शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

● दि मॅनेजमेंट गुरू : चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण

● दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण

लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

• बळी राजा : एक काल्पनिक पात्र :

बळी राजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळी राजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्या बाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळी बाबत संदर्भ सापडतात. ते फक्त आणि फक्त पुराण कथेतच बाकी कोणतेही पुरावे नाहीत. 

बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती? याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो - "इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही. 

बळी राजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळी राजा हा शेतकरी राजा आहे, पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि - बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळी बाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासातील असेल तर तो बळी राजा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकच असू शकतो  कसे काय ते पाहण्यासाठी बळीच्या कथेचा सारांश घेऊया.

• कथा बळी राजाची :

अशा ह्या बळी राजाची कथा पुराणांमध्ये आलेली आहे. पुराणे म्हणजे गोष्टी रूप इतिहास आणि इतिहास स्वरूप गोष्टी. त्यातील खरे खोटे तपासता येणे अवघड. या कथा मौखिक परंपरेने चालत आलेल्या. कीर्तनात, चातुर्मासात, कथांत सांगितल्या जाणाऱ्या. ज्याने त्याने हव्या तशा रंगवाव्या. त्यामुळे सर्वच कथांचे वेगवेगळे पाठ मिळतात. मूळ पाठ अशी काही चीज अस्तित्वात नसतेच. त्यामुळे असे आणि असेच घडले असे कुणी पुराणांतील गोष्टीं बद्दल ठासून सांगू लागला तर तो मनुष्य अज्ञानी किंवा वाह्यात आहे असे पक्के समजावे. अशा लोकांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढल्याने हे शब्द वापरले. 

बळी राजाची गोष्ट वापरून ब्राह्मण द्वेष पसरविण्याऱ्यांचा हेतू काय असू शकतो याचा विचार करण्यास हरकत नाही. बळी राजा हा अत्यंत पराक्रमी होता हे त्याचे पहिले वैशिष्ट्य होते. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेघ यज्ञ म्हणजे सरळ सरळ लढाईचे आव्हान. त्यात तो जिंकत चालला. इतका की शंभराव्या यज्ञाची यशस्विता म्हणजे स्वर्गाचे राज्यही त्याला मिळणे. इंद्राने आता गादी सोडायची वेळ आली तेव्हा देव विष्णुकडे गेले व काही उपाय काढण्याची विनंती केली. सरळ लढाई शक्य नसल्याने विष्णुने बटु वामनाचे रूप घेतले व तो यज्ञ स्थानी गेला आणि त्याने दान मागितले.

दानशूरपणा हा बळी राजाचा मोठा गुण होता. त्याने जे मागाल ते देईन असे म्हटले. वामनाने तीन पावले भूमी मागितली. बळी राजाने होय म्हटले. वामनाने पहिल्या पावलाने स्वर्ग व दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. तेव्हा बळी राजाने आपल्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितला. वामनाने त्याप्रमाणे करून बळीला पाताळात गाडला. अशा दानाने संतुष्ट झालेल्या वामनाने मग बळी राजाला वर मागण्यास सांगितले. बळी राजाने वामनाचा कायमचा सहवास मागितला. तेव्हा पाताळाचा राजा झालेल्या बळी राजाचा द्वारपाल म्हणून आजन्म त्याच्या नजरे समोर राहण्याचे वामनाने मान्य केले. तसेच दिवाळीचा आजचा दिवस त्याच्या नावाने ओळखला जाईल असा वर ही दिला. या कथेचा असा अर्थ लावला की हा लढा शोषक आणि शोषित यांच्यातील अाहे व त्यात जो शेतकऱ्यांचा कैवारी असा गुणी बळी राजा होता त्याला ब्राह्मणांनी कपटाने देशोधडीला लावला, शेतकऱ्यांचे राज्य बळकावले. 

काही जण याचा अर्थ ब्राह्मण वामनाने शेतकरी बळीचा खून केला येथवर नेऊन ठेवतात. बळी राजाची गोष्ट फार जुनी आहे. त्या काळी वर्ण व्यवस्था प्रचलित होती. तो मोडून काढणारा असा बळीचा उल्लेख कुठे ही नाही. त्या काळी सामान्यपणे क्षत्रियाचे राज्य असे. ब्राह्मणाचे असल्यास तसा उल्लेख असतो. जसा रावण हा ब्राह्मण असून ही राजा होता. हे वेगळे म्हणून सांगावे लागते. दशरथ क्षत्रिय होता, हे सांगावे लागत नाही. 

तात्पर्य :
बळी हा एक क्षत्रिय राजा होता. बळी राजा यज्ञ करीत असे. वामन दान मागायला यज्ञ स्थळी गेला होता. थोडक्यात बळी राजा यज्ञ संस्थेचा पाईक होता. यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण लागतात. ते पुरोहित म्हणून यज मानाच्या नावे यज्ञ करतात. बळी राजाचे शंभर यज्ञ झाले म्हणजे ब्राह्मण व बळी राजा यांचे चांगलेच सख्य होते. बळी राजाने सर्व पृथ्वी आपल्या अंमला खाली आणली होती. याचा अर्थ त्याची ताकद विलक्षण होती व ती इतर साऱ्या राजांनी मान्य करून त्याचे मांडलिकत्व तरी स्वीकारले किंवा पराभव तरी स्वीकारला. प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी घडल्या असणार परंतु त्याचा तपशील उपलब्ध नाही व असला तरी फार महत्त्वाचा नाही. ज्यावेळी अशा गोष्टी म्हणजे आपले राज्य दुसऱ्याला देणे. त्यावेळी दहशत, भीती, रक्तपात ह्या गोष्टी अटळ असतात. कुणी ही आपली गोष्ट हौसेने वा विनाकारण दुसऱ्याच्या हाती देत नाही व दास्य पत्करत नाही. 

• दुसरी बाजू :

बळी राजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आज ही शेतकऱ्याला बळी राजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी दसऱ्याला आमच्या माता बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो!” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळी राजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य - वामन याने बळी राजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तर पाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भाल देव बसवतात. 

१५ दिवस सुतक पळून बळी राजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळी राजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळी राजाच्या मंत्रि मंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत. बळी राजाचे राज्य नऊ खंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळी राजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याच प्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. 

प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याच प्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळी राजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांची ही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन - परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.

बाहेरून आलेल्या परकीय आर्यभटाने कपटाने बळी राजाला ठार मारले व राज्य बळकावले. तेव्हापासून आपण सर्व दुःखात आहोत. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन (विष्णूचा अवतार) याने बळी राजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळी राजाला पाताळात गाडले, ही भाकड कथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग आदी आपल्या फायद्याचे आयोग हे आर्यभट आजही दडपून टाकत आहे. आज या बळी राजाचे रूप असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. या आर्यामुळे देशात जातीभेद, स्त्री - पुरुष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला बळी राजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेवून सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल.

• बळी राजा :

प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्‌गुणी, प्रजा हित दक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. पुराण कथेनुसार हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. हा प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. विरोचनाच्या देवी वा सुरूची या पत्नीपासून याचा जन्म झाला. त्याला विंध्यावली, अशना इत्यादी भार्या होत्या. त्याला अशना नावाच्या स्त्रीपासून बाणसुर हा पुत्र झाला (भागवत ६.१८). भागवतातच बाणाच्या आईचे नाव कोटरा असे आढळते (१०.६३). त्याला १०० पुत्र होते, अशी कथा असून त्याचे बाण, कुंभगर्त इत्यादी पुत्र प्रसिद्ध होते. शकुनी व पूतना या त्याच्या दोन मुली होत. बळीच्या नातीचा म्हणजेच बाणा सुराची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाच्या अनिरूद्ध नामक नातवाशी (प्रद्युग्नाच्या मुलाशी) झाला होता. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती. तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत.

बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. या संघर्षातून आर्य व अनार्य यांचा संघर्ष सूचित होतो. यथासांग नसलेल्या, विशेषतः दक्षिणे शिवाय केलेल्या कर्मांचे फळ बळीला मिळते, या संकेता वरून ही हा संघर्षच सूचित होतो. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली; तेव्हा ती परत मिळविण्यासाठी (वा अमृत मिळविण्यासाठी) देवांनी बळीच्या मदतीने समुद्र मंथन केले (भागवत ८.६; ८.८). त्यानंतर अमृतासाठी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला शुक्राचार्यांनी जिवंत केले. त्याने पुन्हा इंद्राला जिंकले आणि इंद्र पद मिळविले.

एकदा बढाई मारल्यामुळे प्रल्हाद त्याला राज्य नाशाचा शाप दिला; विष्णूला भूमीचे दान देऊ नकोस, असे शुक्राचार्यांनी सांगितले असताना ही त्याने त्यांचे ऐकले नाही, म्हणून शुक्राचार्यांनी ही त्याला असाच शाप दिला; त्याने एक विश्वजित याग व १०० अश्वमेध यज्ञ केले होते; त्याला सोडविण्यासाठी रावण पाताळात गेला असता, ते तुला जमणार नाही, असे म्हणून बळीने त्याला परत पाठविले; रावण त्याला जिंकण्यासाठी पाताळात गेला असता रावणाला अपमानित होऊन परत जावे लागले इत्यादी कथा आढळतात.

प्रल्हादाच्या उपदेशानुसार बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृति प्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभ दिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तां पैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. वामनाने याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्या नंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. त्या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचा ही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया - पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो. 

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात केरळ मध्ये ओणम् नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे, हे पासून तो आनंदाने परत जातो, अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पंडित सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्या कुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भू - शिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्‌मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषया वरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात. 

बळी हा बहुजनांचा राजा होता, असे विधान सर्रास केले जाते. मुळात वर्ण व्यवस्था ही कर्माधीष्ठीत होती. राजा हा राज्याचा पालक, शासक आणि संरक्षक या भूमिकेत असल्यामुळे तो कोणत्याही (अगदी रावणा सारखा जन्माने ब्राम्हण वर्णाचा असला तरीही) वर्णाचा असला तरी त्याला क्षत्रिय समजले जाई. जर बहुजन म्हणजे शूद्र हेच अभिप्रेत असेल, तर क्षत्रिय वर्णाचा राजा हा बहुजन समाजाचा कसा ठरू शकतो?अर्थात मराठा चळवळ चालविणारे नेते बहुजनांची व्याख्या ब्राम्हणेतर समाज अशी करतात. पण तार्किक दृष्ट्या हे तरी खरे कसे मानायचे? मध्य युगीन इतिहास नीट पाहिला तर ब्राम्हण समाजा इतकीच क्षत्रिय (मराठा) समाजाने ही शूद्र समाजावरील (दलित समाज) अन्यायात भागीदारी नोंदविली आहे. मुळात अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे. तो पाळणारे सगळेच दोषी इतकी परखड मांडणी सोयीची नसल्यामुळे मग इतिहास अर्धवट सांगून सत्य दडपले जाते. मग प्रश्न उरतो की बळी कोण होता?

बळी हा विरोचनाचा पुत्र, सुप्रसिद्ध विष्णू भक्त प्रल्हादाचा नातू आणि हिरण्य कश्यपू या असुर सम्राटाचा पणतू होता. इतकेच नव्हे तर पुढे महाभारत काळात बळी राजाचा मुलगा बाणासुर देखील दिसतो. असूर हा शब्द मूळ संस्कृत आहे. सूर (देव) या शब्दाचा विरुद्ध अर्थ असूर असा नव्हे तर असूर म्हणजे वीर्यवान किंवा प्राण शक्ती असणारा होय. वेदां मध्ये काही ठिकाणी देवराज इंद्राला देखील ‘असूर’ म्हणून गौरविले आहे. गंमत म्हणजे देव, असुर, नाग आणि मानव हे सर्वच कश्यप ऋषींचे पुत्र होते. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्मिती केल्यानंतर त्यांचे मानस पुत्र मरीचि ऋषींपासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाने दक्ष या प्रजापतीच्या (गौरीचा पिता आणि शंकराचा सासरा) १७ मुलींशी विवाह केला. ज्यातील अदिती या पत्नीपासून आदित्य. इंद्र आणि आपल्या लेखातील वामन या विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. दिती पासून दैत्य, दनु पासून दानव,अनिष्ठापासून गंधर्व, सुरसापासून राक्षस, मुनिपासून अप्सरा, विनता पासून गरुड आणि अरुण (सूर्याचा सारथी), कद्रूपासून नाग, याशिवाय काष्ठा, इला, क्रोधवशा,सुरभि, सरमा, ताम्रा, तिमि, पतंगी, यामिनी या इतर पत्नी होत. उर्वरित समस्त जीव सृष्टी यांच्यापासून निर्माण झाली असे उल्लेख वेद, पुराणे आणि ब्राम्हण्ये यांमध्ये मिळतात.थोडक्यात ही कथा सत्य मानली तर वरील सर्व वंश एकाच व्यक्तीपासून सुरू झाले असे मानावे लागेल आणि जर ही कथा मान्य नसेल तर मग त्यातील सोयीची व्युत्पत्ती घेऊन आपल्याला हवे ते कुतर्क देणे तरी थांबले पाहिजे. 

आता मूळ बळी राजाच्या कथेकडे वळू. बळी राजाचा वंश वृक्ष पाहिला तर त्याचे पणजोबा हिरण्य कश्यपू, आजोबा सुविख्यात विष्णू भक्त प्रल्हाद आणि वडील विरोचन हे होते. बळीराजाचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा सासरा होय. म्हणजे रामायणपूर्व काळ ते महाभारत युद्धोत्तर काळ एवढ्या प्रचंड दीर्घ कालावधीत बळीराजा किंवा त्याचा वंश डोकावतो. मग हा वंश कोणीतरी वेगळा, शोषित किंवा अन्याय ग्रस्त होता असे कसे मानायचे?

आता थेट बळी राजाचे चरित्र पाहू. भारतीय इतिहासातील अत्यंत न्याय प्रिय, प्रजा हित दक्ष, दानशूर, सत्य वचनी आणि पराक्रमी राजांमध्ये बळीची गणना होते. हिरण्य कश्यपू हा देखील अतिशय पराक्रमी सम्राट होता. तत्कालीन बहुतांश भारत देशावर त्याची सत्ता असली तरी तो अतिशय एककल्ली आणि संशयी होता. प्रल्हाद आख्यानातून त्याचा हा संशयीपणा विशेषत्वाने डोकावतो. एवढे असले तरी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना तिच्या सुरक्षेसाठी देवर्षी नारदाच्या आश्रमात हिरण्य कश्यपूच्या सांगण्या वरून राहात होती. याचाच अर्थ देव आणि असुर यांच्यातील वैर हे वांशिक नव्हे तर सत्तानुषांगिक असावे. पुढे हिरण्य कश्यपूने आपलाच पुत्र प्रल्हाद याच्यावर अनेक अत्याचार केले. अखेर विष्णूने नरसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा वध केला. यावेळी विष्णूने प्रल्हादाला वचन दिले की, यापुढे तुझ्या वंशातल्या कोणाचा ही मी वध करणार नाही. विरोचना बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र बळी आणि बाणासुर या दोघांनाही वामन आणि श्री कृष्णाने विष्णूच्या वचनाचा मान राखून जिवंत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी नातेसंबंध जोडले.

बळी राजाने आपल्या कार्य काळात तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले. एक अश्वमेध यज्ञ सुमारे वर्षभर चालणारा असतो. याचाच अर्थ बळीने दीर्घकाळ पृथ्वीवर राज्य केले. या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञाची दीक्षा घेतल्या नंतर एक अश्व सोडला जायचा. हा अश्व ज्या राज्यांत जाईल, त्यांनी एकतर यज्ञ करणाऱ्या सम्राटाचे मांडलिक व्हावे, अथवा त्याच्या सैन्याशी युद्ध करून त्यांना पराभूत करावे. तब्बल ९९ यज्ञ करणाऱ्या बळीराजाला त्या दरम्यान कोणी आव्हान देणारे होते, असे दिसत नाही. किंबहुना या काळात त्याचे देवांशी युद्ध झाल्याचीही नोंद नाही.

शंभरावा यज्ञ करताना मात्र बळीचा उद्देश स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित करणे हा होता. साहजिकच त्यामुळे देवांच्या गोटात चिंता पसरली. याचाच अर्थ तोपर्यंत देव आणि असुर या दोन्ही राज्यांत निकराची लढाई करणे दोन्ही पक्षांनी टाळले होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर शक्ती संतुलन करून आपापले प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश असावा. मात्र ९९ यज्ञ करून इतर असंख्य राजांना आपल्या कवेत घेणारा बळी राजा आता सामर्थ्यवान झाला होता आणि त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे देवांनी ब्रम्हदेव आणि पुढे विष्णूकडे धाव घेऊन हस्तक्षेपाची विनंती केली. विष्णूने आपल्या पूर्वीच्या वचनाचे स्मरण ठेवून आणि बळीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन या बटू रूपाने अवतार घेतला. नेमका हाच संदर्भ आपल्या सोयीने वापरला जातो. वामन हा ब्राम्हण होता असा कांगावा करून त्याने शेतकऱ्यांच्या राजाला मारले असे सांगतात. पण असुर काय किंवा देव काय सगळे याच कश्यपाचे वंशज होते. म्हणजे वामन हा यांच्या सोयीने नव्हे तर कर्माने ब्राम्हण होता. तसेच बळी राजा हा कर्माने क्षत्रिय होता. हे दोघे ही एकाच वंशात जन्माला आले होते. इतकेच नव्हे तर बळी राजाचा यज्ञ करणारे असुर कुलगुरु श्री शुक्राचार्य आणि इतर ऋत्विज हे ब्राम्हण नव्हते काय? मग आपल्याला अर्धवट इतिहास का सांगितला जातो?

पुढे वामनाने बळीच्या यज्ञ स्थानी येऊन बळीकडे दान मागितले. इतक्या तेजस्वी बटूला पाहून शुक्राचार्यांना तोच विष्णू असल्याचा संशय आला. त्यांनी तसे बळीला बोलून दाखवले. मात्र बळीने शुक्राचार्यांना सांगितले की, “प्रत्यक्ष भगवान विष्णू माझ्या द्वारी याचक म्हणून आले हाच माझा मोठा सन्मान आहे. मी त्यांना नकार देणार नाही.” वामनाने तीन पदे भूमी मागितली. जिचे दान बळीने देऊ नये म्हणून ब्राम्हण शुक्राचार्य बळीने उदक सोडण्यासाठी घेतलेल्या झारीत जाऊन बसले. वामनाने झारीच्या तोटीमध्ये दर्भ घालून शुक्राचार्यांना तेथून बाजूला केले आणि आपल्या हातावर उदक घेऊन बळीला आपले वाचन पाळण्यास सांगितले. म्हणजेच पुन्हा एकदा एक ब्राम्हण ऋषी बळीचे कथित अध:पतन टाळण्यासाठी झटला. मग आता कथित बहुजन नेते शुक्राचार्यांची पूजा करणार का? गंमत म्हणजे समस्त पृथ्वीचा सम्राट इतका सहजपणे एका ब्राम्हण बटूच्या कपटाला भूलेल, इतका भोळा असू शकेल का? किंबहुना त्याला समोर कोण आहे याची जाणीव होती, हे आपण सोयीस्करपणे कसे विसरू शकतो? आणखी एक बाब म्हणजे हा सगळा प्रसंग सुरू असताना यज्ञ मंडपात केवळ वामन, शुक्राचार्य आणि बळी एवढेच नसणार. इतर राजे, सरदार आणि अन्य मंडळी तिकडे असलीच पाहिजेत. त्यांनी बळीला आपल्या संकल्पापासून परावृत्त का केले नाही? की सगळे क्षत्रिय आणि बहुजन मिळून वामनाला सामील झाले आणि त्यांनी बळी सारख्या महान राजाचा काटा काढला, असे मानायचे? 

पुढे वामनाने भव्य रूप धारण करून पहिल्या पावलाने समस्त पृथ्वी, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि इतर लोक पादाक्रांत केले. बळीचे राज्य इतके प्रचंड असताना वामनाने निमिषार्धात हे कसे काय केले? एकतर ही खरोखरच आपल्या बुद्धीला न उमजलेली दिव्य लीला असावी किंवा बळीच्या राज्यातले त्याचे उर्वरित विरोधक वामनाला मदत करीत असावेत. एवढे होऊन मग वामन बळीला जिवंत का सोडतो? पाताळाचे राज्य कसे देतो? तत्कालीन प्रथे प्रमाणे अशा व्यक्तीला त्याने ठार मारणे भविष्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक नव्हते काय? विशेषत: सर्व परिस्थिती अनुकूल असताना वामनाने तसेच करणे अपेक्षित होते. आधुनिक भाषेत सांगायचे तर क्रांतीला कारण ठरू शकणाऱ्या नेत्याचा शक्य तितक्या लवकर काटा काढला जातो.

आमचे बहुजनवादी नेते नेमके हेच तर सांगू पाहतात. वामनाने बळीला राज्य वगैरे काहीही दिले नाही. त्याला कपट करून मारले. पण संपूर्ण आख्यानात तसा संदर्भ डोकावत नाही. उलट वामनाने बळीच्या औदार्यावर खूष होऊन देवांचा विरोध असताना देखील त्याला पाताळाचे राज्य दिल्याची नोंद मूळ कथेत आहे. पुन्हा सप्त पाताळांचे राज्य हे स्वर्गा पेक्षा ही ऐश्वर्य संपन्न असल्याची नोंद अनेक पुराणे आणि भागवता सारख्या ग्रंथात अतिशय ठळकपणे आहे. इतकेच नव्हे तर वामनाने बळीला स्वत:हून दिलेल्या वरदाना नुसार या पुढील इंद्र पद बळीलाच त्याच्या पुण्य प्रभावामुळे व न्याय प्रियतेमुळे दिले. या वचनाची पूर्तता होई पर्यंत वामनाने बळीच्या द्वारी थांबावे, असा ही करार झाला. विरोधक म्हणतील कशा वरून हे वरदान बळीने मागितले असेल? बळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा वरून वामनानेच हे कारस्थान रचले नसेल? याच्या अगदी उलट तर्काने विचार केला तर कशा वरून बळीने वामना कडून स्वत:ला देवांपासून सुरक्षित केले नसेल?

द्वारपाल हा रक्षक असतो. नेमक्या त्याच पदी वामनाची नियुक्ती कशी? प्रधान, कुलगुरू, सेनापती किंवा तत्सम पदांवर वामन आपली वर्णी लावू शकला नसता काय? बळीचा काटा काढण्यासाठी ही पदे जास्त उपयोगी ठरली असती. थोडक्यात आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. शिवाय वामनाने मारलेल्या असुराला ब्राम्हणांनी चिरंजीव पद कसे द्यावे? तो युगानुयुगे जिवंत आहे, हे कसे मानावे?

रामायणाच्या काही कथांत याचे तुटक संदर्भ मिळतात. जेव्हा राम - रावण युद्धात रावणाची प्रचंड हानी झाली, इंद्रजीत या त्याच्या बलशाली मुलाचा पाडाव झाला, तेव्हा आता मदत कोणाकडे मागायची याचा विचार रावण करू लागला. अहंकारी स्वभावाच्या रावणाने आपल्या पेक्षा कनिष्ठ राजांकडे मदत मागण्याच्या पर्यायाचा विचार न करता असुर कुळातील सर्वात महान सम्राट बळीची मदत मागायचे ठरविले. तसा तो पाताळ नगरीत पोहोचला देखील. बळीच्या महालाच्या द्वारावर उभा असलेल्या वामनाने रावणाला रोखून बळीला भेटण्याचे कारण विचारले. रावणाला विष्णूशी या विषयी बोलायचे नसल्यामुळे त्याने सूक्ष्म रूप धारण करून वामनाला चकवायचा प्रयत्न केला. 

मात्र वामनाने रावणाच्या शरीरावर सहज आपला पायाचा अंगठा ठेवून त्याला अक्षरश: जेरीस आणला. पुढे त्यातून सुटका झाल्यावर रावण बळीसमोर आला. त्यावेळी बळी आपल्या दरबारात एकटाच बसून काही विचार करीत होता. रावणाला अचानक कोणत्याही वर्दी शिवाय आत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वामनाने तुला आत कसे सोडले, असे बळीने रावणाला विचारले. त्यावर रावणाने फुशारकी मारून मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हटल्यावर बळीने वामन हा प्रत्यक्ष भगवान विष्णू असून, त्याचा कृपेशिवाय तू जिवंत देखील राहू शकणार नाहीस, असे सुनावले. पुढे रावणाने रामाशी सुरू असलेल्या युद्धाची माहिती सांगून बळीकडे मदत मागितली. त्यावर काही वेळ समाधी लावून बळीने युद्धाचे खरे कारण जाणून घेतले व रावणाला सल्ला दिला की त्याने सीतेला तिच्या स्वगृही पाठवल्यास हे युद्धच संपुष्टात येईल. तसेच परस्रीचे हरण करणे असुर कुळाला शोभणारे नसून राम न्याय बुद्धीचा असल्याचे बळीने रावणाला समजावले. मात्र रावणाला ते पटले नाही, तो बळीची मदत न मिळवताच लंकेला परतला.

जर आपण विष्णूच्या अवतारांचा क्रम पाहिला तर प्रथम वामन, मग परशुराम,त्यानंतर राम आणि पुढे कृष्ण असे दिसते. वामन आणि बळी हे राम अवतारापर्यंत अस्तित्वात होतेच. याशिवाय रावणाने मदत मागावी, इतकी सत्ता आणि ताकद त्याकाळी देखील बळीकडे होती. इतकेच नव्हे तर परशुरामाने तब्बल २१ वेळा पृथ्वी नि: क्षत्रिय करताना ज्या अन्यायी आणि दुष्ट राजांचा संहार केला त्यात बळीचा कदापि ही उल्लेख नाही. थोडक्यात बळीच्या अस्तित्वाचे प्रमाण २ स्वतंत्र युगातील पौराणिक कथांत सापडते. त्याच्या न्याय प्रियतेबद्दल, दानशूर आणि पराक्रमी स्वभावा बद्दल कोणतेही प्राण अथवा प्राचीन ग्रंथ अनुद्गार काढत नाहीत. असे का?ब्राम्हणांना जर खरोखरीच बळीला संपवायचे असते, तर त्यांनी त्यांच्या साहित्यातूनच त्याची हकाल पट्टी केली नसती का?

पुढे महाभारतात (वस्तुत: भागवत ग्रंथात) अनिरुद्ध आणि उषेच्या विवाहाचे आख्यान आहे. अनिरुद्ध हा श्री कृष्णाचा रुख्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्न या मुलाचा पुत्र म्हणजे नातू होता. तर बाणासुर हा बळीच्या १०० पुत्रांपैकी सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा संपादित केली होती. त्यातून त्याला सहस्र बाहू आणि अपार शक्ती प्राप्त झाली होती. भगवान शंकराचा तो जणू मानस पुत्र होता. त्याची कन्या उषेने अनिरुद्धला तिच्या स्वप्नात पाहिले आणि तिने तिच्या चित्रकला या सखी करवी अनिरुद्धला आपल्या शोणितपूर नगरीत (हे नगर आणि मंदिर अद्याप आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात पाहता येते.) आणवले. पुढे अनिरुद्ध आणि उषा यांनी गंधर्वविवाह करून त्याची वार्ता बाणा सुराला दिली. ज्यामुळे खवळलेल्या बाणासुराने युद्धात अनिरुद्धाचा पराभव करून त्याला नाग्पाशात बद्ध करून ठेवले. ही बातमी नारदा करवी कृष्ण - बलराम आणि इतर यादवांना कळताच त्यांनी शोणितपूर गाठून बाणा सुराला आव्हान दिले. पुढे झालेल्या घनघोर युद्धात बाणा सुराचे अतोनात नुकसान झाले. त्याचे एक सहस्र बाहू देखील कृष्णाने तोडून टाकले, पण त्याचा वध केला नाही. अखेरीस बाणा सुराने कळवळून केलेल्या धाव्यामुळे स्वत: महादेव कृष्णाविरुद्ध युद्धास सज्ज झाले. तेव्हा ब्रह्म देवांनी हस्तक्षेप करून हरिहरांमध्ये होऊ घातलेले युद्ध टाळले. कृष्णाने शंकराला आठवण करून दिली की मी प्रल्हादाच्या वंशातील व बळीच्या पुत्रांस मारणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच तुम्हीच बाणा सुराला त्याचे गर्वहरण होईल, असा शाप दिला होतात. त्यानुसार मी हे कार्य केले. शंकरांनी सुद्धा हे मान्य करून बाणा सुरास कृष्णाच्या खऱ्या रुपाची कल्पना देऊन त्यांस शरण जाण्यास सांगितले. पुढे बाणा सुराने स्वत: अनिरुद्ध आणि उषेचे थाटामाटात लग्न लावून कृष्णाशी देखील आपला आप्त संबंध दृढ केला.

थोडक्यात विष्णू (मग तो देव असो किंवा सृष्टी कल्याण साधणाऱ्या युग पुरुषांचा वंश अथवा उपनाम) आणि असुर यांचे काहीही वाकडे नव्हते. प्रसंगी विष्णू आणि महादेव या दोन प्रमुख दैवतांनी असुरांचे रक्षणच केले आहे. समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी कदाचित वामनाने देव - बळी यांच्यातील वाद विकोपाला जाण्या पूर्वीच हस्तक्षेप केला असेल. पण कोणत्याही पौराणिक कथा मधून बळीची दुष्ट प्रतिमा रंगवली गेली नाही अगर हे सत्य लपवले गेले नाही. किंबहुना आधुनिक अभ्यासक तर आत्ताचे तिबेट (त्रिविष्टप) हा स्वर्ग असावा, भरतखंड (इराणच्या पूर्वेपासून ते आत्ताच्या इंडोनेशिया पर्यंत प्राचीन अखंड भारत) हे पृथ्वी आणि आत्ताचे दक्षिण अमेरिका हे पाताळ असावे, असा सिद्धांत मांडला आहे. 

महान असुर संस्कृती, त्यांची सभ्यता, भव्य वास्तू, शिव, विष्णू आणि गणपती या दैवतांची मंदिरे, हत्ती व सिंहासारख्या केवळ भारत व आफ्रिकेत आढळणाऱ्या प्राण्यांचे या ठिकाणी असलेले महत्व, प्राचीन मुद्रांवर अंकित असलेल्या बळी, वामन, बुद्ध आणि कृष्णाच्या प्रतिमा व तेलुगू भाषेशी साधर्म्य असलेली लिपी आणि उच्चार हे दक्षिण अमेरिकेतील आदिवासी समाजात आजही अनुभवता येते. हिरण्य कश्यपूची राजधानी ही सध्याच्या आंध्र प्रदेशात होती, असेही अभ्यासक मानतात, हे येथे नमूद केले पाहिजे. बहुजन आणि सवर्ण हा आत्ताच्या काळात नामशेष होऊ पाहणारा संघर्ष पुन्हा पेटवण्यासाठी काही समाज द्रोही बळी राजा आणि तत्सम महान विभूतींना देखील बदनाम करू पाहात आहेत. द्रविड अस्मितेच्या भोंगळ संकल्पनेने आज दक्षिण भारतात उभी केलेली सामाजिक आणि राजकीय दरी देशाला कोठे घेऊन जाणार हे आपण बघतोच आहोत.

तेव्हा फुले - आंबेडकरांच्या चिकित्सक महाराष्ट्राने तरी कोणाच्या मागे जायचे हे ठरवायची वेळ आली आहे.आता प्रश्न उरतो की, हा शेतकरी समाजाला आपलासा वाटणारा बळी राजा कोण असावा? त्याचेही उत्तर आपल्या प्राचीन इतिहासात दडलेले आहे. शेष नागाचा द्वापार युगातील अवतार, संकर्षण या नावाने प्रसिद्ध तो कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता बलराम हाच खरा बळी राजा. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्याने आपल्या नांगराने यमुनेचे पाणी ओढून नेले (कालवे बांधले), जो गोपालां मध्ये लहानाचा मोठा झाला संस्कृतातील बल रामचा भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रेमाने त्याला बळी राजा म्हणायला सुरुवात केली असावी आणि पुढे हा आणि तो बळी राजा यांच्यात गल्लत झाली (किंवा केली) असावी. याउलट बळी राजाचे आहे. कोणत्याही पुराणात किंवा कथानकात बळी राजा शेती करतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमके करतो किंवा नांगर आणि अन्य आयुधे धारण करतो, असे दाखविलेले नाही. याउलट बल राम हा उग्रसेन व वसुदेवानंतर (श्रीकृष्ण आणि बल रामाचे पिता) द्वारकेचा राजा होता. यादवांचे गणराज्य होते. ते आपला राजा किंवा नेता प्रतिनिधी सभेतून निवडत असत. विशेष म्हणजे तत्कालीन संपूर्ण भारताच्या राज कारण व समाज कारणाचे केंद्र असलेला कृष्ण हा कधीच राजा झाला नाही. त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम हाच राज पदावर बसला होता. त्यामुळे बल राम हा शेतकरी व पशुपालक अशा यादव समाजाचा नेता या अर्थाने पुढे बळी राजा म्हणून मान्यता पावला असावा. थोडक्यात वामन कालीन बळी राजा हा सुद्धा एक वैदिक राजा आणि क्षत्रिय वर्णाचा होता. असुर हे देखील अंतिमत: देवांचे सहोदरच आहेत.

मित्रानो,
हि सारी लेखांची उदाहरणे देण्या मागचा हेतू लक्षात घ्या.  लोकांनी आपल्या आपल्या आपल्या पद्धतीने लिहले  आहे. बळी राजाचे अस्तित्व एक हि सिद्ध करू शकत नाही, हे सर्वात मोठे वास्तव आहे. बळी राजाचा एकूण कथा पाहून असे वाटते कि, हे पात्र मनोरंजक आहे. विशेष म्हणजे तो न्याय प्रिय प्रजा दक्ष वैगरे वैगरे विशेषणे हि केवळ कथेत ठीक वाटतात. म्हणजे एखाद्या काल्पनिक कथा कल्पना विस्तार करीत लिहणे यापलीकडे कथेत सत्यता सापडत नाही. बळी राजा बाबत असेच पाहायला मिळते.

एकूण बळी राजाचा भूगोल शोधणे कठीण शिवाय ते लिखित आधारावर नाहीच पुराण कथा सोडल्यास इतर कोणत्या साहित्यात हि, पुरावे नाहीत. आता गम्मत अशी कि - बळीराजा नेमका कोणत्या देशाचा राजा होता? आणि त्याने संघर्ष कोणा सोबत केला? हे सापडणे कठीण होऊन बसले आहे. वरील अनेक कथेत लेखात बळी विषयी चांगले आहेत शिवाय "प्रबोधन स्पिक" या ब्लॉग मध्ये चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुळात भारतीय ऐतिहासिक राजांची नाणी असतात त्याच प्रमाणे, बळी राजाचे कोणते नाणी वैगरे सापडत नाहीत किंवा तसा उल्लेख हि नाही. शिवाय, बळी राजाचे अर्थ व्यवस्थे बाबत काहीच माहिती मिळत नाही, असे का?  झाले असेल याचा विचार करता पौराणिक पात्रांची अशीच अवस्था आहे. एकूणच सर्व पौराणिक पुराणातील पात्र अशीच अस्तित्व हीन आहेत.

आता बली बाबत पाहूया. ब्राह्मण आपल्या शत्रूचा एवढा महात्म कसे काय सांगू लागतात, यामागे काय कारण असू शकते? एकीकडे बहुजनवादी ब्राह्मण द्वेषासाठी बळीचा वापर करीत असताना ह्या कथा वाचून खरेच हे लोक किती विसंगती निर्माण करतात याची जाणीव होईल. एकूणच बळीची कथा हि पौराणिक कथा असून वेगवेगळ्या कथा आपणास पाहायला मिळतात. तुम्ही आम्ही सुज्ञ वाचकांनी, अभ्यासकांनी कशा प्रकारे स्वीकारायची ते आपणावर आहे. बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता हे ब्राह्मणांनीच लोकांमध्ये पसरवले आहे. विशेष म्हणजे आज जे लोक म्हणतात ना "ईडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या मागचा हेतू काय हे सांगण्याची गरज नाही.

बळी सारखा राजा ब्राह्मणांचा किती आज्ञा धारक आहे, हे पाहण्यासाठी त्याचे १०० अश्वमेध केले आहेत. एक अश्वमेध कमीत कमी एक वर्षभर चालतो. म्हणजे १०० वर्षे बळी राजा केवळ अश्वमेधच करीत होता. मला सांगा त्याने जनतेच्या हिताचे काम केलंच कधी? काय पुरावे सापडतात का? कथेत हि बळी राजा कर्तव्य दक्ष नसल्याचे उदाहरणे दिसतात. शिवाय बळी राजा च्या काळात जनता सुखी होती असे म्हणायला बळी राजाचे कोणते कार्य होते हे दिसत नाही. बळीने केवळ आणि केवळ अश्वमेध यज्ञ ते हि १०० अश्वमेध यज्ञ मित्रानो कसा केला जातो. याची माहिती घेतल्यावर कळेल तुम्हाला काय असतो ते अश्वमेध चला थोडा सारांश आपण हि पाहू.

महाभारतांत आश्वमेघिक पर्वांत धर्मराजानें केलेल्या अश्वमेघांत पुढील विधि विषयक गोष्टींचा उल्लेख येतो. चैत्री पौर्णिमेस संकल्प करून अश्व सोडणें व त्याचवेळीं दीक्षा ग्रहण करणे. माघी पौर्णिमेस अर्जुन अश्वासह परत येतो. सद, आग्नी ध्रीया, पत्‍नी शाला इत्यादि यज्ञ मंडपांतील पोट भाग तयार करणे. यज्ञांतील ‘स्फ्य’ नामक उपकरण सुवर्णाचें प्रवर्ग्य व सोभा भिषव (सोम कुटणें) यांचा उल्लेख, यूपास वस्त्र गुंडाळणें, शोभेसाठीं सुवर्णाचे (जरूरी पेक्षां) जास्त यूप पुरणें, अश्वा बरोबर इतर पशूंचे उपाकरण करणें, श्येन चिती करणें, त्यांतील इष्टका (विटा) सुवर्णाच्या असणें; मृत अश्वा जवळ राज पत्‍नीनें शयन करणें, अश्वाची वपा काढून हवन करणें, अश्व मासांचे सर्व (१६) ॠत्विजांनीं अग्नीत हवन करणें. यांतील बहुतेक गोष्टी सूत्रांतील विधीशीं जुळण्या सारख्या आहेत. सुवर्णाचा स्फ्य; सुवर्णाच्या इष्टका; अश्वमासाचें सर्व ॠत्विजांनीं हवन करणें. या गोष्टी सूत्रोक्त श्रौत धर्माविरुद्ध आहेत. वाल्मिकी रामायणांत दशरथ राजानें पुत्र प्राप्तीसाठीं अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. (१.१३) त्यांतील विधी विषयक गोष्टी भारतांत उल्लेखिलेल्या प्रमाणेंच असून सुत्रोक्त श्रौत धर्माशीं जुळणार्‍या कांहीं जास्त गोष्टीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ : सुत्या (सोमाचें हवन) तीन दिवस करणें. पहिल्या दिवशीं ज्योतिष्टोम दुसर्‍या दिवशीं उक्थ्य व तिसर्‍या दिवशी अतिरात्र या ॠतूंचे अनुष्ठान करणें, राज महिषीचें मृत अश्वासमीप शयन. राज महिषींचा सूत्रोक्त नांवानें उल्लेख इत्यादि.

थोडक्यात आपण पहिले कि - अश्वमेध यज्ञात काय केले जाते यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे बळी खरेच जनतेचा राजा होता  का यावर नजर  टाकावी म्हणून खास करुन हे सांगतॊ आहे कि बळीने १०० अश्वमेध यज्ञ केलेत व १०० वेळा आपल्या राज पत्नीला  प्रत्येक अश्वा सोबत संभोग करण्यास भाग पाडले आहे, आता मला सांगा इथे बळी चारित्र्यवान राजा शोभतो का काळजात ठेवावा म्हणून काही जण म्हणतात काय काळजात ठेवणार अश्या राजाला ज्याचे वर्तन केवळ सत्ता हासील करणे इतकेच होते. बळीचा शेवट हि विचित्र आहे. वामन त्याला पाताळात गाडतो आणि सप्त पाताळाचे राज्य देऊ करतो व स्वतः तो त्याचा द्वारपाल म्हणून राहतो यांचे एकमेका विषयीचे शस्त्रूत्व होते कि मित्रत्व होते, हे सांगण्याची गरज नाही. एकूणच बळी राजा हे काल्पनिक पात्र आहे. शिवाय हे एक मोठे षडयंत्र आहे ते सम्राट अशोकाच्या विरोधात उभे केलेलं पात्र आहे  सम्राट अशोक हा जनतेची  काळजी घेणारा एकमेव सम्राट आहे. सम्राटा विषयी जाणून घेऊया.

सम्राट अशोक एकमेव सम्राट ज्याचे आपल्या राज्यातील लहान थोरापासून सर्व जनतेवर लक्ष होते. आपल्या राज्यातील जनता कशा पद्धतीने जीवन जगते कोणते आचरण करते. कोणत्या वाईट वृत्तीचा स्वीकार तर करीत नाहीत न एवढ्या अचूक पणे जनतेचे निरक्षण करून त्यांना आचरण सुद्ध करण्यासाठी अशोकाने गावोगावी ''महापात्रो'' ची नियुक्ती केली होती जगतात एकमेव असा सम्राट आहे, एकमेव असा राजा आहे. ज्याचे लक्स्खा सामन्यातील सामान्य माणसाकडे देखील आहे आणि नुसते नियुक्ती करून थांबलेला नाही अशोक तर अशोकाने महापात्रो म्हणून ज्यांची नियुक्ती केलीय ते व्यवस्थित काम करतात किंवा नाही शिवाय आज आपण ग्राम सेवक सरपंच ह्या पदे गावी पाहतो. ती आताची नसून अशोकाने इसवी सना पुर्वीच आपल्या राज्यात निर्माण केलेली आहेत. त्या पदाला अशोकाच्या व्यवस्थापनात ''रज्जूक" असे म्हटले आहे. अशोकाचे व्यवस्थापन आजच्या घडीला असणाऱ्या देशाच्या व्यवस्थापने सारखे आहे. प्रथम राजा, त्यानंतर त्याच्या खाली त्याला सहकार्य करणारी केंद्रीय अधिकारी वर्ग, राज्य अधिकारी वर्ग, जिल्हा अधिकारी वर्ग तालुका अधिकारी वर्ग व ग्राम अधिकारी वर्ग देखील आपणाला पाहायला मिळतो . एकूण भारतीय संविधानातील सारीच पदे हि अशोकाच्या साम्राज्यात या आधीच असल्याची माहिती मिळते. यामध्ये जिल्हाधिकारी यासारख्या पदाला ''समाहर्ता'' म्हटले जायचे आणि आज हि बिहार मध्ये आज हि कलेक्टरला ''समाहर्ता" म्हणतात. शिवाय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी छोटे - मोठे मदतनीस आहेत. व हे सारे अधिकारी काम करतात कि नाही यासाठी अशोकाची असणारी गुप्तचर यंत्रणा कोण होती? हे आज हि इतिहासाला माहिती नाही परंतु अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सम्राट अशोकाने काही विशेष माणसांची यंत्रणा ठेवली होती. त्याच्या नुसार प्रत्येक ठिकाणच्या अधिकार्याची व जनतेची इतम्भूत माहिती अशोकला मिळत असे. एवढेच काय अशोकाच्या जनते मध्ये देखील कोणते वादाचे प्रकार निर्माण होत असतील तर त्याची माहिती देखील अशोकला मिळत असे. एखादी घटना घडण्या आधी तिचे निवारण करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक म्हणूनच इतिहासात पाहावा लागतो. 

जनतेचे आचरण सुधारावे म्हणून महापात्रो चे काम चोख व्हावे म्हणून देखरेख करणारा राजा म्हणून सम्राट अशोकच आपल्याला दिसतो. सम्राट अशोकाने धम्मचारण लोकांचे होते कि नाही यापासून ते आपल्या राज्यातील जनतेला पोटभर अन्न मिळते कि नाही इतपत नजर ठेवणारा राजा सम्राट अशोक आहे. आपल्या राज्यात बेरोजगार कोणी असू नये म्हणून नव नव्या व्यवसायांची निर्मिती करणारा सम्राट अशोक क्वचितच लोकांना माहिती आहे. सम्राट अशोकाने सामान्य जनतेला आपली संतान म्हणून स्वीकारले. जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे व समस्त राजेशाही लोकांना संदेश दिला कि तुम्ही जनतेचे पालक व्हावे मालक नाही अशोका बाबत अनेक गैरसमज पसरवले गेलेत पण आपण योग्य त्याच मुद्द्यांची चर्चा केलेली चांगली असते.

सम्राट अशोकाने व्यवस्थापकीय कौशल्य हे कमालीचे होते हे सांगण्याची गरज नाही. अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला व नुसता स्वीकारला नाही तर आपल्या जनतेला हि तो आचरण्यात आणून लोकांचे आचरण सुधरवले लोकांना कोणती हि कमतरता येवू दिली नाही अशोक या जगातील पहिला असा सम्राट आहे. ज्याने शेती मध्ये हि आर्थिक महासत्ता होता येते, हे या जगाला दाखवून दिले आहे. अशोकाची अर्थ व्यवस्था शेतीवर आधारित असून शेतीच्या मालाचे विदेशात व्यापाराच्या सहाय्याने विक्री करून नफा मिळवून देण्याचे काम हे अशोकाने केलेलं आहे. 

एकूण हा शेतकरी सम्राट लोकांना कळला नाही, असेच म्हणावे लागेल. आज हे सांगण्याची वेळ येतेय कारण तुम्हाला ते कळले नाही शेती कशी करायची कोणती पिके चांगली येवू शकतात. यासाठी नियोजन बद्ध काम करण्याची पद्धत सम्राट अशोकाने या भारताला घालून दिली आहे. शेतीची बरीच उत्पादने त्या काळात जगात विक्री साठी पाठवली जात असत अशोकाने आपल्या जनतेला उद्योजक बनवले आहे. अगदी सामान्य माणूस देखील स्वतःच्या पावलावर उभा राहत होता. इतकेच अशोकाने सामान्य जनतेची कोणती हि अडचण असली तरी तिची पूर्तता करीत असे. एखादी अधिकारी देखील चुकीचे वागणार नाही, यासाठी काळजी घेणारा राजा सम्राट अशोक म्हणूनच आपल्याला इतिहासात पहावा लागतो.

सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे. त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता, म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते. जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे. त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राज धर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले. तसेच भारताच्या  काना कोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिला लेख अभिलेख लघु लेख, गुहा लेख, स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते, हे श्रेय अशोकालाच द्यावे लागते. अन्यथा भारताचा इतिहास हा अंधारातच पडला असता त्याच्या कर्तृत्वाने भारतीय इतिहास हा एकदम प्रकाशमान झालेला आहे आणि हे कोणी नाकारू शकत  नाही.

सम्राट अशोक हा राजा होण्या आधी तो तक्षशिला व उज्जयिनी च राज प्रतिनिधी म्हणून कारभार पाहत होता. बिंदूसार याच्या मृत्यू नंतर चार वर्षांनी अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे. अशोक हा ही महत्वकांक्षी राजा होता आणि अशोक नेहमी प्रजा हित दक्ष म्हणून जनतेच्या मनात कायम राहिला होता. अशोकाला कलिंग राज्य आपल्या राज्यात असावे.  कारण अशोकाच्या पूर्वजांनी अनेक प्रयत्न करून कलिंग आज वर जिंकता आले नव्हते आणि ही सल अशोकाच्या ही मनात कायम राहिली होती. त्याला कलिंग हवे होते, त्यावेळी कलिंग च राजा ब्रह्मदत्त आता भारताच्या ओरिसा प्रांतात दक्षिणेस कलिंग राज्य होते. या राजाची बौद्ध धम्मावर खूप आस्था होती, त्याने बौद्ध धम्मास राजश्रय दिला होता. त्याची राजधानी दंत्तपूर आहे. या शहराला नाव पडले ते कलिंगच्या लोकांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाण झाल्यावर बुद्धाचा एक दात मिळवून त्यावर स्तूप बांधला होता. म्हणून त्या ठिकाणाला हे नाव पडले होते व सारे लोक बुद्धाला मानणारे असल्याने आज वर त्यांच्या एकीमुळे कोणत्याच राजाला कलिंग जिंकता आले नाही. अशोकाने आपल्या पूर्वजांनी अपुरे ठेवलेले भारत दिग्विजयचे कार्य पूर्ण करावे, म्हणून इसवी सण पूर्व २६१ मध्ये कलिंगवर स्वारी केली.

मित्रानो,
अशोकाच्या आयुष्यातील रण मैदानातील पहिली लढाई आणि शेवटची लढाई ठरली. कलिंग राज्याच्या सैन्याचा पाडाव होत असलेले पाहून सामान्य जनतेने ही हातात शस्त्र घेऊन लढाईला उतरले व सामान्य जनतेला रण मैदानात पाहून अशोकाचे मन युद्ध करण्यापासून दूर झाले या युद्धात अनेक जीवांचा बळी गेला होता. अशोकाला ते आपल्याच लोकांचा गेलेला बळी पाहून खूप दुःख झाले. त्याने विजय मिळवल्या वर तलवार म्यान केली, परंतु या युद्धाचे परिणाम असे झालो की लाखो लोक मारले गेलं होते. त्या परिसरात रोगराई पसरली साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षेमुळे अनेक जीव मारले गेले, हे पाहून सम्राट व्यथित झाला आहे आधीच। त्याच्या घरी देखील बुद्ध धम्माचा प्रभाव होता. त्यात त्याचा चुलत भाऊ उपगुप्त हा  भिक्षु बनला होता. उपगुप्ताने सम्राटाला बुद्धाच्या शिकवणीची सार समजावून सांगितले अशोक याने तेव्हा विचार केला की माणसे मारण्या पेक्षा माणसे जगवली पाहिजेत आणि अशोकाने पुढे आपला राज्य कारभार नव्या पद्धतीने सुरू केला जगाला नवे मॅनेजमेन्ट दाखवले. 

अशोकाने बुद्धाच्या जन्म स्थळाला भेट दिली. सारनाथ इथे भेट दिली व नंतर अशोकाने धम्म प्रसार करण्याचा निश्चय केला एक सुराज्य निर्माण केले गेले. अशोक हा केवळ धम्म प्रसारक होता, इतकेच आजवर लोकांसमोर अशोक घेऊन आले इतिहासकार सम्राट अशोक याने आपल्या राज्यात रयतेच्या हितासाठी केलेलं कार्य आत्याधुनिक सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून इतिहासात नोंद घ्यावी, असा एकमेव सम्राट म्हणून अशोक याला गणले जाते. जगातील पहिला सम्राट आहे. ज्याच्या कालावधी मध्ये निसर्गाला ही दुष्काळ ग्रस्त स्थिती निर्माण करता आली नाही. एवढे सामर्थ्य असणारा राजा म्हणून आम्हाला अशोक कधीच सांगितलं नाही. आज दुष्काळ का पडतो यासाठी सम्राट अशोकाचे मॅनेजमेन्ट पाहावे लागेल. 

आम्ही म्हणतो पाणी नाही, सुखा दुष्काळ पडतो, पाऊस जास्त पडला ओला दुष्काळ पडतो. अशोकाच्या राज्यात निसर्गाचे ही मॅनेजमेन्ट करणारा जागतिक पहिला सम्राट आहे, याची आम्हाला माहितीच नाही. अशोकाने पाऊस जास्त पडला तर कोणत्या ही भागातील पीक वाहून जाऊ नये, म्हणून शेतीचे मॅनेजमेन्ट केले आहे. शेतीची पिके अश्या असणाऱ्या  भागात पावसाचे पाणी साठणार नाही किंवा पिके वाहून जाणार नाहीत. यासाठी विशिष्ट पाण्याची नहर तयार केले होते. शहरणाची रचना कशी असावी, हे त्यांचा आराखडा अशोकाने तयार करून घडवलेली शहरे आज आपण पाहू शकतो. आज जी शहरे सुशोभित पाहायला मिळतात. त्यांची रचनाकार का सम्राट अशोक आहे. आज भारतीय शहर रचनेला सौंदर्य दृष्टी नाही. अनेक चिनी प्रवाशांनी अशोकाच्या साम्राज्याचे वर्णन केले आहे, त्यात शहरांचे सुशोभीकरण व  त्यांची रचनाकृती मांडली आहे.

अशोकाने आपल्या जनतेला अद्यवत सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. घर तिथे पाण्याची सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून अशोकाला प्रथम स्थान दिले पाहिजे. आज आम्ही नळ योजना राबवतो अशोकाच्या राज्यात घराघरात पाण्याची सोय उपलबध  केली होती. पाण्याचे मॅनेजमेन्ट करणारा राजा म्हणून ही सम्राट अशोकाला स्थान आहे. अशोकाने शेतीला उद्योग जगतात, अनन्य महत्वाचे स्थान निर्माण करून दिले. म्हणून भारत हा शेती प्रधान देश आहे, असे आज आम्ही म्हणतो. अशोकाने शेतकऱ्यांच्या बाजार पेठा निर्माण केल्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला. शेतकरी हाच शेत मालाचा व्यापारी होता. जगातील पहिला सम्राट आहे, ज्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवले आणि याचे पुरावे पाहिजे असतील तर भारतात लेणी कोरण्यासाठी व्यापारी लोकांसोबत शेतकरी लोकांची ही नावे आहेत. शेतकऱ्याला अशोकाने जागतिक बाजार पेठेत नेऊन ठेवले. आज आमचे शेतकरी नेते व जनता ही शेतकरी आत्महत्या करतो, म्हणून रडत बसली आहे. त्यांनी सम्राट अशोक समजून घेणे आवश्यक आहे. राज्य कर्त्यांनी ही सम्राट अशोकाला समजून घेणे आवश्यक आहे. 

आज आम्ही भारतीय राज मुद्रेत चारी बाजूने असणारे सिंह पाहतो. सम्राट अशोकाचा हा संदेश आहे की देशाच्या चाहु बाजूच्या सीमा सदैव जागृत असाव्यात आम्ही मात्र समुद्री भागाकडे दुर्लक्ष केले  आणि आमचा यात च नुकसान झाले आहे. अशोकाच्या राज्याच्या सत्यमेव जयते म्हणजे सत्याशिवाय राज्यात खोटेपणा कोणी केलेला चालत नव्हता आणि अशोकाच्या राज्याचा हा नियम इतका कडक होता की राज्यात कधी इ चोरी झाली नाही, खून झाले नाहीत, बलात्कार झाले नाही याला शासन म्हणतात. अशोकाने आदर्श घालून दिला आहे तो हा आहे. लोकांनी आजवर अशोकाला ही मर्यादित करण्याचे काम केले आहे आज अशोकाला जागतिक लेव्हलला प्रेझेंट केले पाहिजे.

अशोकाने बौद्ध धम्माला राजश्रय दिला, म्हणून इतर धर्माचा अनादर केला नाही. कोणावर धम्माची जबरदस्ती ही केली नाही. जनतेने स्वखुशीने धम्म स्वीकारला. अनेक भागातील राजांनी साम्राटाचे मैत्रीचे संदेश स्वीकारले व त्याच्या एका छत्राखाली काम करण्यास मान्यता दिली. लोकांचा गैरसमज आहे की - अशोकाने धम्म स्वीकारली आणि तलवार म्यान केली तर तसे नाही. अशोकाने राज्याची सूत्र कोणाच्याच हाती दिलेली नाहीत. अशोक हा नेहमी तलवार सोबत घेऊन दिसतो कारण राजशाही मध्ये ती राजाची महत्वाची निशाणी असते. अशोक हा आधुनिक लेखन कौशल्याचा प्रणेता आहे. आज आपण लिपी वापरतो, तिचा निर्माता हा अशोक आहे. अशोकाने तिचा वापर करून आपले लेख कोरले व भारताच्या इतिहासाला प्रकाशात आणले. सम्राट अशोकाने जनतेच्या हितासाठी केलेली कामे थोडक्यात पाहूया.

जनता रस्त्याने प्रवास करते, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सामान्य जनते कडूनच घेतली आहे. कारण जनतेला त्याचे महत्व पटावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलीच पण वाटेत कोणत्या हि वाट सरूला पाण्यासाठी वणवण करावे लागू नये. म्हणून नियोजित ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण केले आहे. प्रवाशी निवास तयार केलेत अशोकाने व्यापारी तसेच सामान्य जनता ज्या रस्त्याने जाते. त्या रस्त्याला कोणी चार लुटारू निर्माण  होऊच नये. सामान्य माणसाला रोजगाराची संधी निर्माण करून दिली अशोकाच्या राज्यात बेरोजगारी नावाची समस्याच नव्हती, म्हणून सोन्याची असेल व कोणत्या हि पद्धतीची चोरी - दरोडे अशोकाच्या राज्यात झालेले इतिहासात पाहायला मिळत नाही. याला मॅनेजमेंट म्हणतात.

एवढे बलाढ्य साम्राज्य असून एका हि ठिकाणी चोरी नाही दरोडा नाही इतकेच काय अशोकाच्या चारी बाजुंच्या सीमेवर सैन्य तैनात आहेत. आज आपण मिलिटरी व पोलीस यंत्रणा पाहतो, तर याचा प्रणेता अशोक आहे. अशोकाचे दोन दल आहेत. एक सीमेवर पहारा करणारे व एक दल अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी अशोकाचे सैन्य व्यवस्थापन हि पाहण्या जोगे आहे. ६ लाखाचे पायदळ आहे. हत्ती दल अश्वसेना अश्या प्रकारे सर्वच प्रकारची युद्ध यंत्रणा आहेच, पण त्याच बरोबर अशोक जगातील पहिला राजा आहे. ज्याने समुद्रावर हुकूमत गाजवली आहे. परदेशात भारतीय वस्तूंचा व्यापार करणारा अशोक  भारताचा पहिला उद्योजक आहे, नुसते राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहणे देखील चुकीचे ठरते कि काय असे वाटू लागते. कारण अशोक भारतात असणाऱ्या सर्व वस्तूचे जगाच्या बाजार पेठत आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवतो आणि हे एक यशस्वी उद्योजक च करू शकतो ते अशोकाने या जगाला करून दाखवले आहे.

अशोकाने सामान्य जनतेसाठी सर्व सुखसोयी निर्माण करून दिल्या आहेत. जगातील एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून सम्राट अशोक  यांच्याकडे पाहावे लागते. आज भारतीय अर्थ व्यवस्था कोलमडली कारण मुख्य पायाच ढासळला म्हणून, शेतीच्या व्यवसायावर जगात आर्थिक महासत्ता होता येते. हे अशोकाने जगाला दाखवून दिले आहे. अशोकाने आपल्या राज्यात प्राण्यांची शिकार बंद केली, त्यावेळी राजे महाराजे आपल्या छंद जोपासण्यासाठी वन्य जीवांची शिकार करायचे अशोकाने त्यावर बंदी घातली. त्याचा फायदा असा झाला कि वन्य प्राणी वाढले, जंगले वाढली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ लागला. जेव्हा समतोल असतो. तेव्हा निसर्ग हि कधी उत्पादन माजवत नाही तो शांतच असतो. 

अशोकाच्या राज्यात झाडांची लागवड करणे. जनतेला ससक्तीचे होते शिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्या कडून राज व्यवस्थेकडूनच शेत मालाला हमीभाव दिला  जायचा, त्यामुळे शेतकरी अधिकाधिक शेती पिकवू लागला होता आणि बघता बघता शेतकरी सधन झाला हि अशोकाची रणनीती आज शासन स्वीकारेल तर भारताचा शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही. या देशातील जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या बहुतांश शेती विषयकच आहेत शेतकऱ्याला अधिकाधिक धान्य  पिकवून सरकार ने शेतकऱ्यांकडून खरेदी केले व तेच धान्य परत जनते मध्ये रास्त दरा मध्ये दिल्यास शेतकरी सधन होऊ शकतात. हे सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी करून दाखवले आहे. आज त्याचे इम्प्लिमेंट होणे आवश्यक आहे. सरकार कसे असावे? यासाठी सम्राट अशोक अवश्य समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी व व्यापारी यांना कर प्रणाली मध्ये काही कर म्हणजे टॅक्स लावले होते. ते सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच होते की आणि कोणाला ते देण्यास कधी कमी पडत नव्हती कारण त्यांच्या शेत मालाला डायरेक्ट अशोकाचा शासन यंत्रणेतूनच हमी भाव मिळत होता. त्यामुळे कराच्या रूपात राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात येत असे. शिवाय अशोक केवळ याच एका उत्पन्नावर राज्य चालवत नसे तर शेतकऱ्या कडून घेतलेला शेतीचा माल दुसऱ्या राज्यात व बाजार पेठेत विक्रीसाठी पाठवला जाई. त्यामुळे  शासनाच्या तिजोरीत उत्पन्न वाढलेलं असते.

अशोकाने शेतकऱ्यांकडून मिळालेला महसूल असेल किंवा व्यापाऱ्यांकडून मिळालेला महसूल हा लगेच वापरात आणला नाही त्याची साठवण केली आहे. अर्थात आज आपण शेयर मार्केट वापरतो. अशोकाने ते त्याकाळी वापरले आहे.  व्यापारासाठी आलेल्या वस्तूंचे जास्त किंमतीत विक्री करणे व कमी किमतीत वस्तू खरेदी करणे हे अशोकाचे वापरलेले दोन हजार वर्षा पूर्वीचे तंत्र आहे. आज आम्ही शेयर बाजारात वापरतो  यापेक्षा नुकसान भरपाई शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यापाराला नुकसान झाले असेल तर शासन व्यवस्थेतून त्याला नुकसान भरपाई दिली जायची, आज आम्ही त्यालाच विमा म्हणजे  अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी ह्या साऱ्या सोयी आपल्या जनतेसाठी अमलात आणलाय आहेत. लोकांना त्यांच्या जीवनाची हमी देणारा जगातला पहिला सम्राट अशोक आहे. आज आम्ही जीवन विमा काढतो पण तो हि वेळेवर मिळत नाही अशोकाच्या राज्यात जनतेच्या जीवनाची हि काळजी घेतलाय जात होती. सम्राट अशोकाचे राज्य परिपूर्ण यासाठीच आहे, कारण त्याने निर्माण केलेलं प्रशासन जे आजच्या घडीला आपल्या भारतात नाही. आजच्या युगात सम्राट अशोकाच्या राज्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणूनच बाबासाहेब यांनी घटनेत दिलेले अधिकार आज आम्हाला समजणे महत्वाचे आहे. सम्राट अशोक आपल्या जनतेला त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कधी हि तत्पर असायचा त्याच्या राज महाला बाहेर असणाऱ्या घंटेचा नाद होताच अशोक बाहेर येत असे. आपल्या जनतेची तक्रार ऐकत असे व काही क्षणात त्यावर निर्णय घेऊन त्या व्यक्तीची तक्रार निवारण करत असे आणि महत्वाचे अशोकाकडे कधी अशी तक्रार आल्याची नोंदणीच नाही कि पाणी नाही, रस्ते नाहीत दिवा - बत्तीची सोया नाही अश्या मूलभूत गोष्टी अशोकाने वेळीच पूर्ण केलेल्या असत. त्यामुळे जनतेला कधी त्यासाठी राजाकडे तक्रार करावीच लागत नसे. अजून एक महत्वाचे गोष्ट आज आपण कंप्लेंट बॉक्स ची यंत्रणा पाहतो म्हणजे सरकार मध्ये तक्रार विभाग असतो. अशोकाच्या राज्यात तो थेट अशोकाच्या नेतृत्वा खाली होती. अखिल भारताच्या राज्याचे तक्रार निवारण अशोक स्वतः करीत आहे विचार करा. काय नियोजन असेल त्याचे  यालाच मॅनेजमेंट म्हणतात.

सम्राट अशोकाला आम्ही बरेच संकुचित करून ठेवले आहे खऱ्या अर्थाने अशोकाचा राज्य कारभार जगा समोर आला पाहिजे पण बऱ्याच लोकांनी त्यावर प्रकाश टाकला नाही, असे खेदाने म्हणावे लागते आहे. अशोकाने शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे तक्षशिला विद्यापीठाला विश्व विद्यापीठचा दर्जा प्राप्त करून दिला तो याच काळात असे अनेक छोटी - मोठी विद्यालये निर्माण केली गेली होती. पण पुढे आलेल्या लोकांनी त्या विद्यापीठांची पुनरावृत्ती केली नाही. संन्याश आश्रम सारखे विद्यापीठे चालू केली व शिक्षणाचा पाया या लोकांनी ढासळून टाकला.

सम्राट अशोकाचे धम्म बाबत चे कार्य पाहू या. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी जगात आपले धम्म दूत पाठवले सोबत प्रत्येक राजाला आपला मैत्रीचा संदेश पाठवला व ज्या ज्या राजांनी अशोकाचा संदेश वाचला ते ते लोक बौद्ध धम्माकडे वळले. जगात बुद्ध धम्म पहिला विश्वधर्म म्हणून गणला गेला तो सम्राट अशोकाने बुद्धीच्या असती  एकत्र करून त्यावर ८४ हजार स्तूप बांधले जगातला असा सम्राट आहे ज्याने आपल्या कारकिर्दी मध्ये ८४ हजार स्तूपांची निर्मिती हि अवघ्या ४० वर्षाच्या कालखंडात बांधून घेतले. काही स्तूपांची डागडुजी हि  केली आहे. याचा एक महत्वाचा भाग म्हणजे अशोकाने बांधकाम करवून घेतलेलं स्तूप हजारो वर्षा ंनंतर हि बऱ्या पैकी आज उभे आहेत. हे त्याच्या बांधकाम कौशल्यांचे प्रतीक आहे. परदेशी शासकांनी जर का नासधूस केली नसती तर आज जगाला भारताचा तो ऐतिहासिक ठेवा पाहता आला असता तरी देखील आज आपण पाहतोच आहे. अशोका कडून अनेक राजांनी प्रेरणा घेऊन नंतर लेण्यांची निर्मिती होऊ लागली आहे.   महाराष्ट्र तर अशोकाची प्रांतिक राजधानी होती व सात वाहन राजे अशोकाचे मांडलिक राजे होते, त्यामुळे महाराष्ट्र बौद्धमय होता आणि त्याचाच प्रभाव हा कायम प्रत्येक राजवटी वर आपणास पाहायला मिळतो.

प्रत्येक राजाने नेहमीच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काम केला आहे. अगदी वैदिक राजांच्या काळात देखील लेण्यांचे काम थांबले नाही. कारण जनता बौद्ध धम्मीय होती आणि त्यांनी आपल्या दानातून लेणी उभारली. हा अशोकाचा सर्वात मोठा विजय आहे. भले अशोकाच्या काळात महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती नसली तरी पुढे निर्माण झालेल्या लेण्या ह्या अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसारामुळेच तयार झाल्या आहेत. अशोकाने जगाला  सर्वात अमूल्य ठेवा देऊन गेला आहे. जगाला बुद्ध देऊन अशोकाने अलौकिक क्रांती केली आहे,  अश्या या सम्राटाला मानाचा जयभीम.

सुज्ञ वाचकांनो,
सम्राट अशोकाचे कार्य पाहता शेतकऱ्यांचा राजा सामान्य जनतेचा राजा हा अशोक च पाहायला मिळतो. जे बळीला मोठे करून अशोकाला छोटे करण्याचा प्रयत्न केला गेलाय, तो याच पद्धतीने कारण लोंकाना अशोक सांगायचं नव्हता. त्यामुळे त्यांनी अशोक लपवण्यासाठी बळीला आणले. समाजा मध्ये लोकांमध्ये चिकित्सा करण्याची क्षमता कमी झाली आहे त्यामुळे लोकांचा गैरसमज निर्माण होतो. पुराणातील कथा व भौगोलिक भारताचा इतिहास हा तपासून सत्य स्वीकारायला हवे. 

सम्राट अशोकाचे विशाल साम्राज्य त्याची राज्य कारभाराची पद्धत त्याचे अधिकारी वर्ग याचा इतिहास लपवण्यासाठी ब्राह्मण साहित्यिकांनी बळीला पुराणातून वरती काढलेलं आहे. कारण बळी बाबत इसवी सणाच्या आधी कोणत्याच कालखंडात संदर्भ येत नाही. बळी बाबत जर जनते मध्ये "इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो" हि भूमिका असती तर ती इसवी सनापूर्वी का सापडत नाही. जर इसवी सना पूर्वी नाही म्हणजे ती इसवी सना नंतरची असावी आणि इसवी सना नंतर झालेल्या प्रत्येक राजाची माहिती इतिहासात आहे. मग बळीची का नाही? याचा सरळ उत्तर आहे. बळी होऊन गेलेला नाही हा बली म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो सम्राट अशोकाच्या विरोधात निर्माण केलेला काल्पनिक पात्र आहे. एवढे विस्तारित सांगायचे प्रमुख कारण बळीला बाजूला ठेवून सम्राट अशोक सांगणे आवश्यक आहे, म्हणून सर्वानी सम्राट अशोक सांगावा त्याच्या कारभाराचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावो. तेव्हा लोक म्हणतील -- "इडा पीडा जातो आणि अशोकाचे राज्य येवो."

संदर्भ -
1) https://vichararth.wordpress.com

2) Marathi VishwaKosh : Vol. 11, A. H. Sanlukhe

3) http://prbhondespeaks.blogspot.in/2015/10/blog-post.html

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा 

धन्यवाद ।

1 टिप्पणी:

  1. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा इतिहास समाजातील प्रत्येक घटकाला सागण्याची आवश्यकता आहे मी माझ्या परीने हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेन जय भिम

    उत्तर द्याहटवा