत आणि भटकंतीला जात. ऋण मोचनाला आता एकचसा काय, पण सोयीस्कर जागी नदीला चार प्रचंड घाट बांधण्यात आले आहेत व पांचव्या घाटासाठी जनतेची ५ हजारांची वर्गणी तयार आहे. बाबांचे ते फुटक्या गाडग्याचे टवकळ जशी त्यांची कामधेनू, तशी आत्यंतिक निरिच्छतेने आणि कमाल निस्पृहतेने झळकणारी त्यांची वाणी जागोजाग कल्पवृक्षा प्रमाणे मोठ मोठ्या धर्मशाळा अन्नसत्रे गोरक्षण संस्था आणि शिक्षणाच्या शाळा जादू प्रमाणे निर्माण करीत चालली आहे. तोंडातून शब्द निघायची थातड, मोठ मोठे श्रीमंत स्त्री पुरुष तो झेलायला आजू बाजूला हात जोडून उभेच असतात. गाडगे बाबांनी केवळ इच्छा मात्रे करून महाराष्ट्रभर उभारलेल्या असल्या लोकोपयोगी इमारतींचे नि संस्थांचे जाळे फार विशाळ आहे. त्यांची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एका १०० पानी सचित्र ग्रंथातच छापलेली मिळते. वानगी दाखल काही ठळक संस्थांची नावे मात्र येथे देणे शक्य आहे.

(1) ऋणमोचन घाट. मंदिर. सन १९०८. खर्च रु. २५ हजार. आणखी ३ घाटांचा हिशेब निराळाच.

(2) मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, धर्मशाळा, सन १९०८, खर्च १ लाख रुपये

(3) पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, सन १९२०, खर्च १ लाख

(4) पंढरपूर मराठाशाळा, सन १९२०, खर्च २लाख

(5) पंढरपूर परीट धर्मशाळा, सन १९२५, खर्च २५ हजार

(6) नाशिक धर्मशाळा, सन १९३०, खर्च ३ लाख
(7) आळंदी धर्मशाळा, सन १९३०, खर्च १ लाख
(8) आळंदी परीट धर्मशाळा, सन १९३०, खर्च ० हजार

(9) देहू धर्मशाळा, सन १९३०, खर्च २५ हजार

(10) त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, सन १९४८, खर्च २५ हजार

(11) पुणे आकुल धर्मशाळा, सन १९४०, खर्च दीड लाख

(12) त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, सन १९४०, खर्च १० हजार

याशिवाय आणखी पाच पन्नास संस्था आहेत, त्यांची नावनिशीवार यादी कोठवर द्यावी? पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालण्यासाठी नुकतीच डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.

• विचार करण्यासारखा मुद्दा :

या संस्थांच्या टोलेजंग इमारती बाबांनी मनोमन आखाव्या, स्वयंस्फूर्त धनिकांनी ‘घ्या घ्या’ म्हणून पैशांच्या पाशी बाबां पुढे ओतून त्या प्रत्यक्षात आणाव्या आणि पाया भरणीच्या क्षणालाच त्या सर्व इमारतींचे ट्रस्ट - डीड करून त्या जबाबदार विश्वस्तांच्या हवाली कारभारासाठी द्याव्या. प्रत्येक ठिकाणी त्यात एक मुख्य अट ठळकपणे प्रथमच असायची. ती ही `या संस्थेत खुद्द गाडगे बाबा, त्यांचे वारस वंशीय नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावर ही कसला काही हक्क नाही. कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे. सदावर्तात ही त्यांना अन्न घेण्याचा अथवा येथे वसति करण्याचा हक्क नाही.’ या कठोर निरिच्छतेला नि कमाल निस्पृहतेला हिंदुस्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासतही जोड सापडणार नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बाबांनी कोठे ही एकादे देऊळ बांधलेले नाही किंवा स्वतःसाठी मठ उभारलेला नाही. तीर्थाच्या ठिकाणी देवांची मोठमोठी ख्यातनाम देवळे आहेत. पण तेथल्या त्या दगडी देवांचे दर्शन ही बाबा कधी घेत नाहीत, आज वर घेतलेले नाही. देव देवळात असतो, ही कल्पनाच त्यांनी कधी मानलेली नाही आणि इतरांनी ही ती मानू नये, असा त्यांचा वाजवी अट्टाहास असतो. मात्र कोठे एकादे देऊळ असल्यास त्याचा अनादर ते करायचे नाहीत. नाशिकच्या ओसाड टेकडी वर धर्मशाळा बांधताना मधेच एक मारुतीचे लहानसे देऊळ आढळले. बाबांनी ते नीट मोठे बांधून घेतले. एका मजल्यावर मारुतीची बैठक आणि देवळाचा घुमट वरच्या मजल्यावर, अशी ती धर्मशाळेच्या इमारतीच्या पोटातच केलेली युक्तिबाज बांधणी प्रेक्षकाला अचंब्यात पाडते.

• निर्वासित मारुतीचा उद्धार :

याच टेकडीवर ९ फूट लांब, ३ फूट रुंद नि दीड फूट जाडीची एक दुसरी मारुतीची मूर्ती टेकडीत गाडलेली बाहेर निघाली. बाबांनी बरेच दिवस ती एका बाजूला काढून ठेवली. "असू द्या मारुतीराय सध्या इथेच. लावीन त्यांची सोय कुठेतरी." काही वर्षांनी बाबा वऱ्हाडात गेले असताना मूर्तिजापूर धर्मशाळेत येणाऱ्या लोकांनी सांगितले, "बाबा मूर्तिजापूर शहर मोठे. तेथे पुष्कळ देवळे आहेत. पण या धर्मशाळेत देव नाही, देऊळ नाही. म्हणून तेथे लग्न लावलेल्या नवरा नवरीला दर्शनासाठी लांब दूरच्या देवळात जावे लागते." देव देवळांबद्दल बाबांचा अभिप्राय काहीही असला तरी या किंवा दुस-या कोणत्याही बाबतीत अडाणी जनतेचा बुद्धिभेद ते करीत नाहीत. ते मुलांच्या बोलीने बोलतात नि चालीने चालतात. त्यांनी नाशिकला तार दिली की "बाजूला काढून ठेवलेला तो मारुती ताबडतोब पहिल्या गाडीने घेऊन यावे." ती प्रचंड जाडजूड मारुतीची मूर्ती नि आगगाडीने न्यायची तरी कशी? कारभारी नि शिष्ट विचारात पडले. अखेर सहा बैलांच्या खटाऱ्यातून मारुतीरायांना स्टेशनवर आणले. गाडगे बाबांचे नाव ऐकताच रेलवेचे सारे अधिकारी नि हमाल धावले. त्यांनी मूर्ती मेलगाडीत चढवली. स्टेशनला तार दिली का गाडगे बाबांचा मारुती मेलने येत आहे, उतरून घ्या. मूर्ती उतरून घ्यायला शेकडो लोक आधीच तयार उभे होते. बाबांनी धर्मशाळे नजीक योग्य जागेवर मारुतीची स्थापना केली आणि गावकऱ्यांना सांगितले, "देव पाहिजे होता ना? हा घ्या देव. आता मात्र त्याच्यासारखे शूर आणि पराक्रमी बनले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी." नाशिकच्या उकीरड्यातल्या मारुतीचा अखेर वऱ्हाडात निर्वासितोद्धार झाला.

• कशाला हा एवढा भुईला भार? ;

देवळे नि त्यातले देव याविषयी बाबांच्या मताची मूर्खानंदजी एक मजेदार आठवण सांगतात. गाव नेमके आठवत नाही. पण त्या गावी नदीकाठी खूप देवळे होती. बहुतेक सारी शिवालये. त्या गावी कोणीतरी केलेल्या सप्ताहाचे शेवटी बाबांचे कीर्तन झाले. दुसरे दिवशी सकाळी बाबा म्हणाले, "रात्री कीर्तनाला जेवढे लोक होते. तितकीच देवळे आहेत इथं." आम्ही या अतिशयोक्तीबद्दल हासलो. "हासता कशाला बाप्पा? तुम्हीच पहा ना. सगळी नदीची दरड या देवळांनीच भरली आहे. पण व्यवस्था पाहिलीत का त्यांची? कोण्या देवळात नंदी नाही तर कोण्या ठिकाणी देवाचाच पत्ता नाही. मग तो लेक काय फिरायला गेला म्हणावं? कशासाठी बांधली असतील एवढी देवळं?" "धर्मश्रद्धा, बाबा." मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. "संस्किरत (संस्कृत) भाषेत नको काही सांगू. असं सांगा का भोळा भाव. पण या देवळांची ही अशी परवड होईल असं स्वप्न त्यांना पडलं असतं तर? तो पहा, तो पहा, एक कुत्रा बेधडक देवावर लघवी करून चालला." कुत्र्याला मारण्यासाठी मी दगड उचलला. मला अडवून बाबा म्हणाले - "कोणाला मारता? कुत्र्याला? का बाप्पा? तुम्हाला रागच आला असेल, तर तो ही देवळं बांधणारांचा आला पाहिजे. कशाला इतकी देवळं बांधली? एकच बांधायचं होतं नि त्यातल्या देवाला म्हणायचं होतं रहा बाप्पा इथं येऊन. भुईला भार करून ठेवला उगीच.

तीर्थी धोंडा पाणी ।
देव रोकडा सज्जनीं ।।

असंच म्हणतात ना आपलं तुकोबाराय?’’

• पहाल तिथे शिस्त कदर नि दरारा :

आजवर जवळ जवळ १४ लाख रुपयांच्या इमारती नि संस्था बाबांनी जागोजाग निर्माण केल्या, पण स्वतः किंवा त्यांची वृद्ध पत्नी सौ. कुंताबाई चुकून कधी त्या इमारतींच्या छायेत विसावा घ्यायला क्षणभर बसलेल्या आढळणार नाहीत. त्यांचे वसतिस्थान दूर कोठे तरी ओसाड जागेतल्या चंद्रमौळी झोपडीत अथवा चक्क एकाद्या झाडाखाली. अन्नसत्रात रोज किती तरी अनाथ, अपंग भाकरी-आमटी खातात. पण तेथे ही त्यांना कदरबाज मज्जाव. खुद्द बाबा जरी जेवणाच्या वेळी हजर असले तरी सगळ्यांच्या बरोबरीने खरकटी काढायचे आणि जागा स्वच्छ करण्याचे काम करतील. पण तेथला भाकरीचा चतकोर कधी तोंडात घालायचे नाहीत. प्रत्येक भेटीला धर्मशाळेची पहाणी, चौकशी अगत्य करतील. कोठे काही घाण दिसली का घेतलाच हातात खराटा आणि झाली सुरू साफसफायी. एकूणेक संस्थेवर बाबांची टेहळणी कडक कदरबाज. वेडेवाकडे गदळ गबाळे गचाळ घाणेरडे तिळमात्र खपायचे नाही त्यांना तेथल्या कारभारात. लोकांच्या सुखसोयीकडे आणि व्यवहारात, जिकडे नजर टाकाल तिकडे, लष्करी शिस्त आणि कदर नांदताना दिसते.

• बांधकामातली सौदर्य - दृष्टी :

गाडगे बाबांनी उभारलेल्या कोणत्याही धर्मशाळेचे घाटाचे बांधकाम पहा, तेथे सर्वत्र त्यांची उजत सौंदर्य दृष्टी ठळकपणे दिसून येईल. इमारतीसाठी जागा पसंत करण्यापासून, पाया खोदणे भरणे आणि बांधकाम चढवीत जाण्या पर्यंत सगळे प्लॅनिंग एस्टिमेटिंग बाबांच्या खास देख रेखीखाली पार पडायचे. ते प्लॅनिंग सुद्धा कागदावर नसून, बाबांच्या डोक्यात! गवंडी, पाथरवट, लोहार, सुतार यांना हरएक लहान मोठी बाब त्यांनी तोंडी समजावून सांगायची आणि कल्पनेप्रमाणे करवून घ्यायची, हा खाक्या. इंजिनियर कोठे ही लागायचा नाही. वाचकांनी मुद्दाम एकदा एकादी इमारत पहाण्याची तसदी घ्यावी. सगळीकडे अद्ययावत सुखसोयीचा माल वापरलेला. दारे, खिडक्या, गज, पायऱ्याा, कठडे खोल्या, गॅलऱ्या, तुळशी वृंदावने, बागबगीचे, विसाव्याचे हवेशीर कट्टे. काय वाटेल ते पहा, सर्व काही अपटूडेट साहित्याने बनलेले आढळेल. नाशिकच्या धर्मशाळेची पूर्वीची ती ओसाड भयाण नि मुनसिपालटीच्या संडासी गाड्यांनी आणि मेलेली ढोरे टाकल्यामुळे गिधाडांनी गजबजलेली टेकडी पाहिली असेल, तेथे आज गाडगे बाबांनी आपल्या पाच मजली झकास धर्मशाळेने निर्माण केलेले नंदनवन नवलाने नि आश्चर्याने थक्क करीत आहे. प्रत्येक मजल्यावर चौक नि झाडांचे कट्टे पाहून प्रेक्षक बुचकळ्यातच पडतो. तेथली स्वच्छता नि व्यवस्था मुंबईसारख्या शहरातील मोठ मोठ्या राजेलोकांच्या निवासात ही आढळणार नाही. एका निरक्षर चिंध्याधारी माणसाने जागोजाग उभारलेली ही लोकोपयोगी निवासाची रम्य स्थाने आणि त्यांच्यासाठी 'घ्या बाबा घ्या" म्हणून धनिकांनी ओतलेला लाखो रुपयांचा धनसंचय, ही घटना या विसाव्या शतकाला महाराष्ट्रातला एक मोठा लोकोत्तर चमत्कारच होय.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ४ -
शून्यातून निर्माण केलेला पसारा

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• बाबा मजुरात मजूर :

लाखो किंमतीच्या धर्मशाळा उभारायच्या म्हणजे मजुरादी कष्टकरी मंडळीच्या पलटणीच तेथे रोज खपायच्या. गाडगे बाबा तर त्या विश्वाचे विश्वकर्मे. म्हणून काय ते स्वतः, त्यांचे पाच पन्नास शागीर्द, त्यांचे कुटुंब, कन्या जावई, जे कोणी त्या वेळी जवळ असतील ते, बाजूला ऐटीत उभे राहून चाललेले काम पहात बसतील होय? छे छे! मजुरांच्या बरोबरीने त्यांना ही खराटा, खोरे, टोपल्या, फावडी हातात घेऊन बाकीच्या मजुरांबरोबर काम करावे लागेच लागे. स्वतः खुद्द बाबांनीच हाता कुदळ, टोपले घेतल्यावर त्यांची काय शहामत लागलीय स्वस्थ बसण्याची? सरळ रेषेत खोदकाम करीत जाणारी बाबांची कुदळ पाहून मजुरांनाही शिस्तीचे आणि कुशलतेचे शिक्षण मिटल्या तोंडी मिळायचे. कोणाचे कुठे जरा चुकले, सरळ रेषेत बाक दिसला का "अहो बाप्पा जरा नजर टाका, लाईन बिघडली," अशी जोरदार आरोळी आलीच. कोणतेही काम असो, ते कुशलतेने चोख कसे करावे याचे धडे पाथरवट गवंडी, सुतार, लोहारांनी बाबांकडून पदोपदी घेतल्यामुळे, "बाबांच्या पुढे आपले काही चालणार नाही हो" अशा खात्रीने प्रत्येक कामगार आपापली कामे चोख करी. या मुद्या विषयी बाबांचे एक वेळचे निकटवर्ती अनुयायी श्री. मूर्खानंद यांची एक आठवण वाचकांना अधिक खुलासा करील - "निस्पृहपणाच्या बाबतीत बाबांना उपमा तुकाराम बुवांची! स्वतःच्या मुलीची आणि पत्नीचीही भीड त्यांच्याजवळ नाही. आम्ही पंढरपुर आणि नासिकच्या धर्मशाळांचे बांधणीचे काम चालले, तेव्हा त्यात हजर असू. कष्टकरी मंडळीचा एक ताफाच बाबांच्या संग्रही असे. कुठे ही कसले काम सुरू झाले, की ही सगळी मंडळी तिथे जाऊन हजर व्हायची. मूर्तिजापुरा जवळील मला वाटते शिरसोली गावचे देशमुख श्री. अवचितराव, हे आम्हा सर्वां वरचे मुकादम. मोतीराम बुवा मांग, हे या कष्टकरी पलटणीतले एक शिलेदार. बाकी नावे स्मरणातून गेली आहेत. पण बाबांच्या खात्यात असलेल्या प्रत्येकासच टिकाव, खोरे, पाटी या शास्त्राची दीक्षा मिळालेली असायची. खराटा हे या खात्याचे अत्यंत आवडते शस्त्र. "या कष्टकऱ्यांतच बाबांची कन्या सौ. अलोकाबाई व जावई श्री. फकीराजी यांचा समावेश झालेला. सगळ्यांशी सारखी वागणूक. एकाला उणे आणि दुसऱ्याला दुणे हा भेदभाव बाबांजवळ नाही. काम आटोपल्यावर आम्ही सगळी माणसं एका पंक्तीत जेवायला बसायची. मुकादमाच्या मांडीला मांडी भिडवून साधा झाडूवाला. यामुळे कोणलाही काम जाचायचे नाही. "बाबांच्या पत्नी सौ. कुंताबाई यांना आम्ही सगळे आई म्हणत असू. बाई आपली साधीसुधी. बाबांची निस्पृहता आणि निर्लोभी महत्ता बाईंत उतरायलाच हवी, असा आग्रह धरण्यात ही काही अर्थ नाही. आईंना वाटायचे एवढे हे एका लहानशा संस्थाना सारखे खाते चाललेले, केवळ माझ्या पतीचे, अर्थात माझा ही यावर तेवढाच अधिकार. पण बाबा कसले! बाबांची निर्मोही वृत्ती पाहून मला कधी कधी हिमालयाच्या शिखरांची आठवण होई. गौरी शंकर हे ठिकाण आम्हाला वंद्य हे मान्य. पण त्यावर कुणालाच रिघाव नाही! सगळ्यांनी दुरूनच त्याविषयी आश्चर्य मानून घ्यावे. त्याला नमस्कार करावा. तसे बाबांचे. त्यांनी कोणाही माणसाला त्यांच्या ‘अस्मिते’ जवळ फिरकू दिले नाही. ते आमच्यात असून आम्हा वेगळे. स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत ही त्यांनी या नियमाचा भंग होऊ दिला नाही.

• माया - मोहाचा खरचटून निचरा :

निस्संग बेपरवाईच्या बाबतीत ही बाबा आप पर भेद मानीत नाहीत. याची काही उदाहरणे देतो. वेळी इतरांच्या दुःखाने कळवळून धावतील, पण स्वकीयांबद्दल तोहि कळवळा त्याच्यापाशी नाही.
(1) साधकावस्थेत असताना, मातोश्री सखुबाई नि पत्नी सौ. कुंताबाई पर्णकुटी चंद्रमौळी झोपडीत राहू लागल्या नंतर, कु. कलावती (बाबांची दुसरी कन्या) हिचे लग्न जमले. बाबांना हे कळावयचे तर त्यांचा ब्रह्मांडात कोठे ही नाही! घरात सगळाच खडखडाट आणि लग्नाची तीथ आली परवावर. व्याही जात गोतवाल्यांना निदान झुणका भाकरीचे जेवण तरी घालू, एवढ्यासाठी सखुबाईने खूप आटापिटी केली. पण काही जमले नाही. वऱ्हाड जमले. कसे बसे लग्न लागले. पहातात तो वधूगृही थंड पाण्याचा फराळ! तडफडत निघाले सगळे परत. वाटेत डेबूजीची स्वारी भेटली. कोण मंडळी, कुठं निघालात, वगैरे चौकशी केली. "अहो, आम्ही इकडे लग्नाला आलो होतो. पण लगीन घरी ना ज्वारीचा दाणा ना बैलांना कडबा. सगळा थंड मामला. चाललो परत भुकेल्या पोटी." डेबूजीने त्यांना परतवले. तसाच तो एका आपला भक्त असलेल्या व्यापाऱ्याकडे गेला. झुणका भाकरीचे सामान आणून जेवण घातले सगळ्यांना. वऱ्हाड्यांना आता आहेर करणेच प्राप्त. "कपडा लत्ता देऊ नका. द्यायचेच असेल काही तर रोख रक्कम आहेरात टाका." असे डेबूजीने सुचवले. सखुबाई, कुंताबाईच्या तोंडाला पाणी सुटले. त्या रोख आहेराच्या रकमेने बाबांनी कडबा विकत घेतला आणि गावातल्या सगळ्या ढोरांना पोटभर चारला. झाला लग्नाचा थाट! आहेराच्या रोख रकमांच्या बळावर जातील थोडे दिवस सुखाचे, ही आईंची आशा हवेतल्या हवेत विरली!

(2) कीर्ती नि लोक मान्यतेच्या सिंहासनावर बाबा आरूढ झाल्यावर मातोश्री सखुबाई एका खेड्यात आजारी पडली. शेवटचेच दुखणे होते ते! बाबांना गाठून ही बातमी कळवायची शिष्यांनी खूप पायपिटी केली. कोणत्याही गावी धड एक दिवस रहातील तर भेट आणि तीही फक्त अगदी कीर्तनाच्या ऐन क्षणाला. त्या वेळी कोणी इतर बाबतीत त्यांच्याशी बोलूच शकणार नाही. अखेर, एका मुकामावर बातमी दिली आणि आईने भेटीचा धोसरा घेतला आहे, असे कळवले. "आई आजारी, तर एकाद्य चांगल्या डाक्टराला बोलवा. मी येऊन मला काय त्यात समजणार?" असा जबाब देऊन स्वारी लागली गोविंद राधे करीत कीर्तन रंगी नाचा - डुलायला. आपल्या मृत्यूची बातमी सुद्धा मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना कळली. कलावती मुलगी लग्नानंतर ५ - ६ वर्षांनी वारली. ती हकिकत २ वर्षांनी समजली.

(3) आपल्या गोविंद नातवाचे लग्न आपल्या डोळ्यांसमोर व्हावे असे सखुबाईने ठरवून मुंबई वरळी येथे लग्नाचा बेत केला. बाबांचे शेकडो भक्त हवे ते साहित्य घेऊन उभे राहिले. थाटाचा मंडप घातला. जेवणावळीचे वरातीचे मोठ मोठे बेत ठरले. मोटारी सजू लागल्या. बाबांचा फेरा आला. सगळे श्रीमंती बातबेत रद्द ठरवले. वधू वराला थंड पाण्याची अंघोळ घातली. लग्न लागल्यावर झुणका भाकर मडक्यातून वाढली. वरातीसाठी बैलांचा खटारा मुक्रर झाला. आणलेले सगळे आहेर परत घ्यायला लावले. खलास! झाला लग्नाचा थाट! या प्रसंगाने बाबांच्या निर्मोही आणि निरिच्छ वृत्तीचा पडताळा मुंबईकर श्रीमंत भक्तांना खासखूस पटला.

(4) जन्मापासूनच गोविंदाचे फार हाल झालेले. बाबा तर संसाराकडे ढुंकून ही पाहायचे नाहीत. गोविंदा ९ - १० वर्षांचा झाला तेव्हा काही भक्तांनी शिक्षणासाठी त्याला मुंबई, पुणे किंवा पंढरपूर येथे ठेवण्याची योजना केली. जेवणा रहाण्याची उत्तम सोय करणारे ही पुढे आले. पण ते काही नाही. ‘त्याने कुठे ही राहायचे असेल तर मधुकरी मागून विद्या शिकावी’ हा बाबांचा हट्ट. श्री शिवाजी मराठा फ्री बोर्डिंगात पुण्याला मराठी ४ थ्या यत्तेत शिकत असताना गोविंदाला कुत्रे चावले. वेळेवर उपाय न झाल्यामुळे, ता. ५ मे सन १९२३ रोजी तो मरण पावला. त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खारे पाटण गावी बाबांचे कीर्तन होते. तेथे तार पाठवली. बाबा कीर्तनासाठी येऊन दाखल झाले. तार हातात घेऊन एक गृहस्थ जवळ आले तोच बाबा त्याला म्हणाले, "बाप्पा, फार भूक लागली आहे. भाकर बिकर आणली का नाही?’’ पण त्याच्या तोंडून शब्दच फुटे ना. तो ढसढसा रडायलाच लागला. "झाले तरी काय? सांग बाप्पा सांग." असे बाबांनी विचारताच, त्याने गोविंदाच्या मृत्यूची बातमी सांगितली. निर्विकार मुद्रेने बाबा उद्गारले - ‘‘मेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी?’’ झाले. एकदम कीर्तनाला उभे राहिले आणि हरिनाम कल्होळात स्वतः रंगले आणि हजारो श्रोत्यांना ही रंगवले.

• बाबांचे परात्पर गुरू संत तुकाराम :

देश काल वर्तमान अभ्यासून गाडगे बाबांनी मानव धर्माची जी एक नवीनच घडण घडवली, त्यातल्या अनेक तत्त्वांचा पुरस्कार ते श्रीसंत तुकाराम महाराजांच्या अभंगानीच मुख्यत्वे करीत असतात. मधून मधून कबीर, एकनाथ, चोखामेळा, जनाबाई, नामदेव यांच्या दोहरे - कवनांबरोबरच श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा ही ते कीर्तनात समयोचित पुरावा देतात. श्री गणेशाचा चुकून ही गंध न लागलेला हा गृहस्थ तुकारामादि संत वचनांची भराभर मांडणी करण्या इतक्या पंडिती पटुत्वाचा ओम नमः सिद्धम् कसा करू शकतो,. हे खरोखरच नवल वाटते. या नाक्षराने संतांच्या गाथा वाचल्या तरी कशा असतील? आणि वाचल्या नसतील तर हे एवढे प्रचंड पाठांतर झाले तरी असेल कसे? स्वतःच्या चरित्रा विषयी कसल्या ही तपशिलाची बाबा सहसा दाद लागू देत नाहीत. कोणी काही विचारले तर "मला काय माहीत?" किंवा "नाही मला आता आठवत." या उत्तरांनी विचारणाराला धुडकावून लावतात. म्हणूनच या सबंध चरित्रात तारीख वार महिना सनाचा पत्ता कोठे ही आढळणार नाही. पण या पाठांतरा विषयी स्वारीची लागली एकदा लहर आणि सांगितली खालची गोष्ट. (बारा वर्षांच्या साधकावस्थेनंतर) "माझ्या भटकंतीत मला एक परीट बुवा भेटला. नाव गाव आता आठवत नाही. तो चांगला शिकला सवरलेला होता. मोठा कर्मकांडी. स्नान जप - तप, पोथी, पुराणे वाचणे यांचे मोठे बण्ड. सारखा तो त्यातच गुरफटलेला असायचा. टिळे, माळा, भस्म, रुद्राक्ष अंगावर भरपूर. तुकोबारायांचे अभंग रोज तो मला वाचून समजावून सांगायचा. ‘समजले नाही’ अशा मुद्रेने मी मुकाट बसलो, का तो अभंग पुन्हा पुन्हा जोरजोराने सुरावर वाचायचा. मला तो पाठ व्हायचा. लगेच त्या रात्रीच्या कीर्तनात मी तो सांगायचा, तसे म्हटले तर अभंग दोहरे मला फार थोडेच यायचे. पण कोण जाणे कसे व्हायचे ते. हव्या त्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर बोलणे (प्रवचन) भरपूर करता यायचे. लोकांना तेच फार आवडायचे आणि मग ते ओरडायचे, "बुवाजी, अभंग दोहरे नको, काही तरी सांगा."

• अजागळानी ज्योतिष्याच्या नादी लागावे :

याच परीट बुवा विषयी बाबा आणखी सांगतात - ‘‘पण या परीट बुवाला एक मोठी वाईट खोड होती. उठल्या सुटल्या तो पंचांग पहायचा. कुठे जायचे, काही करायचे, कुणाला भेटायचे का काढलेच याने आपले पंचांग बाहेर नि बसला ग्रहमानावर बोटे चाळवीत. ग्रहमान अनुकूल नाही, असे पंचांगात दिसले का हा जागचा उठायचा नाही. मी म्हणायचा, ‘अहो बाप्पा, तुकोबारायांनी या पंचांगाची नि मुहूर्ताची टर उडवल्याचे अभंग तुम्ही मला तोंडपाठ म्हणून दाखवता, घोळून घोळून अर्थ सांगता, मग तुम्हीच कसे या वेडगळ फंदात पडता?’ पटायचे नाही ते त्याला. काळीज खुंटीवर अडकवून फक्त डोक्यांनी कामे करणारी पंडित मंडळी असतात ना, त्यातलाच ते एक होता. खूप खूप वाचले पण काळजात त्याचा अणू रेणू गवसायचा नाही. सारे वरच्या वर." "मी एकदा एका गावी एका इसमाला भेटायला निघालो. झटकन परीट बुवाने पंचांग काढले, शनि, मंगळ, बुध, गुरु अशी बोटे चाळवली आणि दिला निकाल. काय दिला? माझी नि त्या गृहस्थाची भेट होणार नाही. झालीच तर तुमचे काम तो करणार नाही. फार काय, तुमच्याकडे ढुंकून ही बघणार नाही. ‘नाही भेटला तर नाही भेटला. नाही बोलला तर नाही बोलला. मला काय त्याचे? पण मी जाणार.’ बुवाला बरोबरच घेऊन मी निघालो. गावाच्या सीमेवर गावकरी पोरांनी मला पहाताच, गाडगे बुवा आले, गाडगे बुवा आले, असा ओरडा करीत सैरावैरा ती गावात गेली. थोड्याच वेळात मी भेटणार होतो तोच इसम आम्हाला हात जोडून सामोरा आला. मी ही हात जोडून त्याला नमस्कार केला नि गप्पच बसलो. तो गृहस्थ म्हणाला - "बाबा, तुमच्या धर्मशाळेसाठी बाजूला काढून ठेवलेले हे ५०० रुपये आणले आहेत ते आता घ्या." "राहू द्या हो शेटजी, आजच कशाला? पाहू लागतील तेव्हा." असे मी म्हणताच तो अगदी गयावया करून म्हणाला, "छे छे बाबा, वाटले तर वर आणखी ५०० घालून एक हजार देतो. पण या खेपेला घ्याच." हो ना करता, ‘द्या या आमच्या बुवांच्या जवळ’ असे म्हटल्यावर परीट बुवाच्या हातातच त्याने १००१ रुपयांची पुरचुंडी दिली. "माझे संभाषण चालले असताना ही परीट बुवा पंचांग काढून एक सारखा बोटे चाळवीत होताच. शनि, मंगळ, शुक्र बडबडत होता. पैसे देऊन शेटजी गेल्यावर तो मला म्हणाला - "असे कसे हो झाले? ग्रहान चक्क प्रतिकूल. वाटेल त्या ज्योतिषाला विचारा. खोटे ठरले तर हात कलम करून देईन!’ मी म्हटले - ‘"बाबाजी,

नाम देवाजीचे घ्यावे ।
पुढे पाऊल टाकावे ।
मग तो लागू नेदी शिण ।
आड घाली सुदर्शन ।

हेच तुकोबाराय सांगतात ना?

अहो,
दूर अंतराळातल्या थांगपत्ता नसलेल्या शनि, मंगळ, बुधाचा नि आमचा संबंधच काय मुळी? ज्यांच्याशी संबंध, त्यांच्याशी आपण नीट इमानाने व्यवहारी चातुर्याने वागलो का मनात आणू ते आपोआप घडून येते. घेतलंत ना प्रत्यंतर हे? मी लक्ष्मीच्या मागे थोडाच धावतो? तिला मी जुमानीतच नाही. म्हणून तीच माझ्या मागे अशी धावते. समजा, शेटजीने नसते दिले पैसे तर माझे काय अडून बसते? बरं आता दिलेच तर ते माझ्यासाठी थोडेच! जिकडच्या तिकडे होतील रवाना."

• तत्त्व जिज्ञासु नि तत्त्व विवेचक बाबा :

‘चहूकडे ऊन्ह रणरणत होतं. पाखरे सुद्धा उष्म्याच्या दाबाने झाडांच्या आसऱ्याला विसावून बसली आहेत. मी आणि बाबा कुठे तरी एकाद्या बाभळीच्या साली खाली लेटलो आहोत. एकदम बाबा उठले नि मला म्हणाले, ‘‘गोपाळ, तुला लिहिता वाचता येते. इतकी पोथ्या पुस्तकं वाचतोस तू. एक सांग. देवानं हा इतका पसारा कशाला केला?" "गडबडून जाऊन काही तरी उत्तर दिलेच पाहिजे म्हणून म्हणालो, "बाबा, हे चैतन्य खेळतंय सगळीकडे." "चैतन्य? म्हंजे काय बाप्पा?" "बाबा, हा सगळा देवाचा खेळ आहे." "हा कोण्या जातीचा खेळाडू आहे बाप्पा? सांग ना? एक माणूस रडत आहे तर दुसरा हासत आहे. एक मरत आहे तर दुसरा जन्मत आहे. एक मोटारीत बसून रस्त्या वरचा फुफाटा उडवीत पळतो आहे, तर दुसऱ्याच्या पायात घालायला पायतण ही मिळत नाही. तू पाह्यलस शिकाऱ्याच्या हातून पाखरू मरताना?" आणि मग बाबा एकदम उभे राहिले आणि साभिनय बोलू लागले. जणू काय एकादा मास्तरच मुलांना धडा समजावतो आहे. "एक पाखराचं पिल्लू बसलं होतं झाडावर. तिकडून आली त्याची माय. तिच्या चोचीत लेकरासाठी घास. मायचा वास लागला. लेकरू धावलं बाहेर. उडता येत नाही. लहा लहा करीत मायेच्या पंखांत शिरलं. तिनं त्याला मोठ्या मायेनं आपल्या पंखा खाली घेतलं. पिलानं वासली चोच. मायेनं त्याच्या तोंडात घातला चाऱ्याचा घास. लेकरू हरिखलं. इकडं तिकडं नाचू लागलं. आता बघ. खाली उभा होता एक शिकारी. त्यानं धरला बंदुकीचा नेम ठोss... पटदिशी माय नि लेकरू पडली खाली. संपला खेळ. आता तो शिकारी नि ही पाखरांची जोडी. हा सगळा तुझ्या देवाचा खेळ म्हणावा काय?" यावर काय उत्तर देणार मी?

दुसरा प्रसंग. वेळ रात्रीची. अनंत आकाशाच्या छताखाली एकाद्या शेकोटी शेजारी बाबा विचार मग्न बसले आहेत. एकदम वळून त्यांनी विचारले - "गोपाळ, हे सगळं कसं केलं असेल देवानं? कशाचं केलं असंल? हा चंद्र, तो सूर्य, या चांदण्या, हे आकाश, पाणी, डोंगर कसं केलं असेल? हे सगळं घडवताना देव कुठं बसला असेल? हे सगळं केव्हा केलं असेल? किती दिवस झालं म्हणावं?" "बाबा, चार हजार युगं झाली." मी उत्तर देण्याचा आव आणला. "मोजायला तू बसला होतास काय?" "नाही." मी लाजून म्हटले, "पण..." "पण कशाचा? कोणाला काहीच कळलं नाही. कोणी तरी काही तरी जुळवून सांगतात आणि लोक माना डोलवतात. हे ज्या वेळी कोणाला कळलं, तो माणूस जिंकला." ‘नासदासीत्’ आणि ‘यस्यामतं’ या वैदिक वचनात तरी आणखी काय सांगितलं आहे? - मूर्खानन्द

• अध्यात्मा पेक्षा व्यवहाराची कदर :

मोठी कीर्तनात अनेक संत वचनांचा बाबा नेहमी जो साठा वापरतात, तो साधा सुधा उपदेशपर किंवा वैराग्यपर असेल तेवढाच. बाकीचा अद्वैतवादी, ब्राह्मी स्थितिपर किंवा आध्यात्मिक भाग त्यांनी बाजूलाच ठेवला. साक्षात्कार, समाधि, स्वप्नात देवाचे दर्शन, शकुना पशकुन या भानगडी त्यांच्या त्या लोकोत्तर गाडग्यात टिकावच धरू शकत नाहीत. आधी त्यांनी जनीच जनार्दन उघड्या डोळ्यांनी पाहिला, त्यांच्या सेवेचे एक अभिनव तंत्र स्वतःच काढले, त्याचा यशवंत प्रयोग ते गेली ४७ वर्षे सारखा करीत आहेत, शिकू इच्छितील त्यांना सांगत आहेत. लोकांनाही ‘जनी तूच जनार्दन, तुझे आहे तुझ्यापाशी, परि तू जागा चुकलासी’ हे कंठरवाने सांगत आहेत. अडाण्यांचे अज्ञान घालवून त्यांना कर्तबगार प्रपंचाचा, उद्योगाचा आणि उत्तम व्यवहारे धन वेचावे कसे नि ते उदास विचारे खर्च करावे कसे याचा अखंड उपदेश करीत आहेत. बाबांच्या असल्या उपदेशाने मूळचे हीनदीन दरिद्री शिस्तीच्या उद्योगाने कर्तबगार नि श्रीमंत बनल्याची अनेक उदाहरणे आहेत.

• निस्संग बैपर्वा वृत्ती :

एका फटिंग नि अखंड भटक्या अशा चिंध्या - मडके - काठीधारी माणसाने पश्चिम भारतात अनेक मोठ मोठ्या भव्य धर्मशाळा, सदावर्ते, बोर्डिंगे, गोरक्षण संस्था नि पाणपोया उभारल्या कशा आणि एवढा मोठा सार्वजनिक प्रपंच करून स्वतः हा आधुनिक कर्मयोगी सर्वत्र आहे नि कुठेच नाही, अशा वृत्तीने राहतो कसा. याचे आश्चर्य पंडित मदनमोहन मालवीय, महात्मा गांधीजी, शंकराचार्य कूर्तकोटी प्रभृति अनेक थोरथोर विभूतींना वाटू लागले. काशी प्रयागच्या फिरती वर बाबा गेले असता, मालवीयजींनी मुद्दाम पाळत ठेवून, त्यांना आपल्या पाठशाळेत भेटीला घेऊन गेले. ‘मुद्दाम पाळत ठेवून’ म्हणण्याचे कारण, हे मालवीयजी कोण नि महात्मा गांधी कोण, याची बाबांना कधीच पर्वा वाटलेली नाही. असतील, आहेत थोर थोर महात्मे या भारतात, करताहेत ते आले काम आपापल्या परीने. मला त्यांच्याशी काय काम? ही त्यांची निस्संग बेपर्वा वृत्ती. ते आले आपल्याच कीर्तन प्रचार संचारात निमग्न. केलेल्या कर्तृत्वाचाच लवमात्र अभिमान नाही, तेथे स्वतःला कसले काही महत्त्व किंवा मोठेपणा चिकटवून घेणारच कसे? मोठ मोठे अधिकारी पुढारी भेटीला येतात, तेव्हा वर्दी गेली म्हणजे बाबा उद्गारतात - ‘माझे काय आहे काम त्यांच्याशी?’ बरे, कोणी भेटीचे निमंत्रण दिले तरी हाच प्रकार. ‘माझं काय काम आहे त्यांच्याशी?’ भेटीच्या वेळी मान वाकवून दो हातांनी नमस्कार करतील नि गप्प बसतील ऐकत तो काय बोलतो ते. नाहीतर, ‘भेट झाली ना? जा साहेब आता.’ असे स्पष्ट सांगायला ही कमी करीत नाहीत. श्रीमान बाळासाहेब खेरांनी एकदा महात्मा गांधींना गाडगे बाबां विषयी माहिती दिली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या अलौकिक पुरुषाला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भेटीला या, अशी विनंती किंवा भेटीला जा अशी सूचना बाबांना करण्याची कोणाची प्राज्ञा? तसे ते कोणाच्या भेटीला आपणहून जातच नाहीत. पण वर्ध्याच्या आजू बाजूला बाबांचा संसार चालू असल्यास त्यांची भेट घेण्याचा योग आणता येईल, असे खेरांनी महात्माजींना लिहिले. तसा योग आला. गाडगे बाबा आल्याची बातमी समजताच आसपासच्या १० - १५ कोसातली जनता मधमाशा सारखी झुंड्यानी गांधीजींच्या वर्धाश्रमात घुसलेली पहाताच, गांधीजी सुद्धा या सत्पुरुषाच्या लोक संग्रही आकर्षणाने चकित झाले. आश्रमात येताच गांधीजींनी बसायला एक आसन पुढे केले. बाबांनी उघड्या जमिनीवरच बैठक मारली. पंढरपूरच्या हरिजन धर्मशाळे विषयी आणि इतर संस्थां विषयी भाषणे झाल्यावर, बाबांनी भाकर, कांदा, मिरचीचे भोजन केले. महात्माजींच्या आग्रहावरून कीर्तन केले आणि स्वारी नमस्कार करून चालती झाली परभणीकडे. थोरा मोठ्यांच्या राजवाड्या सारख्या सदनात ही बाबांना जाण्याचे योग येतात. तेथे ही ते कधी बैठकीवर बसायचे नाहीत. दूर एका बाजूला जमिनी वरच त्यांची बैठक. कोणी अधिकारी खुर्चीवर बसलेला असेल तर हे बाजूला हवा तितका वेळ, काम होईपर्यंत ताठ उभेच राहतील. सारांश, राजवाडा नि स्मशान यांत त्यांना कसलाच काही भेद वाटत नाही.

• अपूर्व लोकप्रियता :

गेल्या १०० वर्षांत महाराष्ट्राच्या खडकाळ रूक्ष आणि डोंगराळ प्रदेशात अनेक संत निर्माण झाले, काही काळ लोकादराच्या कळसावर चढले आणि अखेर लोकनिंदेच्या गर्तेत कोसळून नामशेष ही झाले. भक्तोद्धारासाठी कित्येकांनी उभारलेले मोठमोठे मठ आणि शिष्य समुदाय आज जनतेच्या तिटकाऱ्याचे अथवा थट्टेचे ही विषय झाले आहेत. बाबांची लोक मान्यता मात्र सागरासारखी एकरसी नि अखंड फोफावती आहे. बुद्धाच्या दातांवर नि केसांवर प्रचंड स्तूप रचून त्यांची जशी भव्य मंदिरे जागोजाग दिसतात, तसे महाराष्ट्राच्या भावनाशील परंपरेने उद्या बाबांच्या काठी चिंध्या नि मडक्याची ही स्मारके उभारली जाण्याचा संभव नाही असे नाही. भावना काय उत्पात करणार नाही? चालू घडीला तरी स्वतः बाबाच अखिल जनतेच्या हृदयात प्रेमादराचे अत्युच्च नि अढळ पद पटकावून बसेल आहेत खरे. मऱ्हाठी समाज अनेक ‘इझम्’ च्या सांप्रदायिक हट्टवादात इतका विभागलेला आहे का त्याचा परिणाम परस्परांच्या रोटी - बेटी - बंदीपर्यंत ताणलेला आहे. पण ‘गाडगे बाबा’ हे नुसते नाव कानी पडताच किंवा त्याचे दर्शन समोर होताच, हे सारे ‘इझम्’ भराभर आपल्या विरोधाच्या पोलादी पाकळ्या मिटून एकत्र एकजीव एकवटतात. बाबांच्या चहात्यांत नाही कोण? सारे आहेत. कांग्रेसी आहेत, कम्युनिष्ट आहेत, सनातनी आहेत. सुधारक आहेत, आस्तिक आहेत आणि माझ्या सारखे नास्तिक ही आहेत. भोळ्या भाबड्या नि अनाडी खेडुतांच्या बरोबरीने जहाल बुद्धिवादी ही आहेत जो जो बाबांकडे पहातो त्याला त्याला ते आपल्याच ‘इझम्’ च्या रंगात रंगलेले दिसतात. या भेदातीत आदराची कारणे मोठी मजेदार आहेत. बाबांच्या व्यक्तित्वाचे पैलू जसे अनेक, तशी त्यांची किरणे ही इंद्र धनुष्यांसारखी अनेक. म्हणावा तर विरोध आहे, नाही तर नाही. बाबा हे जितके त्यागी आहेत, तितकेच संसारी आहेत. ते जितके ममताळू आहेत तितकेच कठोर आहेत. जितके विरक्त तितकेच संग्राहक. ते निर्मोही आहेत आणि व्यवहारी प्रापंचिक ही आहेत. वृत्तीने जितके सरळ तितकेच कोणा बरोबर कुठे काय नि किती बोलावे याची व्यवहारी धूर्तता बाळगणारे आहेत. त्यांनी स्वतःच्या घरादाराचा हुळा भाजला. प्रपंचा वरील स्वामित्वाला ही तिलांजुली दिली. असल्या या फटिंग फकिराने जागोजाग उभारलेल्या धर्मशाळा, घाट, पाणपोया, गोवर्धनी संस्था, सदावर्ते आणि अन्न वस्त्रदानाची प्रथा पाडून मोठ मोठ्या कोट्याधीश अमीराना ही लाजवले. समाजाची द्रव्य शक्ती एरवी जी कदाचित भलत्याच मार्गाला लागती, ती त्यांनी कुशलतने एकवटून सुयोग्य दानाच्या पाटातून सगळीकडे खेळविली. धर्मशाळादि सर्व संस्थांचे ट्रस्टडीड केलेले असूनही, ट्रस्टींच्या स्वाधीन असलेल्या बेवारशी इस्टेटी प्रमाणे, तेथला व्यवहार वा-यावर मोकळा सोडलेला नाही. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे. पंढरपूर, नाशिक या धर्मशाळांतून यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी नाना वस्तूंचा संग्रह करून ठेवलेला आहे. अगदी चिमटा, उलथण्यापासून तो मोठ मोठ्या हंड्या परातीपर्यंत हरएक उपयोगाची भाडी घासून पुसून लख्ख केलेली नंबरवार सेवेला सिद्ध. पट्टीच्या संसारी व्यवहारी माणसाने येथील टापटीप पाहून लाजावे नि धडा घ्यावा. धर्मशाळेचा कोनाकोपरा अत्यंत स्वच्छ. केराचा कणही आढळायचा नाही. स्वच्छता आणि आदर हा येथला ठळक ट्रेड मार्क. स्वच्छतेचे बाबांना इतके वेड का तेवढ्यासाठी त्यांनी आपली एक विशिष्ट खराटा संस्कृतीच निर्माण केली आहे म्हणा ना. नाशिक, पंढरपूर येथील धर्मशाळात दोन दिवस राहून आलेल्या प्रत्येक माणसाचे मन त्याला साक्ष देखील की, या वास्तु ज्या महात्म्याने निर्माण केल्या, तो फार मोठा कलाकार, चित्रकार, किंवा सिनेमाच्या भाषेतच बोलायचे तर शतावधानी आर्ट डायरेक्टर असावा. कोणत्याही धर्मशाळेत बुवाजी, गोसावी आणि कुष्ठरोगी यांना वसतीची परवानगी नसते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. सदावर्तात कुष्ठ्यांना अन्नदान मात्र अगत्य मिळते.

• झंजावाती संचाराचा क्रम :

साधकावस्थेत रेलवेच्या प्रवासात झालेल्या हाल अपेष्टांची माहिती मागे सांगितलीच. पुढे बाबांचे माहात्म्य जसजसे वाढत गेले तस तसे रेलवे प्रवासात हमालांपासून तो स्टेशन मास्तर इन्स्पेक्टरादि अधिकारी त्यांचा जागोजाग आदर सत्कार करू लागले. अखेर तर जी. आय. पी. च्या ट्राफिक सुपर टेण्डंटांनी अतिशय आग्रह करून बाबां सकट सगळ्या अनुयायांना सर्व लाईनभर मोफत प्रवास करण्याचे पास देऊ केले. बाबांसाठी फर्स्ट क्लासचा पास पुढे करताच ‘आम्हाला तुमचे पासच नकोत.’ असा नकार दिला. कसेबसे थर्ड क्लासचे पास मिनतवारीने घेतले. जेमतेम ते वर्षभर वापरून, "हवेत कशाला हे पास आपल्याला? सगळी दुनिया आपल्याला मोकळी." असे सांगून सारे पास परत केले. एरवी रस्त्याने जाताना ही पुढे पुढे बाबांना मनस्वी त्रास होऊ लागला. बाबा दिसले रे दिसले का दुरून का होई ना पण त्यांना दोन हात जोडून नमस्कार करणाऱ्या स्त्री - पुरुषांच्या टोळ्याच्या टोळ्या चहूबाजूनी भराभर जमा व्हायच्या. मुंबई सारख्या शहरात तर अनेक वेळा या गर्दीमुळे रहदारी कोंबून जायची नि पोलिसांची तिरपीट उडायची. एकीकडे लोक गर्दी करून बाबांच्या पायांना हात लावण्याची धडपड करीत आहेत नि बाबा ‘चलो, हटो दूर’ ओरडत हातातली काठी जोरजोराने आपटीत वाट काढीत आहेत, असा देखावा वरचेवर होऊ लागला. सहज फर्लांगभर चालायचे तर एक तास लागू लागला. ठरलेल्या कार्यक्रमांत गोंधळ उडू लागला. अखेर अनेक भक्त जनांनी विनवण्या करकरून प्रवासासाठी बाबांना एक प्रचारतंत्री मोटर दिली आहे आणि अलिकडे बाबांची फिरती मोटारीतून होत असते. तरीही त्यांचा बहुतेक खेड्या पाड्यांचा मैलोगणति दौरा आज ही बेधडक पायपिटीनेच होत असतो. रेलवे काय किंवा मोटार काय कशावर ही अवलंबून बसायचे नाही, लहर आली का चालायला लागायचे हा मूळचा क्रम चालूच आहे.

• निष्कांचनाची कांचन - किमया :

धर्मशाळादि संस्थांना हज्जारो रुपयांच्या देणग्या देणारात लाखाधीशापासून खाकाधीशा पर्यंत सर्व जातींचे, धर्मांचे नि व्यवसायाचे लोक आहेत. त्यांची ठळक अक्षरांत रंगवलेली नावे आणि मोठ मोठे फोटो धर्मशाळांच्या सभा मंडपात आढळतात. एका फटिंग मडकेधारी बैराग्याने हा लक्षावधि रुपयांचा प्रचंड प्रपंच उभारण्यासाठी पैसा पायांशी आणला कसा? हे वर्तमान युगातले एक मोठे नवलच आहे. एका ही दात्याचा तांब्याचा फद्या चुकून कधी बाबांच्या हाताला चाटून गेलेला नाही आणि पैसाच्या या लाखी व्यवहारात कधी कोठे अफरातफर झालेली नाही. स्वतः नाक्षर असून ही ठिक ठिकाणच्या ट्रस्टींच्या कारभारावर बाबांची चोखंदळ नजर गरुडा सारखी भिरभिरत असल्यामुळे त्यांना ही कमाल कसोशीने लहान मोठी रोजती कामे वक्तशीर आणि कमाल शिस्तीने पार पाडावीत लागतात. या बाबतीत श्री. मूर्खानन्दजीचीच माहिती येथे देतो - "याचकांचे राजे म्हणून महामना मालवीयजींची जी कीर्ती अखिल भारतात आहे, तीच बाबांची महाराष्ट्रात आहे. श्रीमंतांच्या तिजोऱ्यात निष्कारण कुचंबत पडलेली लक्ष्मी बाहेर काढून सत्कारणी लावण्याचे बाबांचे ‘योगः कर्मसु कौशलम्’ चातुर्य अनन्यसामान्य होय.

पै नि पैचा हिशोब रोखठोक. स्वतःच्या सहीची निशाणी अंगठा. ट्रस्टपत्रांवर किंवा सहीची जरूर पडेल तेथे तेवढ्या पुरतीच बाबांच्या अंगठ्याला शाई लागायची. पण हिशेब? त्याबाबत आम्ही नेहमी एकमेकांत बोलायचे का बाबा पेशवायीत कुणी तरी फडणीस असावेत. "जवळ एक छोटीशी पिशवी असून तीत एक अंदाजे १०० छोट्या पानांची ३’’ x ६’’ आकाराची उभी शिवलेली एक वही असते. त्या वहीत ब्रह्मांड भरलेले! गावोगावच्या महत्त्वाच्या माणसांची नावे, पत्ते, देणग्यांची तारीखवार यादी, अंध पंगूंसाठी कुठे किती घोंगड्या, कटोरे पाहिजेत त्यांची नोंद, पुढल्या १५ दिवसांचा कुठ कुठे जायचे त्याचा कार्यक्रम, अनेक ठिकाणी बंद झालेल्या आणि बंद करावयाच्या पशु हत्येची यादी, जागोजागच्या चालू बांधकामाचे भूत, वर्तमान नि भविष्य, लाख गोष्टी त्या चिमुकल्या चोपड्यात अगदी बारीक सुवाच्य सरळ अक्षरांनी लिहिलेल्या असायच्या. ज्याचे अक्षर असे उत्तम त्यावर बाबांची मर्जी मोठी. कुठे ही एकाद्या झाडाखाली तळ पडला म्हणजे कुणाकडून तरी शाईदौत मागवायची. टाकाला राणीपेन बोथीच हवी. मग बाबा एकाग्र चित्ताने डोक्यात साठवलेले माहितीचे साहित्य भराभर सांगायचे नि मी ते नीट जुळवून लिहायचे. वाचताना पटकन चूक दाखवायचे." एकाद्या धर्मशाळेत गेले का ट्रस्टी कारभाऱ्यांना कोणता प्रश्न नेमका विचारतील याचा थांग लागायचा नाही. त्याने जमा खर्च वाचावा नि बाबांनी पटकन ‘हे असं कसं केलं तुम्ही? ते तसं ठरलं होतं. सुधारा ती चूक आणि लिहा अमक्या तमक्यांना तसं केलं म्हणून.’ असा करडा हुकूम सुटला का फर्डा फडणीस ही सदानकदा डोळ्यांत तेल घालून आपल्या आकडे मोडीची शिकस्त करीत राहिला तर त्यात नवल कशाचे?

• बऱ्याच गारगोट्या, काही हिरे :

वर वर शांति ब्रह्म दिसणारे गाडगे बाबा खरे म्हणाल तर प्रज्वलित अग्निचा धगधगता ज्वालामुखीच होत. खोटे नाटे दांभिक नकली नाणे त्यांच्यापाशी टिकायचेच नाही. एका फुत्कारात जळून खाक ! बाबांचा लोक संग्रह अत्यंत डोळस आहे. आंधळा नाही. शिष्य शागीर्द किंवा पाठ चाले (अनुयायी) म्हणविणाऱ्या अनेकांनी बाबांच्या जवळिकेचे उचित आणि अनुचित उपयोग करून घेतलेले आहेत. संचार - प्रचारच्या अगदी सुरुवातीपासून भजनांची साथ करण्यासाठी किंवा बाबांच्या खराटा - कर्म योगात झिजण्यासाठी आजवर शेकडो शिष्य आले. अगदी थोडे टिकले. बाकीचे वाटेला लागले. बाबा आपल्याला शिष्य सुद्धा मानीत नाहीत, कधी प्रेमाने जवळ करतात तर कधी तडकावून धुडकावतात, हे खासखूस माहीत असून ही, निर्धाराने बाबांच्या सेवा कार्याला चिकटून राहिलेले आणि कसोटीला उतरलेले अनेक झाले आणि आज आहेत. त्या हिऱ्यांच्या जोडीने आलतू फालतू गारगोट्यांचा भरणा ही पुष्कळ झाला. बाबांचा लौकीक वाढू लागला. ‘बाबांचा शिष्य’ म्हणताच लोक हव्या त्या माणसाच्या पाया पडतात. विरक्तीच्या थोड्याशा बतावणीने काय हवे ते लोक देतात. या वर वरच्या देखाव्याला भाळून शिष्य नामधाऱ्यांची संख्या वाढत गेली. घरदार, आई बाप, गणगोत टाकून बाहेर सटकणारांच्या सबबी अनेक असतात. अन्न निवाऱ्याचा सुगावा काढीत असले भणंग, भटक्ये बाबांच्या छावणीत यायचे. जुन्या सेवकांबरोबर काही दिवस काढले का चढवला अंगात एक तांबडा डगला, त्यावर चौकडी बाज घोंगडीचा एक पट्टा, हातात टमरेल नि काठी का निघाली स्वारी उपदेशकाच्या जाम्या निम्याने प्रचारासाठी बाहेर! असल्या किती तरी हिणकस नामधारी गाडगे - शिष्यांनी गावोगाव बाबांच्या नावावर पैसे कपडे काही वस्तू नि मेजवान्या ही उकळल्याच्या तक्रारी पुराव्या सकट नावनिशीवार माझ्या हाती किती तरी आलेल्या आहेत. असल्या शिष्य पुंडांना प्रेमाने जवळ घेऊन सुधारण्याचा बाबांनी खूप यत्न करावा. कडू कारले तुपात तळले नि साखरेत घोळले तरी कडूच, अशी अनेक कारली आपणहून बाजूला पडली सडली नि नामशेष झाली.

• पाडाला लागलेले काही आंबे ही नासले :

दीन - दलितोद्धार, गो संरक्षण, रूढी - निर्दाळण आणि पशू पक्षी हत्याबंदीच्या बाबांच्या कार्यात अनेक वर्षे हिरिरीने भाग घेऊन त्यांच्या कसोटीला आता उतरणार, इतक्यात लोभ मोहाच्या तडाक्यात सापडून डागळलेले काही शिष्यही आहेत. बाबांची कीर्तने लोकांचे अज्ञान झाडून त्यांना शहाणपण नि माणुसकी शिकवण्यासाठी, तर लोभाला बळी पडलेल्या या प्राण्यांची कशासाठी? तर म्हणे या ना त्या राजकारणी पार्टीसाठी तालुका जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका लढवण्यासाठी! एकीकडे ‘गाडगे बाबांचे शिष्य’ म्हणून मिळणारा लोकांचा आदर आणि वर त्या उपट शुंभ प्रचार कार्यासाठी आपोआप मिळणारी छन् छन् रोख रुपयांची दक्षणा! कोणा मानवाच्या कार्ट्याच्या तोंडाला सुटणार नाही पाणी? त्या खटपट्यांच्या मेळाव्यात या दामानंदजींचा भाव वधारला, पण अग्निदेव गाडगे बाबांच्या तृतीय नेत्राच्या एकाच वटारणीने तो भाव, ते मानपत्र आणि ती उसनी वैराग्याची ऐट क्षणार्धात जळून खाक! गाडगे बाबांचे लोकसेवेचे तंत्र म्हणजे एक खोल दरीत तुटलेला भयंकर सुळक्याचा कडाच! त्यावर चालताना जरा वाकडे पाऊल पडले का झालाच चालणाराचा कपाळ मोक्ष!

• गाडगे बाबांचे नाव - एक हुकमी टांकसाळ :

गेल्या ५० वर्षांच्या कीर्तन - संचारात मला पैसा द्या किंवा माझी अमूक सोय करा, असा एक शब्द ही बाबांनी चुकून तोंडावाटे कोणा जवळ काढलेला नाही. कोठे ही जायचे, कीर्तन करायचे आणि पार दूर निघून जायचे, एवढेच त्यांना माहीत. तरी ही लाखो रुपयांच्या देमग्या घ्या घ्या म्हणून त्यांच्याकडे आल्या. त्यातल्या फुटक्या कवडीला ही स्वतः स्पर्श न करता, त्या धन राशींनी जागोजाग मोठ मोठ्या धर्मशाळा, घाट, गोरक्षण संस्था नि पाणपोया लोकांकडूनच उभारल्या आणि ट्रस्टींच्या हवाली केल्या. हा सुद्धा अनेकांना एक चमत्कार वाटण्यासारखा आहे. या चमत्काराचा ही त्यांचे काही शिष्य म्हणविणारे लोक हुकमी टांकसाळी सारखा कसा फायदा उकळतात, ते मी स्वतःच दादर शिवाजी पार्क मैदानावर पाहिले आहे. एरवी कोणत्याही सर्वजनिक कार्याला पैसा काढणे मोठे कठीण कर्म झाले आहे. पण गाडगे महाराजांच्या अर्ध शतकाच्या लोकहितवादी कर्मयोगाची बहुजन समाजावर अशी विलक्षण मोहिनी पडलेली आहे की गाडगे महाराज की जय असा जयघोष होताच, फेरीवाले, कल्हईवाले, तेली, पानवाले, तांबोळी, पाटीवाले कोणीही असोत, भराभर जयघोषवाल्यांवर पैशांचा पाऊस पाडतात. शिवाजी पार्कातल्या कीर्तनवाल्यांनी बाबांच्या नावावर एका तासत आठ हजार रुपयांचा गल्ला जमा केलेला मी पाहिला. जागोजागच्या या पैसा - उकळणी विषयी बाबा वारंवार कीर्तनात लोकांना इषारे देतात. अहवाल पुस्तकांतून जाहीर सूचना देतात. या पेक्षा त्यांनी आणखी काय करायचे?

• स्वतंत्र खुराड्याचे मठवाले :

मठ, देवळे संप्रदाय, गण्डेबाजी तीर्थ यात्रा नि चारी झाम या फिसाटांचा बाबांनी आजवर कडक निषेध केलेला आहे. यज्ञयाग ही त्याज्य असे ते सांगतात. या निषिद्ध गोष्टी आचरून बाबांच्या निर्मळ मनाला नाराज करणारे काही विघ्न संतोषी ही पैदा झाले. बाबांच्या कसोटीच्या परीक्षेतून कसेबसे बाहेर पडलेले आणि बाबांच्या नावावरच मिळालेल्या लोक मान्यतेच्या भांडवलावर हटातटाने पटा रंगवून नवनवीन मठांची उठाठेव करणाऱ्या बाया नि बुवांचा एक वर्ग तयार झाला आहे. त्यांनी आपला एक नवाच शिष्यांचा गोतावळा जमा केला. ‘गाडगे महाराज की जय’ या जयघोषांवर लोकांकडून हजारो रुपये कीर्तनांच्या जागी सफाईत उकळण्याची किमया चालवली. कारकून, कारभारी, सेक्रेटरी नि मॅनेजर कामाला लावले. लांबलांबच्या तीर्थयात्रांसाठी दिंड्यांचे ढोंग काढले. गावोगाव दक्षणा जेवणावळी सन्मान - सत्कारांचा पाऊसपडू लागला. मठ बांधले. यज्ञ पेटवले. अन्नदानांची खैरात केली. वृत्तपत्री प्रसिद्धीसाठी बातम्या मुलाखती लेख फोटोंची कमाल करामत केली. अखेर काय? बिचारे कांचन - कामिनीच्या आणि कोर्ट - कचेऱ्यांच्या लफड्यात गुरफटले! प्पर तो और बनी, अंदर की बात राम जाने, असा मामला झाला.

• कसोटीचे कार्यकर्ते :

गारगोट्यांचा भरणा असा किती ही असला तरीही बाबांच्या अवती भवती आज ही अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बाबांच्या शिस्तीने लोकसेवेचे महान कार्य करीत आहेत. निस्पृहतेचा हा वासुदेव टाळ - चिपुळिया वाजवीत धीर गंभीर ऐरावता सारखा पुढे चालला आहे, आघाडीला साधनेचा नंदादीप शांतपणे तेवत आहे आणि पाठोपाठ या महान सत्पुरुषाच्या एकनिष्ठ सेवकांची मांदी मिटल्या तोंडी चालली आहे गावोगाव, हातात खराटा घेऊन लोकांचे अज्ञान, दारिद्र्य नि हाल अपेष्टांचा केरकचरा झाडीत, बाबा या सगळ्यांमध्ये आहेत आणि या सगळ्यांपासून दूरही आहेत. अगदी एकटे. कारण ते ना कुणाचे गुरु, ना त्यांना कुणी शिष्य.

• मेणाहुनि मऊ पण :

बाबांच्या ममताळू पणाची कल्पना त्यांच्या सहवासात १० - १५ दिवस राहिल्या शिवाय येणार नाही. ते ‘रहाणे’ सुद्धा सामान्य प्राकृत माणसाला एक दिव्यच वाटेल. पायांवर कायमचा भोवरा गरगरत असलेल्या त्या तुफानी वाऱ्या बरोबर एका जागी स्थिर राहताच येणे शक्य नाही. सिग्नल दिला नाही तर पंजाब मेल सुद्धा हवा तो स्टेशन मास्तर थोपवून ठेवू शकतो. पण बाबांच्या पायदळ मेलगाडीला थांबवम्याची कुणाची ही छाती नाही. ‘निघा’ म्हटले का त्यांची पावले लागलीच चालायला. एरवी हिमालया प्रमाणे धीर गंभीर वृत्तीने लोकांच्या नि पशु पक्ष्यांच्या हाल अपेष्टांनी कळवळणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी वाऱ्यासारखा धावत जाणारा हा दयासागर, असत्य, अन्याय, दंभ, कर्तव्यात कुचरायी दिसली का एकदम वज्राहून ही कठोर होतो. स्वतःच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकनही जो हिमालया सरखा निर्विकार राहतो, तोच खाडीत पडलेल्या एका गाईसाठी बेधडक समुद्रात उडी घेऊन तिला काठावर आणतो आणि उपचार करून तिला चालती हालती घरी पाठवतो. या माणसाच्या स्नेहाळू पणाने पाघळून एकादा विशेष सलगी करू म्हणेल, तर त्याला काठीचा फटका खाऊन, ‘चल हो चालता इथनं’ हा प्रसाद मिळाल्या शिवाय रहाणार नाही.

• चारधाम दिंडीवाल्यांची हजेरी :

काही दिवसांपूर्वी गाडगे महाराज की जय करीत चार धामाची प्रचंड यात्रा आणि अखेर एक मोठा यज्ञ करणाऱ्या बाबा बुवांची धामधूम वर्तमान पत्रांत गाजलेली पुष्कळांच्या स्मरणात असेल. त्यात गाडगे महाराजांचे नाव गोवले गेल्यामुळे, बाबां विषयी अनेक गैरसमज फैलावलेले होते. वृत्तपत्री गाजावाजाची टीका टिपणीची बाबा कधीच दाद घेत नसतात. इतर बाबीप्रमाणेच मला काय त्याचे? हा त्यांचा दंडक कायम असतो. चार धाम काय नि शंभर धाम काय, यात्रा काय नि दिंड्या काय, बाबांनी या फंदाचा कडकडीत निषेध अखंड केला नि आज ही करीत असतात. खुद्द या चारधामवाल्या दिंडी-गणंगांचा ही थेट त्यांच्या मेळाव्यात जाऊन बाबांनी अनेक वेळा धिक्कार ही केला. घरदार टाकून दिंडी बरोबर निघालेल्या अनेक भटक्यांची कान उघडणी करून परतवले सुद्धा. महायज्ञाचा डांगोरा पिटणाऱ्या मोठ मोठ्या जाहिराती महाराष्ट्रभर फडकल्या. आसेतु हिमालयातून मोठ मोठे साधु संत यज्ञाला येणार आणि आमच्या गुरु महाराज गाडगे बाबांचे त्यांना दर्शन होणार, फार काय, पण तो महायज्ञ खुद्द गाडगे महाराजांच्याच खास नेतृत्वा खाली होणार, अशा अर्थाच्या जाहिरातीमुळे तर बाबां विषयी गैर समजांचे अनेक उलट सुलट प्रवाह वृत्तपत्रांत वाहू लागले. अखेर ज्ञानोबांच्या आळंदीला बाबांचा फेरा आला असता, त्या चारधामवाल्या याज्ञिक बाया बुवांनी बाबांची भेट घेऊन, आपली सर्व महान धार्मिक कर्तबगारी कथन केली आणि महायज्ञाच्या वेळी बाबांनी पंढरपूरला अगत्य येऊन अखिल भारतीय संत मंडळींना दर्शन द्यावे, अशी प्रार्थना केली. बाबांनी त्यांची चर्पट पंजरी मुकाट्याने ऐकून घेतली. - बाबा, आपण आला नाहीत तर आमची मोठी फजिती होणार आहे.

बाबा -
कुणी सांगितलं होतं या फंदात पडायला तुम्हाला? ज्याने करावे त्याने भरावे. मला या लफड्यात का बाप्पा गोवता?

चाधावा (चारधामवाले) -
बाबा स्वप्नात तुम्ही साक्षात्कार दिलात म्हणून... आम्ही हे सारं केलं.

बाबा -
माय बाप हो,
का माझी गरिबाची अशी बदनामी करता? दृष्टांत, साक्षात्कार ही सारी थोतांडे आहेत. यात्रा, जत्रा, यज्ञ ही ढोंगे आहेत, हे जन्मभर मी घसा फोड फोडून सांगत असता, मलाच ओढता या लफड्यात? चला चालते व्हा इथनं. एक शब्द बोलू नका. तुमचं ते यज्ञबिज्ञाचं लफडं पुरं होईपर्यंत पंढरपूरचे तोंड नाही पहाणार मी.

चाधावा -
पण बाबा आम्हाला नेहमी तुमची प्रेरणा होते.

बाबा -
मग जा घेऊन त्या प्रेरणेला आणि करा उभी यज्ञाजवळ. माझं काय काम तिथं? चला निघा इथनं. चाधावांची अशी धुळपट काढल्यावर त्यांनी बाबांच्या समजुतीसाठी अनेक मध्यस्थी घातले.

बाबांनी अखेरचा जबाब दिला -
"तुमच्या चारधामाचे नि महायज्ञाचे मोठ मोठे जाहीरनामे माझं नाव घालून हिंदुस्थानभर फडकवले आहेत. विचारलं होतंत आधी मला? आता असं करा. यज्ञाच्या वेळी जे साधू संत यात्रेकरू पंढरपूरला येतील, त्यांच्या जेवणावळीची खरकटी आणि विष्ठा झाडायाल गाडगे बुवा स्वतः हातात खराटा घेऊन उभे ठाकणार आहेत, असा दुसरा नवा जाहिरीतनामा द्या फडकावून जिकडं तिकडं. असं कराल तरच येतो तेवढ्याच कामासाठी. परवडत नसेल तर चला उठा. जा आपापल्या कामाला."

बाबांनी त्या महायज्ञाच्या फंदात कसला ही काही भाग घेतला नाही, हे निराळे सांगायलाच नको.

• बिनतोड सरळपणा :

बाबांच्या सरळपणाला तोड नाही. त्यांच्यावर विश्वास टाकणारा कोणीही माणूस फसणार नाही. आज वर फसला नाही. कपट अपहार स्वप्नात त्यांना ठावे नाहीत. थोडी बहुत ओळख झाली, काही बोलणे झाले, एवढ्याच विश्वासावर कोणी त्यांना बनवून फसवू म्हणेल ते बिलकूल शक्य नाही. महात्मा गांधीशी कसे बोलावे, बाळासाहेब खेरांशी कसे वागावे, डॉ. आंबेडकर भेटले म्हणजे त्यांच्या वकिली पेचपाचांच्या मुद्यांना थोडक्यात पण समर्पक उत्तरे कशी द्यावी, भाऊराव पाटलांशी व्यवहार कसा करावा, नाना पाटील भेटीला आले म्हणजे किती बोलावे, तुकडोजी बुवांच्या ‘राष्ट्रीय’ विवंचनेच्या सवालांची वासलात कशी लावावी, मुसलमान किंवा (पूर्वी) इंग्रेज अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत कसे बोलावे इंग्रेज अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत कसे बोलावे, इत्यादि व्यावहारिक तत्त्वे ते जन्मा बरोबरच घेऊन आलेले दिसतात. पुष्कळ वेळा असे वाटते का गाडगे बाबा साधू झाले नसते तर स्वतंत्र भारताचे परराष्ट्रीय वकील खास झाले असते.

• लोक श्रद्धेला वळण लावले :

बाबांच्या लोक प्रियतेची कारणे येथेच संपत नाहीत. ज्या समाजांत ते वावरत आहेत, त्यांच्या मनोवृत्तीचा श्रद्धाळू भाग ही विचारात घेतला पाहिजे. व्याख्या काहीही करा, भारतीयांची एक विशिष्ट संस्कृती आहे आणि ती थोड्या फार फरकाने व्यक्तिमात्राच्या पिंडी ब्रह्मांडी भिनलेली आहे. ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’ असा बकवा करणारा हिंदी कम्युनिष्ट लेनीन, स्टालिनच्या फोटोला हार घालून त्यापुढे उदबत्ती लावतो, डोळे मिटून प्रार्थना करतो. निधर्मी राज्याचे फतवे फडकवणारे कांग्रेसी राज्यकर्ते महात्मा गांधींची मृण्मय रक्षा गंगा, यमुना, गोदा, कृष्णा इत्यादी नज्यांत बादशाही थाटा माटाने सापडण्याची कसोशी करतात. पंडित जवाहरलाल नेहरू सारखा कट्टर बुद्धिवादी कोण आहे? पण त्यांनाही स्वित्झर्लण्डात मरण पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीची रक्षा प्रयागावर आणून गंगार्पण केल्या शिवाय राहवले नाही. काय घ्याचे यावरून? इझम् कोणताही असला तरी परंपरेने आलेल्या श्रद्धेनेच भारतीय व्यक्तीचे जीवन आकर्षित झालेले आहे. या श्रद्धेला हवे तर अंधश्रद्धा म्हणा. पण ती आहे. श्रद्धेच्या नाजूक भावनांना डिवचूनच आजवर हजारो परान्नपुष्ट बुवा बैरागी नि फकीर जगत आले. आज देशासमोर अन्न टंचाईचा घोर संकटाचा प्रश्न आ वासून उभा आहे तरीही, आणि निरुद्योगी ऐदी, चंगी भंगी बुवा - फकिरांना पोसण्यात काय शहाणपणा. एवढे मनाला पटत असूनही, दारी येईल त्याला पसाभर भीक घालण्याची लोकांची श्रद्धेची भावना होती तशी कायम आहे ना? अंधश्रद्धेने होणाऱ्या या प्रचंड अन्नदानाचा ओघ गाडगे बाबांनी अत्यंत निराश्रित आणि हतबल अशा हजारो अंध, पंगू, कुष्टी यांच्या जीवन धारणेकडे वळविण्यात दाखवलेली कुशलता आणि लोकमताला दिलेली कलाटणी वा खाणण्यासारखी नाही असे म्हणता येईल काय? बाबांचे नाव ऐकताच लाखो लाखो खेडूत रोमांचित होतात, त्यांच्या दर्शनासाठी चुकलेल्या वासरासारखे धावतात याचे रहस्य येथेच आहे. ओली कोरडी भाकर आणि कांदा मिरची एवढ्या वरच स्वतःच्या गरजांचे शून्य करून, इतर अभागी बुभुक्षितांना मिष्टान्नांची सहस्र भोजने घालणारा महाभाग, हा चालू काळच एक जिवंत चमत्कारच जनतेला वाटतो.

• कर्मयोगी कीर्तनकार :

कीर्तनासाठी अमूकच व्यवस्थेची जागा हवी, अमूकच भजनी साथीदार हवेत, दिव्या बत्यांची रोषणाई हवी, असा कसला ही काही बाबांचा कटाक्ष नसतो. ‘कीर्तन करा’ असे लोकांनी म्हटले का त्यांनी उचललेच दोन दगड टाळांच्या ऐवजी आणि केलीच ‘रामकृष्ण हरि जय’ भजनाला सुरुवात. परवा देहूला असाच योग आला. त्याचे दर्शन शेजारच्या चित्रात आहे. दगडाच्या टाळ चिपळ्या करून ज्या ठिकाणी संत शिरोमणि तुकाराम महाराज विठ्ठल नामघोष करीत, त्याच देहू क्षेत्रात श्री गाडगे बाबांनी मस्तकावर मडक्याचे टवकळ ठेवून, दगडाच्या टाळांनी भजनाला प्रारंभ करताच, बाजूला जमलेल्या हजारो यात्रेकरूंच्या डोळ्यांत भावनाश्रू डबडबले आणि हरिनाम - घोषाचा तेथे मुसळधार पाऊस पडला. बाबांती कीर्तने लक्ष्यपूर्वक ऐकली तर हा माणूस मूर्ती पूजे पेक्षा मानवातील मानव्य रूपी परमेश्वरा वरच कडकडीत श्रद्धा ठेवणारा आहे, हे चटदिशी पटते. नाशिक, पंढरपूर, आळंदी, देहू इत्यादि ठिकाणी मोठ मोठ्या धर्मशाळा बांधल्या नि सदावर्ते, अन्न सत्रे चालू केली. पण तेथल्या क्षेत्रस्थ देव देवतांचे त्यांनी क्वचितच दर्शन घेतले. जगाचा नियंता परमेश्वर दगडा धोंड्याच्या असल्या स्वरूपात वसलेला किंवा बसलेला असतो, या खुळावर त्यांची लवमात्र श्रद्धा नाही. इतके सत्य पटलेले असून ही श्रद्धाळू जनांचा बुद्धिभेद चुकून ही ते करीत नाहीत.

आषाढी एकादशीच्या प्रसंगी एकदा कोणी से बाबांना म्हटले, "बाबा, देव दर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर, माणसांनी फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे नि घाटाकडे हात दाखवून बाबा म्हणाले - "हा समोर जागता बोलता नाचता विठ्ठल दिसत असता, देवळात जायचेच कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं? जिकडं नजर टाकावी तिकडं तो अपरंपार भरलेला आहेच."

तात्पर्य -
लोकांच्या धर्मश्रद्धेची एकाद्या खाटकासारखी चिरफाड न करता,

‘लेकुराच्या साठी,
पंते हाती धरिली पाटी’

या तुकोक्तीप्रमाणे त्या श्रद्धेला हळुवार बुद्धिवादी वळण लावून ती सत्कारणी लावण्याचाच उद्योग त्यांनी चालवला आहे. कीर्तनकाराचा पेशा निवडण्यात बाबांची धोरणी चतुराईच दिसून येते. दर दिवशी कोठे ना कोठे हजारो आबाल वृद्ध स्त्री पुरुषांना विठ्ठल रखुमाई, गोविंद राधे, एकनाथ तुकाराम या थोर थोर संतांच्या जय जयकाराने त्यांचे मोठेपण कशात आहे आणि ते आपण अंगी आणण्यासाठी काय करावे, याचेच शिक्षण ते देत असतात. त्यांचे अखंड नाम स्मरण माणसाला देवपणा देते आणि कोंबडी, बकरी मारून देवाला संतुष्ट करू पहाणारे परमेश्वराचा कोप ओढवून घेतात, हे सिद्धांत रसाळ वाणीने आणि असामान्य तळमळीने जनमनांवर पटवणारा पटाईत कीर्तनकार म्हणून गाडगे बाबांचे स्थान आज सर्वोच्च आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात धंदेवाईक वारकऱ्यांचे भजनी फड किती ही पडलेले असोत, गाडगे बाबांचे कीर्तन चालू झाले रे झाले अशी हाक कानी येताच, जनतेचा गंगौघ भरारा तिकडे धावत जातो आणि फडकरांच्या समोर त्यांचे मोजके टाळ मृदंगवालेच तेवढे शिल्लक उरतात, हा देखावा नेहमी पहायला मिळतो. माया, ब्रह्म, साक्षात्कार, समाधि, मोक्षाच्या गाळात अडून बसलेली परमार्थाची गंगा बाबांनी नेटक्या मऱ्हाठी भाषेच्या पाटानी अफाट बहुजन समाजांच्या मनांगणावर खेळवली. ज्ञानेश्वर, तुकारामादि संतांच्य अभंगा वरील केवळ शाब्दिक चर्चेतच अडकून पडलेल्या पंडिती कीर्तनकारांना त्यांची वाट मोकळी ठेवून, सोप्या, गावंढळ रोजच्या भाषेत रसाळ दृष्टांतानी, व्यवहारात हरघडी घडणाऱ्या अनुभवांच्या दाखल्यानी आणि सडेतोड खटक्यांनी ‘आंगठे निशाणी’ ग्येन्बा - पांडवांना जगण्या - मरण्याचे मर्दाईचे धडेच बाबा अखंड देत असतात. अगदी तुकाराम महाराजांच्या अभंग बोलातच सांगायचे तर.

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ।
उदास विचारें वेंच करी’

हेच बाबांच्या कीर्तनांचे थोड्यात सार सांगता येईल. वारकरी पंथाने देव देवळे दान दक्षणा ब्राह्मण भोजनादि पोटभरू व्यापारात लोकांच्या श्रद्धाळू भावनांचा जो दुरुपयोग चालवला होता त्याला गाडगे बाबांच्या कीर्तनानी आता पुष्कळच पायबंद ठोकला आहे.

• जनता संपर्क (मास कॉण्टॅक्ट) :

चालू जागतिक उलाढालीत जनता संपर्क हे चळवळींचे नि राजकारण सिद्धीचे एक जाज्वल्य साधन अथवा शस्त्र झाले आहे. सारे राजकारणी पंथ, पक्ष या संपर्काच्या सिद्धीसाठी धडपडताहेत. मोठ मोठ्या सभा भरतात. लाखो गणति लोक येतात. टाळ्या पिटतात. जय जयकार करतात. तरी ही ही संपर्क सिद्धी अजून एकाही पंथाला साधलेली नाही. लोकमान्य म्हणून मिरवणाऱ्या कांग्रेसी पार्टीची ही एकच रड ऐकू येते का आम्ही अजूनही जनता संपर्कापासून दूर दूरच आहोत. या दुराव्याचे कारण

मोले घातले रडाया ।
नाही आसू नाही माया ।।

या तुकोक्तीतच सापडते. मोठ मोठे पुढारी सभांत भाषणे करतात. त्यांचा परिणाम काय होतो? नळी फुंकिली सोनारें नि इकडून तिकडे गेले वारे, एवढाच, थेट खालच्या तळाला रुतून पडलेल्या अनाडी खेडूनत जनतेच्या काळजाला गाडगे बाबांचा जिव्हाळा जसा बिचूक प्रत्यक्ष जाऊन भिडला आहे, तेवढी सिद्धी आज वर कोणी ही मिळवलेली नाही. गाडगे बाबा आले या एका हाकाटीने मागासलेल्या बहुजन समाजांत चटदिशी उत्साहाची नि उमाळ्याची बिजली सणाणत जाते. श्रीमंतांपासून भणंग भिकाऱ्या पर्यंत सगळी दुनिया त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी आणि ते सांगतील ते करण्यासाठी वाऱ्यासारखी जमा होते. बाबांच्या या लोक संग्रही जनता संपर्काचा थोडासा उष्टामाष्टा घास आपल्याही पदराला लागावा, यासाठी अनेक विद्यमान राजकारणी पक्षांनी खटपटी केल्या आहेत पण बाबा पक्के वस्ताद! राजकारणी सौद्याच्या या सोदेगिरीत ते आपल्या परमार्थाला यत्किंचित ही विटाळू इच्छित नाहीत. थोड्याच दिवसां पूर्वी पंढरपूर मुक्कामी एका नामवंत ‘राष्ट्रीय’ संत कवीने बाबांना राजकारणी भवितव्याच्या चर्चेत गुरफटण्याचा डाव टाकला. ‘‘मी जन्माचा अडाणी, आंगठे बहाद्दर नांगर गट्टया. मला हो काय तुमचे हे कसले कारण का फारण म्हणता ते समजणार? गमन नसे ज्या गावी, तेथील वाट कशास पुसावी?" असा सरळ साफ जबाब देऊन एक मिनिटात वाटेला लावले.

• लोकोत्तर पुरुषोत्तम एकटाच असतो :

इतिहास निर्माण करणाऱ्या लोकोत्तर पुरुषोत्तमांची परंपरा त्यांच्या मृत्यू बरोबरच मरते, असा इतिहासाचा दाखला आहे. कोणत्याही राष्ट्रात हाच प्रकार. छत्रपति शिवाजी महाराज! शून्यातून त्यांनी मऱ्हाठी स्वराज्याचे ब्रह्माण्ड निर्माण केले. त्यांच्या मृत्यू बरोबरच छत्रपतीच्या छत्राची नि त्या स्वराज्याची वाताहात चालू झाली. पुढचे सारे छत्रपति छत्र्या वापरणारे सामान्य वारसच ठरले ना? थोरल्या बाजीरावा नंतर पेशवाईचे काय उरले? लोकमान्य टिळकांच्या राष्ट्र संसाराचे मुंबईच्या बॅकेवरच जळून कोळसे झाले. ऑन. गोखल्यांच्या मागे काळा लाँग कोट, उपरणे, पगडी आणि भारत सेवक समाजाची खाणावळ तेवढी शिलकी उरली. महात्मा गांधींच्या संप्रदायाचे धिंडवडे आज आल्या डोळ्यांसमोर चालूच आहेत. संत शिरोमणी तुकारामाच्या मागे टाळ, टिळा, माळेपेक्षा विशेष काय उरले? रामदासांची देवळे बांधणारां जवळ दासबोधाची चर्पट पंजरी आणि फुंड गुंडीशिवाय काय माहात्म्य दिसत आहे? बाविक भगतानी चमत्कार - साक्षात्कारांचा माल मसाला भरपूर घालून रंगवलेले भरमसाट नि खोट्यानाट्या तपशिलांचे पुराणवजा इतिहास तेवढे सत्य शोधकांची माथे फोड करायला जिवंत राहिले आहेत. भूत - वर्तमान - भविष्याचा बिनचूक काटेतोल अंदाज करणाऱ्या गाडगे बाबांना कर्तृत्वाचा लवलेश हि अभिमान नसला, तरी चिंध्या - काठी - मडक्याच्या प्रतापाने जागोजाग उभारलेल्या मोठ मोठ्या लोकोपयोगी संस्थांचे आणि अनुयायांच्या टोळ्यांचे भविष्य त्यांनी तंतोतंत हेरून ठेवले आहे आणि तशा स्पष्ट सूचना आजू बाजूच्याना निस्पृहपणाने ते नेहमी देतच असतात. शिवाजीच्या अमदानीत खावंद जबरदस्त म्हणूनच हजारो भले बुरे, शिष्ट अशिष्ट, समज्ज दुर्जन आणि सरळ हेकट एकमार्गी एकसुती राष्ट्र कार्याला जुंपले गेले. तोच प्रकार आज गाडगे बाबांच्या गरुड नेत्री कारभारात दिसत आहे. हनुमान गढीवर उभारलेल्या नाशिकच्या प्रचंड धर्मशाळेकडे पाहून एकदा ते आपल्या अनुयायांना म्हणाले, "हा पसारा कुणी उभा केला? मी का तुम्ही? सरकारने जागा दिली. उदार दात्यांनी धन दिले, कामकऱ्यांनी कष्ट केले. म्हणून हा देखावा दिसतो. आपण काय केलं? काहीही नाही. कल्पना केली? नुसती कल्पना करून काय झालं असतं? श्रींमतांनी पैसे दिले, कामकऱ्यांनी घाम गाळला, त्यांचे उपकारांचे ओझे आपल्या माथ्यावर चढले. या धर्मशाळेत हज्जारो लोक येतात, सुखाने राहतात, गोर गरिबांना अन्न सत्रात भाकर - आमटी मिळते, ते त्या धनदात्यांना नि कामकऱ्यांना दुवा देतात. त्यांचा तो आनंद आपण डोळे भरून पहावा, एवढेच आले सुख नि भाग्य. ज्या निस्संग, निर्हेतुक वृत्तीने ही माया जन्माला आली, आज चालू आहे, ती वृत्ती ज्या दिवशी किंचित तिळा एवढी ही डागळली जाईल त्या दिवशी ही धर्मशाळा त्या टेकडी वरून कोसळून या खालच्या गोदावरी मातेच्या पोटात अखेरचा ठाव घेईल. "या उद्गारातंच बाबांच्या निष्काम कर्मयोगाचे सारे मर्म स्पष्ट उमटलेले दिसते. अनुयायां विषयी ही त्यांची वृत्ती अशीच निस्संग निर्मोही नि बेपर्वा असते. मेघ नाही विचारीत । हगणदारी आणि शेत या तुकोक्ती प्रमाणे कच्चा, सच्चा, लुच्चा किंवा हुच्चा कोणी ही असो, सर्वांशी ते पित्याच्या विशाळ प्रेमळ भावानेच वागत असतात. "ज्याचे कर्म त्याच्या बरोबर! माझ्या मार्गाने आणि चाकोरीने चालला तर झालं आहे तेवढं टिकेल काही काळ. नाहीतर अखेर आहेच ठरलेली. व्हायचे आणि जायचं, हा जगाचा नियमच आहे. हसायचं कशाला नि रडायचं तरी कशाला? म्हणा गोविंद राधे गोविंद, जय गोविंद राधे गोविंद."

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ५ -
गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

अवचित नि अयाचित योगाने गाडगे बाबांचे हे परम पवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरि मजवर सोपवण्याचि बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाळ. हकिकतीचे, आठवणीचे नि भक्त जनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे किती तरी कागद पत्र माझ्यासमोर उभे. किती घ्यावे नि कोणते टाकावे, समजे ना. गांगरुन गेलो मी! प्रथम, तपशीलवार विस्तृत मोठे चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच, एक दिवस बाबांचा निरोप आला. फुलवात तेवत आहे तोंवर तिच्या उजेडात काय पहायचे ते पाहून घ्यावे.

केव्हा वारा येईल नि ती विझेल, याचा काय नेम? या निरोपाने मी तर चरकलोच. चला मोठे नाही तर छोटे. पण माझ्या नेहमिच्या पध्दति प्रमाणे वाचकांच्या विचाराना चालना देणारे पुस्तक. शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाईप रायटर खडाडवित. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्य मुख्य ठळक पैलू मी येथेवर चित्रित केले. इंद्र् धनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणार्याख शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन - मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातील ती निरांजन मला सारखी वाकुल्या दाखवीत सुटली, केली सेवा वाचकानी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद. अखेर, गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा, या न्यायाने ही चरित्र - लेखनाची पत्री श्री गाडगे बाबांच्या चरणा (अरे हो! पायाना तर ते हात हि लावून देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यांत साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे. गरिबाची शिळी पाकी भाकरी आमटी बाबानी रुचकर मानून दिलेला समाधानाचा ढेकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणारा.

- मुंबई नं २८ महाशिवरात्र,
शके १८७३ ता. २३ फेब्रुवारी १९५२,
केशव सिताराम ठाकरे.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ६ -
श्री संत गाडगे बाबांचा संदेश

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

दगडाला चार दोन आण्याचा शेन्दूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडतात, तोंडात राख घालता, ही काय रे बाप्पा तुमची अक्कल? देवमूर्ती घडवणारे पाथरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप कां होऊ नयेत? चुकला, आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्डयाकडे चालतो आहोत. म्हसोबा मरीआई पुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील? देवच जाणे. आता आपलं कसं फसत चाललय ते पहा. एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगांव पहावं तर दगडाना शेन्दुर फासुन हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालु ठेवलाय.

अहो बाप्पानो,
दगड धोंड्यांना नुसता शेन्दूर फासुन जर त्याचा देव होत असेल आणि नवसाला ही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटे बाज शेन्दुर फासून त्याचा टप्पोरे बाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठ मोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरं ढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धूपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमेल का हे असं केले तर? तर मग हा धंदा लबाडीचा आहे.

"माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ति बनवतो आणि आपलेच चित्र उभे करतो आणि त्याला देव समजून लोटांगणे घालतो. माणसा सारखाच देव असता, तर देवाला साधले ते माणसांना हि साधले असतें. आज वरच्या अनेक साधू संतांनी देव-देवता, धर्म, व्रते, दाने, तीर्थयात्रा यांचेच प्रचंड बंड माजवून लोकांना देव खुळे नि धर्म वेडे बनवले. मोक्षाच्या भरमसाट कल्पनानी कोटि कोटी अडाणी स्त्री - पुरुषांना संसारातून उठवून भिकेला लावले. दगड माती धातूंच्या मुर्तीचे भजन पूजनाचे लोकांना वेड लावून त्यांना माणसांतुन उठवले. माणुसकीला पारखे केले. माणसापेक्षा दगड धोंडेच भाग्यवान ठरले. अन्न, वस्त्र, आसऱ्याला आंचवलेल्या माणसांसाठी त्यांची तरतुद करण्याऐवजी, देव देवळांच्या उभारणीसाठी आणि ऐदी बैरागी, गोसावी, भट, भिक्षुकांना निष्कारण पोसण्यासाठी अब्जावधी रुपयांची खैरात चालु झाली. माणसापेक्षा फत्तरी देव देवतांची आणि त्या परन्नपुष्टांची प्रतिष्ठा वाढली. तिरस्करणीय बुवाबाजीचा जन्म येथेच झाला.

माणुसकीची अवहेलना आणि बदनामी करणाऱ्या या परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचे प्रयत्न अनेक शहरी सुधारकांनी आजवर पुष्कळ केले. पण त्या बुद्धीवादी प्रयत्नांची आंच लक्षावधी खेड्यांत पसरलेल्या अडाणी बहूजन समाजांपर्यत जाऊन कधी पोचलीच नाही. श्री. संत गाडगे बाबा तसल्याच जातीचे नि मातीचे चालु घडीचे महान क्रांतिकारक साधू आहेत. पण त्यांना कोणी साधू संत महाराज म्हटलेले खपत नाही. संता विषयी त्यांना अपरंपार आदर. संत कोणाला म्हणावे? यावर अनेक पूर्व संतांचेच दाखले देऊन ते प्रवचन करु लागले. कुठे ते ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, कबिरा सारखे मोठ मोठे संत आणि कुठे मी? कोणत्या झाडाचा पाला? ही कबुली त्याच्या प्रत्येक किर्तनात असते.

•◆●■ समाप्त ■●◆•

लेखक -
केशव सिताराम ठाकरे

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।